बोलबच्चन

| Labels: | Posted On 24/04/08 at 11:44 AM

मी आणि माझी ग. फ्रें.

ग. फ्रें. - आपण लग्ना नंतर वेगळं रहायचं का?
मी - नाही.
ग. फ्रें. - का?
मी - तुला जेवण बनवता येतं?
ग. फ्रें. - नाही.
मी - बाजारहाट?
ग. फ्रें. - नाही.
मी - धुणी भांडी?
ग. फ्रें. - नाही.
मी - आपण लग्ना नंतर वेगळं रहायचं का?
ग. फ्रें. - नाही.






मी आणि माझी ग. फ्रें. फोनवर

ग. फ्रें. (आनंदात) - ए ऍडी उद्या आपण काय करायचं?
मी (जांभई देत) - उद्या रविवार असल्याने मी दिवसभर अजगर होणार आहे.
संध्याकाळी पाणी पुरी खायला भेटू.
ग. फ्रें. - विसरलस ना?
मी (घाबरून) - काय??
ग. फ्रें. (रागावऊन) - गधड्या उद्या माझा वढदिवस आहे...
मी (जिभ चाऊन) - तारीख लक्षात आहे गं. पण मला वाटलं तू तिथी ने साजरा करतेस.






मी आणि मित्र बार मधे


मी - ही शेवटची
मित्र - हो, आता ही शेवटची
मी - ही शेवटची
मित्र - हो, आता ही शेवटची
मी - ही शेवटची
मित्र - हो, आता ही शेवटची
मी - ही शेवटची
मित्र - हो, आता ही शेवटची
वेटर - सायेब, लास्ट आर्डर चा टायम झाला.
मी - बरं, शेवटची एक घेऊन ये.
मित्र - आणि एक पार्सल दे.
दोघे - ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ख्यॅ





मी आणि माझी ग. फ्रें. फोनवर

ग. फ्रें. - ऍडी तू किती नालायक आहेस हे तुला माहिती आहे का?
मी - आता काय झालं?
ग. फ्रें. - (खटाक...)





मी आणि माझे मित्र कट्ट्यावर

मी - मित्रहो मी लग्नं करतोय...
मित्र १ - दारू...
मित्र २ - सरकार ने बाईक शी लग्नं करायल परवानगी दिली वाटतं...
मित्र - ३ - दारू...
मित्र ४ - जोश्या तुला खरच कुणी हो म्हणालंय की सकाळी सकाळी लाऊन आलयस?
मी - अरे बैलांनो, खरंच मी लग्न करतोय. रविवारी सखरपुडा आहे.
मित्र १-२-३-४ - दारू...






मी आणि माझी ग. फ्रें.

ग. फ्रें. (गमतीत) - ऍडी तुम्ही हुंडा घेणार का?
मी - मला लाख हवा असेल गं, पण तुझ्या कंजूस बापाच्या हातून १ रुपया तरी सुटणार आहे का?
ग. फ्रें. - ...
मी - आSSSSS.....






मी आणि माझी ग. फ्रें. फोनवर

ग. फ्रें. - ऍडी तुझ्या सारखा निर्लज्ज माणूस मी आयुष्यात पाहीला नाहिये...
मी - आता काय झालं?
ग. फ्रें. - (खटाक...)

आयुष्याचे नाटक - प्रवेश दुसरा

| Labels: | Posted On 22/04/08 at 8:56 PM

प्रवेश दुसरा - होऊन जाऊदे

आमच्या कडची ८४ नि त्यांच्या कडची ३७२ माणसं जमवून (लग्नाचा खर्च अर्धा अर्धा) आमचं लग्नं झालं आणि आम्ही नवरे पणाच्या नव्या नोकरीत रुजू झालो.

