पाचवी खोली

| Labels: | Posted On 3/29/11 at 9:54 AM


गिरगावातल्या चाळीत वाढलेल्या आमच्यासारख्या लोकांचं घराबद्दलचं एक स्वप्न असतं. स्वप्न सुरू - घरात एक प्रशस्त, हवेशीर संडास असावा - स्वप्न समाप्त. जास्त अपेक्षा नाहीत. मजल्यावरच्या ४ बिर्‍हाडात मिळून एक असलेल्या सार्वजनीक संडासाला आम्ही प्रेमाने पाचवी खोली म्हणत असू. काही लोक त्याला 'मालकाची खोली' असंही म्हणत. संडासाला 'मालकाची खोली' म्हणण्यामागे चाळ मालकाला नावं ठेवणं इतकाच हेतू नसून त्या बोलण्याला 'फक्त खोलीचं भाडं देऊन संडास फुकट वापरता' असं मालकाने ऐकवल्याची पार्श्वभूमी असे. चाळीतला संडास हा क्लिओपात्राच्या बाथ-टब सारखा लेख लिहायच्या लायकीचा जिन्नस नाही. कुणी लेख लिहावा इतकी ही उदात्त वस्तू अथवा वास्तू नाहीच. पण चाळकर्‍यांच्या जीवनात हिचं महत्व अनन्यसाधारण आहे हे नाकारता येत नाही.

जे चाळीत राहिले नाहीत त्यांच्यासाठी सांगायचं तर ही पाचवी खोली साधारण सिनेमात दिसणार्‍या पोलिसांच्या टॉर्चर रूम सारखी दिसते. फक्त इथे सत्य शोधक पट्टा नसतो. साधारण ६x६ ची खोली. जास्त जोरात लावली तर तुटेल अशी भीती वाटणारी कडी. कडी लाऊनही उघडाच राहिलाय असं वाटणारा दरवाजा. स्वातंत्र्यपूर्वकाळात कोबा केलेली जमीन. एक शोभेचा नळ. काचा फुटलेली आणि कुणीतरी पुठ्ठा चिकटवलेली खिडकी. संशोधनाचा विषय ठरावा असा रंग. भरीसभर म्हणून त्या खिळखिळ्या दरवाजातून किलकिलत आत येणारा प्रकाशाचा झोत पाचव्या खोलीत एक गूढ-भयाण वातावरण निर्माण करत असे.

दरवाजाच्या त्या फटीखेरीज हवा येण्याजाण्याचा दुसरा मार्ग नसल्याने खोलीतल्या ह्या भयाण वातावरणाला कुंद कारूण्याची झालरही लागत असे. कुणी जास्तवेळ आत राहिल्यास लोकं बाहेरून 'मेलास का रे?' असं ओरडत. ह्या ओरडण्याचे कारण चेष्टा नसून आतल्या माणसाविषयी कळकळ असे. कारण माणूस फार वेळ आत राहिला तर गुदमरून मरण्याचीच शक्यता जास्त. कदचित त्यामुळेच लोकं बाहेरही पटापट येत. आणि ती तशी यावीत ह्यासाठीच कुणी तिथे एग्झॉस्ट फॅन वगरे बसवले नसावेत. कोण जाणे, एखादा आत रमला तर इतरांची पंचाईत व्हायची. फ्लश, एग्झॉस्ट फॅन सारख्या चैनी त्या काळी नव्हत्या. आणि असत्या तरी त्या नळासारख्या शोभेपुरत्याच राहिल्या असत्या.

मुंबईचं प्रतिबिंब मुंबईकराच्या आयुष्यात दिसतं असं म्हणतात. आणि ते बघायला पाचव्या खोली सारखी दुसरी उत्तम जागा नाही. गर्दी, भयानक उकाडा, खूप घाम, कोंदट हवा, मान टाकलेला नळ ही मुंबईची सगळी लक्षणं ह्या ६x६ च्या खोलीत दिसून येतात.

