क्रॉसवर्ड

| Labels: | Posted On 9/11/09 at 12:48 AM

नेहेमीप्रमाणे नशिबाला शिव्या घालत, पायाखाली सिग्रेट चिरडून रवी अनिच्छेने पुन्हा कामाला लागला. एके काळी देशावरच्या मोठ्या जमीनदारांमधे मोजल्या जाणार्‍या शिरवाळकर घराण्याच्या एकमेव वारसाला मुंबईत एका फडतूस कंपनीत महिना दहा हजारावर खर्डेघाशी करायला लागावी ह्याचं त्याला आज पुन्हा एकदा वैषम्य वाटलं. पूर्वी शिरवाळकर घराणं मोठं मातब्बर समजलं जायचं. जमीनदारी, शेती-वाडी, व्यापार, पैसे व्याजी देणं इत्यादी अनेक व्यवसायांत त्याच्या पूर्वजांनी गडगंज संपत्ती कमावली होती. इतकी, की शिरवाळच्या संस्थानिकांना वेळ-प्रसंगी ह्यांनी आर्थीक मदत केली होती. घरी लक्ष्मी पाणी भरत होती. शे-दीडशे दुभती जनावरं, हजार दीड हजार एकर बागायती जमीन असलेल्या ह्या कुटंबाचा रहाता वाडाही तसाच प्रशस्त होता. पण ह्या सगळ्या गोष्टी रवीने कधीच अनुभवल्या नव्हत्या. ही सगळी ऐकीव माहिती त्याला मिळाली त्याच्या आजोबांकडून.

रवीचे आजोबा गजानन आणि त्यांचे थोरले बंधू श्रीधर आपल्या वडिलांना, दत्तोपंतांना, कारभार सांभाळण्यास मदत करत. सोबत होते त्यांच्या वडिलांचे विश्वासू साथीदार देसाई. दोघांनी मेहेनतीने हा सगळा पसारा नुसता सांभाळलाच नाही तर वाढवलाही. काही वर्षानी दत्तोपंत एके दिवशी ताप आल्याचे निमीत्त होऊन गेले. देसाईंना हा धक्का सहन झाला नाही. गेली पन्नासहून अधीक वर्ष ज्या मित्राची सावली सारखी सोबत केली तो आता नाही ही कल्पनाच त्यांना सहन होईना. त्यांनीही अंथरूण पकडले. अगदी शेवटच्या दिवसात गजानन त्यांना भेटायला गेला होता. देसाई अप्पा काही बोलायच्या अवस्थेत नव्हते, पण त्यांनी गजाननला आशीर्वाद म्हणून एक श्री दत्ताची तसबीर दिली.

वडील आणि वडीलांसारखीच माया लावणारे देसाई अप्पा गेल्यावर मात्र गजानन शिरवाळकरांच्या दुर्दैवाला सुरुवात झाली. वडील वारल्यानंतर महिन्याभरातच श्रीधरने हळूकळू संपत्तीवर कब्जा करण्यास सुरुवात केली. गजाननने त्याला परोपरीने समजावण्याचा प्रयत्न केला की दोन्ही हातांनी उधळली तरी पुढच्या पंधरा पिढ्या चैनीत राहतील इतकी संपत्ती आहे. त्यामुळे, ह्या वरून भावाभावांत वाद नकोत. पण संपत्तीच्या लोभाने आंधळा झालेल्या श्रीधरला त्यावेळी दुसरे काहिही सुचत नव्हते. आधी दमदाटी करून इस्टेटीच्या कागदावर सही करायला लावण्याचा प्रयत्न केला. पण त्याला गजानन बधत नाही हे लक्षात आल्यावर शेवटी श्रीधरने गजाननला कुटूंबासकट संपवण्याचा डाव रचला. फासेपारध्यांना पैसे देऊन स्वत: कामासाठी बाहेरगावी असताना गजाननला संपवण्याचा कट रचण्यात आला. फासेपारधी असले तरी गजाननसारख्या देवमाणसाच्या हत्येचे पाप नको म्हणून त्यांचा म्होरक्या, शिरपा, एके दिवशी येऊन हे सगळं गजाननला सांगून गेला. त्याच दिवशी गजाननने घर सोडायचा निर्णय घेतला.