आपल्या पूर्वजांनी गृहस्थाश्रम नंतर वानप्रस्थाश्रमाची योजना केली हा निव्वळ योगा-योग नसावा. संसार केल्यावर माणसाला आपसूकच आयुष्याचा कंटाळा येऊन, दूर कुठे तरी एकांतात राहावंस वाटणार हे समजून ती सोय केली असावी. पण ही माणसं जंगलात जाऊन तरी सुखी होत असतील का ह्या बद्दल मला शंकाच आहे. कारण तिथेही बायको सोबत असणारच. जंगलातही बायको मोठी पर्णकुटी बांधू म्हणून मागे लागत असेल काय? त्यात तिचे आई-वडीलही जंगलातच असल्याने छोटी तर छोटी, पण बाबांच्या शेजारी बांधू म्हणून नवऱ्याला पिडत असेल काय? अहो सामान्य माणसांचं सोडाच, पण प्रत्यक्ष रामरायालाही वनवासात असून सुद्धा बायको च्या हट्टापायी नव्या फॅशन चा ब्लाउजपीस आणायला जावंच लागलं होतं.

थोडक्यात काय, प्रत्यक्ष भगवंतालाही जे सांसारिक भोग चुकले नाहीत, ते आमच्या सारख्या नव्यानेच संसारात पडलेल्यांना कसे चुकावेत. देवाच्या कृपेने आम्हाला बायको चांगली मिळाली आहे. दिवसातनं एखाद वेळा ओरडा, २-३ दिवसातून एकदा आदळ-आपट आणि आठवड्यातून एकदा 'मी म्हणून तुझ्याशी लग्नं केलं' हे ऐकवण्यावर तिचं समाधान होतं.

पण खरं सांगायचं तर ह्या संसारातही मजा असते. आणि खास करून पहिल्या काही दिवसांची मजा तर निराळीच असते. तिच आता आम्ही तुमच्या सोबत शेअर करणार आहोत. त्याचं काय असतं, पहिला गुलाबजाम जितका गोड लागतो तितके पुढचे लागत नाहीत. जेवण कितीही सुंदर झालं तरी पहिल्या घासाचीच चव लक्षात राहते. तसंच संसाराचंही. (बियरचं तसं नसतं, पहिल्या घोटा इतकाच शेवटचा घोटही झकास वाटतो. किंबहुना, कुठलाच घोट शेवटचा असू नये असं वाटतं. त्यामुळे 'संसार हा मिठाई सारखा गोग्गोड नसून बियर सारखा फेसाळता हवा' असा एक नव-सुविचार मला सुचलाय) असो.

मी प्रायव्हेट गुलाम असल्याने मला लग्ना साठी मोजून २ दिवस सुट्टी मिळाली. ती सुद्धा देताना मालकाने तुला म्हणून देतोय असं ऐकवलं. ही सरकारात असल्याने हिला १८ दिवस सुट्टी मिळाली. आम्हाला कुठे फिरायला जायला जमलं नाही म्हणून शेवटी आई-बाबांनीच आठवडाभर कोंकणात राहायला जायचं ठरवलं. जाता जाता बाबांनी मला कोपऱ्यात घेऊन सांगितलं 'तुम्हाला एकमेकांना वेळ देता यावा, समजून घेता यावं म्हणून एकटं सोडून जातोय. तेव्हा एकमेकांच्या उरावर बसू नका. झक मारली नि ह्यांना एकटं सोडलं असं म्हणायची पाळी आणू नका. दया कर आमच्यावर.' तर असा आमचा आठवणीतला आठवडा सुरू झाला.

पहिल्या दिवशी उठलो तर चक्क नऊ वाजले होते. उडालोच. शेजारी बायको पसरली होती. तिला हलवून जागं केलं नि म्हणालो 'अगं नऊ वाजले. उशीर होणार आता. उठवलं का नाहीसं? ' हिने डोळे न उघडताच सवयी प्रमाणे प्रश्नाला प्रश्न दिला 'सांगितलं होतस? ' आणि कूस बदलली.

लग्ना आधी बिचारी आई न सांगता उठवायची. सकाळी सात वाजता 'सोन्या ऊठ' अशी सुरुवात करून आठ वाजे पर्यंत 'अरे डुकरा सारखा किती वेळ लोळत पडणारेSSSस??? ' इथ पर्यंत पोचायची. डुक्कर म्हटलं की आठ वाजले ही खूणगाठ मी मनाशी बांधली होती. तेव्हा उठायचं.