श्रीधरच्या कटानुसार तो बाहेरगावी गेल्यावर गजाननने सोबत केवळ श्रीदत्ताची तसबीर घेऊन नेसत्या वस्त्रानिशी मुलाबाळांसकट घर सोडले. त्यानंतर गावोगाव भटकत, छोटी-मोठी कामं करत कुणाच्या नजरेत येणार नाही असं आयुष्य जगायला त्यांनी सुरुवात केली. असंच फिरता फिरता एका गावी धर्मशाळेत थांबले असता अचानक त्यांची गाठ शिरपाशी पडली. गाठ पडली म्हणण्यापेक्षा तो स्वतःहून त्यांच्या समोर आला. शिरपाने गजाननच्या कपड्यांना जनावराचे रक्त लाऊन श्रीधरला दाखवले होते. पण तरी श्रीधरला पूर्ण खातरजमा करायची असल्याने त्याने आपली माणसं गजाननचा शोध घ्यायला गावोगाव पाठवली होती. गजाननला त्या माणसांकडून काही त्रास होऊ नये म्हणून इतके महिने शिरपा त्यांच्या नकळत त्यांची सावली सारखी पाठराखण करत होता. बरेच महिने शोधाशोध केल्यावरही काही पत्ता लागेना म्हणून शेवटी श्रीधरने आपल्या माणसांना परत बोलावून घेतले. आज शिरपाने श्रीधरला भेटून ही सगळी हकिकत सांगितली आणि त्याचबरोबर आपण हे वाईट काम सोडून चांगल्या मार्गाला लागणार असल्याचेही सांगितले. शिरपाच्या ॠणाखाली दबलेल्या गजाननने त्याला काही दिवस आपल्याकडे रहायचा आग्रह केला. पण पुन्हा कुणास संशय यायला नको म्हणून शिरपा त्याच दिवशी निघाला. जाताना त्याला गजाननने भेट म्हणून श्रीदत्ताची तसबीर दिली आणि सुयश चिंतीले.

हळू हळू आपल्या नव्या आयुष्यात गजानन रमला. मुळातच शांत स्वभाव आणि समाधानी वॄती असलेल्या गजाननचे पैशाअभावी काही अडले नाही. इकडे श्रीधरने सुरुवातीला काही दिवस खूप ऐषोरामात घालवले. पण हळू हळू ह्या सगळ्याचा त्याला कंटाळा येऊ लागला. दारू, जुगार, बायका, सगळं काही करून झालं. मुलगा शहरात शिकायला गेला होता. तो मधून मधून येत असे, पण आपल्या बाबांचे प्रताप कळल्यावर त्याने वडिलांशी बोलणं सोडलं आणि शिक्षण झाल्यावर तिथेच कायमचा स्थाईक झाला. पुढे, साथीच्या रोगात बायको वारल्यावर मात्र श्रीधरला वेड लागायची पाळी आली. इतक्या मोठ्या वाड्यात तो आणि त्याचे २ नोकर इतकीच लोकं होती. भावाला मारून आपण काय साध्य केलं हा प्रश्न त्याला हळू हळू सताऊ लागला. रात्री अपरात्री विचित्र भास होऊ लागले. आणि एके सकाळी गळफास लाऊन घेतलेल्या अवस्थेत श्रीधर लोकांना सापडला.

वडिलोपार्जीत इस्टेट सांभाळण्यासाठी नाईलाजाने श्रीधरचा मुलगा शशी गावी परत आला. हळू हळू त्याने कारभारात लक्ष घालायला सुरुवात केली. शशीचा स्वभाव बाबांच्या अगदी विरूद्ध होता. मनमिळाऊ आणि लोकांना मदत करायला सदैव तत्पर असलेल्या शशीने शिरवाळकर घराण्याल गतवैभव प्राप्त करून द्यायचे ठरवले. त्याने आपल्या वडिलांच्या पापांचे प्रायश्चित्त म्हणून काकांच्या नावाने गावात धर्मदाय दवाखाना सुरु केला, वडिलांनी जबरदस्तीने ज्यांच्या जमिनी बळकावल्या होत्या त्या त्यांना परत केल्या, मुद्दलापेक्षा कैकपटीने व्याज भरत रहाणार्‍यांची कर्जे पूर्णपणे माफ केली. आणि हळू हळू पुन्हा शिरवाळकर घराण्याला प्रतिष्ठा मिळवून दिली.

नेहेमीप्रमाणे ऑफीसमधून नाक्यावर आणि नाक्यावरून घरी आलेल्या रवीने दार उघडून हॉल मधला दिवा लावला आणि त्याला धक्काच बसला. ह्या मधल्या आठ-दहा तासात कुणीतरी त्याचं घर पार साफ केलं होतं. साफ म्हणजे दिवे, पडदे, ह्यांसकट सगळ सामान घरातून गायब झालेलं होतं. उरल्या होत्या नुस्त्या भिंती आणि खिडक्यांच्या चौकटी. एक क्षण त्याला आपण कुठे आलोय हेच कळेना. हॉलमधून कानोसा घेत सावधपणे रवी किचनमधे शिरला. तिथेही तोच प्रकार. एकूण एक वस्तू गायब. तेव्हढ्यात त्याला ओट्यावर एक भांडं पालथं करून ठेवलेलं आढळलं. भांडं उचलून बघताच त्याला आत लहानशी पिशवी आढळली. पिशवीत त्याच्यासाठी एक चिठ्ठी होती.
आणि सोबत होतं.......

.......एक क्रॉसवर्ड.

क्रमशः

Comments:

There are 3 comments for क्रॉसवर्ड