तसा मला नोकरी करायचा फार उत्साह नाहीये. पण बाइक, पेट्रोल, बियर, सिगारेटी, सिनेमा, खरेदी, पार्ट्या हे सगळं करायचं असेल तर स्वतःच्या पैशाने करा असं बाबांनी सांगितल्याने झक मारत नोकरी करावीच लागते. वर बाबा असंही म्हणाले 'मी माझ्या पेन्शन मध्ये फार फार तर तुला २ वेळचा वरण-भात, आठवड्यातून एकदा तोंडी लावायला पापड नि सणासुदीच्या दिवशी अर्ध्या केळ्याची शिकरण देऊ शकेन. जमत असेल तर बस घरी. ' आई माझ्यावर कधी रागावली की बाबा नेहमी तिची समजून कढतांना 'उंच वाढला एरंड... ' असं काही तरी म्हणत. वाक्याचा नक्की अर्थं माहिती नाही, पण ते मला उद्देशूनच काही तरी असावं असा मला संशय आहे.

तर, पहिल्या दिवशी मी घाई घाईत कसाबसा आवरून घरा बाहेर पडलो. संध्याकाळी घरी आलो तर हिने माझ्या पुढे डझन भर हॉटेल्स ची मेनू कार्डस नाचवत विचारलं 'काय मागवायचं? ' मी म्हणालो घरीच कर काही तरी. त्यावर मॅडम लाडात येत म्हणाल्या 'मला स्वयंपाक नाही येत. ' मी - 'काय??? तुला स्वयंपाक नाही येत??? " ह्या प्रश्नावर तिने सवयी प्रमाणे उत्तर न देता प्रश्न टाकला 'तुला येतो? ' मी गप्प. मॅडम रागावल्यात हे माझ्या लक्षात आलं. ही रागावली की नेहमी अशीच दोन शब्दात गूगली टाकते. गुपचुप जेवण मागवलं. रात्री झोपताना डबल बेड असल्याने मला गाद्या घालाव्या लागल्या नाहीत. पण कुठल्याही क्षणी 'पाय चेपून दे अशी आज्ञा यायची धाकधूक मनात होतीच. पण सुदैवाने तसं काही झालं नाही.

दुसरा दिवसही असाच गेला. माझी गडबड. मॅडम निवांत. घरी यायला उशीर. बाहेरून जेवण. झोपताना धाकधूक.

तिसरा दिवसाची सुरुवात मात्र वेगळी झाली. घड्याळात बघितलं तर मध्यरात्रीचे सहा वाजले होते. इतक्या लवकर कशाला उठवलंस असं विचारणार तेवढ्यात हिने हातात पिशवी देऊन सांगितलं 'दूध घेऊन ये. ' आणि ' जाताना चावी घेऊन जा, उगाच माझी झोपमोड नको' हे वर. दूध घेऊन येता येता निवांत पणे एक सिगारेट ओढावी म्हणून एका बागेच्या कट्ट्यावर टेकलो नि सिगारेट पेटवली. २-४ झुरके मारले नसतील इतक्यात एक आजोबा समोर येऊन उभे राहिले. त्यांनाही हवी असेल म्हणून पाकीट पुढे केलं तर आजोबा फिस्कटले 'इथे सकाळी सकाळी लोकं शुद्धं हवेत श्वास घेण्यासाठी फिरायला येतात आणि तुम्ही चक्क सिगरेट ओढताय? ' गुपचुप उठलो नि घरी आलो. घराच्या चावी ऐवजी सवयी प्रमाणे बाइकची चावी खिशात टाकल्याने बेल वाजवून हिला उठवावं लागलं. दार उघडून ही काही तरी पुटपुटली नि बाहेरच्या सोफ्यावरच आडवी झाली.

आमचा पहिला आठवडा असाच गेला.

सोमवार उजाडला. येता येता उद्या आई घरी येणार नि फायनली आता घरचं जेवायला मिळणार ह्या आनंदात होतो. बेल वाजवली. हिने प्रसन्न हसत दार उघडलं (ही अशी हसली की माझ्या मनात पुढील संकटांची पाल चुकचुकते)बूट काढून सोफ्यावर पसरलो इतक्यात ही कप घेऊन आली 'चहा घे... ' आयला मी उडलोच. बायको नि चक्क चहा केला होता. माझ्या कडे बघून हसत हसत ही म्हणाली 'कपडे बदलून घे. गरम गरम जेवायला वाढते. ' हातात कप तसाच घेऊन मी हिच्या मागे मागे किचन मध्ये गेलो, तर गॅस वर कुकर फुसफुसत होता आणि आमची बायको चक्क कणीक मळत होती. आत मी कोसळायचाच बाकी होतो. मॅडम माझ्याकडे बघून पुन्हा गोड हसल्या नि कणकेने भरलेले हात गळ्यात टाकून म्हणाल्या 'मला टिपीकल नवरा नको होता म्हणून तुझ्याशी लग्नं केलं. पण लग्नानंतर तू बदलतोस का हे पाहण्या साठी तुला आठवडा भर त्रास दिला. त्रासा बद्दल सॉरी, आणि न बदलल्या बद्दल थँक्स'. असं म्हणून बायको नि चक्क मला डोळा मारला. मी अजूनही ह्या धक्क्यातून सावरलो नव्हतो. पण काही तरी बोलावं म्हणून तोंड उघडलं आणि तेव्हढ्यात कुकरची शिट्टी वाजली.

आयुष्याचे नाटक - प्रवेश पहिला

| Labels: | Posted On 07/04/08 at 9:49 PM

आयुष्य हे एक नाटक आहे असं कुणीसं म्हटलंय. आमच्या ह्या नाटकातले काही प्रवेश आता आम्ही आपल्या समोर सादर करणार आहोत. ह्या प्रवेशांतील काही भाग आपल्या नाटकाशी साधर्म्य असलेला वाटला, तर आम्ही आपल्या दु:खात सहभागी आहोत.



प्रवेश पहिला - वाजवा रे वाजवा





बहीणा बाईंची अरे संसार संसार ही कविता आपल्याला फार म्हणजे फारच आवडते. नि संसारात पडल्या पासून तर भावायलाही लागली आहे. खरं म्हणजे मी लहानपणीच लग्न करणार नाही असं ठरवलं होतं. पण प्रेमाची परिणिती लग्नातच व्हावी असा हिचा आग्रह, बाबांचं मत, आईचा हुकूम, हिच्या टोणग्या भावाचा नि त्याचा बाप शोभेल अशा बापाचा 'प्रेमळ सल्ला', ह्या सगळ्याला बळी पडून शेवटी आमचेही दोनाचे चार झालेच. प्रेम विवाह असला तरी बघण्याचा कार्यक्रम झालाच पाहिजे असा आजीचा आग्रह होता. ह्याच कार्यक्रमात देणं घेणं, मान पान, साखरपुडा, कार्यालय इत्यादी ची बोलणीही करून घेऊ असं बाबा म्हणाले. मला कुणी काही विचारलंच नाही.

ठरल्या दिवशी मी, आई, बाबा आणि आजी असे जाऊन पोचलो. एका कोचावर आम्ही नि समोरच्या कोचावर तिचे बाबा, आई, दादा, ती आणि पायाशी एक कुत्रं असे दोन संघ (मनातल्या मनात) कबड्डी कबड्डी म्हणत स्थानापन्न झालो.

बसल्या पासून पाचच मिनिटांत ही मंडळी आपल्या मुलाला नकार देतील ह्या भीतीने आमच्या बाबांनी 'आम्हाला मुलगी पसंत आहे' असं सांगून टाकलं नि आजी समोरच्या समोस्यांवर तुटून पडली. त्यावर तिच्या वडिलांनी 'आता आमच्या मुलीने ठरवलंच आहे तर आम्ही काय बोलणार' असे भाव चेहऱ्यावर आणून 'आम्हालाही मुलगा पसंत आहे' असं सांगितलं. 'तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा' हिची आई. मी आपलं विचारलं 'काल सिनेमाला का आली नाहीस? ' त्यावर सगळे स्तब्ध. ही लाजून आत पळाली नि आतून मला 'तुझ्या नानाची टांग' असा sms पाठवला. द्यायचे घ्यायचे काहीच नसल्याने आणि आप-आपल्या मंडळींचे मान-पान आपणच करायचे असल्याने समोसे संपताच आमची बैठकही संपली.

ह्या बैठकीत मी एक नोट केले की मुली कडच्यांपेक्षा आमच्या कडची मंडळीच जास्त टेंशन मध्ये होती. काही मित्रांशी बोलल्यावर ही सार्वजनिक समस्या असल्याचा साक्षात्कार झाला. संध्याकाळी कट्ट्यावर ह्या समस्येची उकल करायची असं ठरलं. पण शेकडो सिगारेटी आणि लीटरचे लीटर चहा संपूनही हाती काही लागेन. शेवटी 'साला, कलियुग कलियुग म्हणतात ते हेच' असा निष्कर्ष काढून आम्ही आपापल्या घरी गेलो.

यथावकाश आमचे लग्नं झाले. कन्यादान करते वेळी सासऱ्याच्या चेहऱ्यावरचा आसुरी आनंद, सासूच्या चेहेऱ्या वरचे कुत्सित हास्य आणि साल्याच्या चेहऱ्यावरचे 'सुटलो' हे भाव बघताच मला एकदम रामदास स्वामीच आठवले. ते बोहोल्यावरून का पळाले असावेत ह्याचं कारण मला सापडलं असं वाटून मलाही हसू फुटलं. ते पाहून हिचा बाप चमकला. गोरा मोरा झाला. पण उसनं हसून त्याने माझ्या बाबांना पान सुपारी दिली. (सुपारी देणं हा वाक्प्रचार इथूनच आला असेल काय? )

एकी कडे तारा बलं चंद्र बलं सुरू असताना मी मनातल्या मनात भीमरूपी महारुद्रा म्हणत होतो. सप्तपदी घालताना मी हिला हात धरून चालवतोय ह्या ऐवजी हीच मला मागून पराणी टोचून पुढे ढकलतेय असा भासही मला झाला. वर आमची नालायक मित्र मंडळी आमच्या समोरच प्लेट च्या प्लेट आइसक्रीम चापत होती. त्यांचं लग्नं नसल्याने ते बिनधास्त होते.

घटिका भरत असताना हिच्या एका मावशीने यमक प्रास काहीही नसलेली मंगलाष्टकं म्हटली. त्यात हिचं यथेच्छ गुणवर्णन केलं होतं. आपली बायको इतकी गुणी आहे हे ऐकून मला अभिमान वाटला. पण इतक्या वर्षात ह्यातल्या एकही गुण आपल्याला कसा नाही कळला हा विचार मनात येऊन मी थोडा गोंधळातही पडलो. त्यांचं म्हणून झाल्यावर, घटिका भरत नसल्याने व जवळचा स्त्रोत्र व सुभाषितांचा साठा संपल्याने गुरुजींनी मध्येच रामरक्षेतले दोन-चार श्लोकही म्हणून घेतले. आणि कुणाचं लक्ष नाही असं पाहून हळूच घटिका पात्राला एक तांदूळ फेकून मारला. मी सहज मान वळवून पाहिलं तर दुसरे गुरुजी शांत पणे एका कोपऱ्यात तंबाखू चोळत उभे होते व 'सावधान'च्या वेळी कोरस देत होते.

शेवटी एकदाची घटिका भरली नि लोकांनी आमच्या वर रंगीत तांदूळ फेकून टाळ्या वाजवल्या. डोंबाऱ्याच्या खेळात जसं माकड जिवाच्या आकांताने कोलांट्या उड्या मारतं नि लोकं टाळ्या वाजवतात त्यातलाच हा प्रकार. (इथे पुन्हा मला मी कोलांट्या उड्या मारतोय नि ही डमरू वाजवतेय असा भास झाला).

तर अशा प्रकारे आमचं वाजवा रे वाजवा झालं. आणि नव्याची नवलाई संपल्यावर, वाट चुकलेलं वासरू जसं थोड्या वेळाने कळपात सामील होतं, तसे आम्हीही आमच्या कट्ट्यावरच्या कळपात सामील झालो.