पाचव्या खोलीतली भित्तीचित्रे आणि लिखाण हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. आफ्रिकेतल्या गुहेत सापडणार्‍या चित्रांशी साधर्म्य असलेल्या ह्या चित्रांचे चित्रकार आफ्रिकन चित्रकारांप्रमाणेच अनाम आहेत. माणसाच्या शरीराचं इतकं तपशीलवार चित्रण खजुराहोच्या शिल्पांनंतर इथेच दिसतं. कोणाचे कुणाशी जुळले आहे, कोण कशी चालू आहे, कोण एकाचवेळी अनेकांसोबत फिरत आहे अशा जिव्हाळ्याच्या विषयांवर इथे साधकबाधक चर्चा होऊन त्याची तपशीलवार नोंद ह्या भिंतीवर करून ठेवलेली आढळते. तसंच चाळीत घडणार्‍या भांडणांपासून ते मॅचच्या टाईमटेबलपर्यंत सगळ्या लेटेस्ट घडामोडीही ह्या भिंतीवर कोरून ठेवलेल्या आढळत. काही इतिहास संशोधकांच्या मते सद्ध्या प्रचलीत असलेल्या फेसबूक मधील वॉलची जननी हीच पाचव्या खोलीतली वॉल आहे. एका भिंतीवर तर "माझी होशील का" असा प्रश्न आणि त्याखाली "नाही" असं उत्तरही वाचायला मिळालं होतं.

ह्या पाचव्या खोलीने आम्हाला काय काय शिकवलं हे लिहायला लागलो तर यादी फार मोठी होईल. हठयोग्यांसारखं एका पायावर उभं राहून रांगेत तप करायला शिकवलं. सकाळी सकाळी प्रत्येक मजल्यावर असे अनेक ध्यानमहर्षी दिसत. शेअरींग आणि वेटींगचे प्रात्यक्षिक इथे दिसे. एक माणूस माणूस आत गेला की तो जाताना पेपर दुसर्‍या माणसाकडे पास करत असे आणि तो पुढच्याकडे. रांगेचा फायदा सर्वांना ही ओवी इथे प्रत्यक्षात अनुभवली जात असे. इतकी शिस्तबद्ध रांग मुंबईत दुसरीकडे कुठेही दिसणार नाही.

अनेक जण तर सकाळी सकाळी बायकोची कटकट नको म्हणून शांत चित्ताने विडी शिलगावून रांगेत उभे राहत आणि नंबर आला की लोकांना पास देऊन पुढे पाठवत. माणसं उठली की आधी देवापुढे हात जोडायचे सोडून तोंडात ब्रश खुपसून रांगेत उभे राहत. घरात २ पेक्षा अधीक मुलं असली तर एक दुधाच्या रांगेत आणि एक इथल्या रांगेत असं चित्र दिसे.

इथे आम्ही पाण्याची बचत करायला शिकलो. पाचव्या खोलीत नळ असे, पण वयस्क माणसांना उठताना आधार म्हणूनच त्याचा वापर होई. त्यातून पाणी येताना कुणीही कधीही पाहिले नव्हते. 'हा नळ मालकाने टाकीला जोडलेलाच नाही, नुस्ताच पाईप टाकलाय' असंही एकदा एकाने मला सांगितलं होतं. अशा परिस्थितीत सगळी भिस्त घरून आणलेल्या बादलीवर असे. घरून निघून मधल्या वाटेत पाण्याचा एकही थेंब खाली न पडू देता, बादली अजिबात डचमळू न देता मुक्कामी पोचणे हे येरागबाळ्याचे काम नव्हे.

पाचव्या खोलीने आम्हाला विजेची बचत करायला शिकवली. प्रत्येकाच्या घरात इथल्या दिव्याचा वेगळा स्विच असे. घरून निघताना तो सुरू करून निघावा लागे. कार्यभाग आटपून माणूस बाहेर पडला की दरवाज्याची बाहेरची कडी लावल्याचा आणि घरून दिव्याचा स्विच ऑफ केल्याचा आवाज एकदमच येत असे. लोकांचे कुले धुवायला आपली वीज का जाळा? असे साधे सोपे तत्व त्या मागे असे. आजकालच्या मुलांना एखाद्या खोलीतून बाहेर पडताना दिवे आणि पंखे बंद करावे हे शिकवावं लागतं. इथे तो आमच्या चाळीच्या संस्कारांचाच भाग होता. कारण 'जरा जाऊन येतो, जोशांचा दिवा सुरू आहे' असे संवादही केवळ आणि केवळ चाळीतच ऐकू येत.

अनेक लोकांच्या प्राणायामाच्या सवयीची सुरुवात इथूनच झाली. जीव मुठीत धरून 'बसणे' म्हणजे काय ह्याचा शब्दशः अनुभव इथे येत असे. आत जाताना छातीभरून श्वास घ्यायचा आणि तो सोडायला लागायच्या आधी बाहेर यायचं असे अचाट प्रकार इथे बघायला मिळत. मुंबईच्या घाईगडबडीच्या आणि गर्दीने व्यापून राहिलेल्या आयुष्यात काही एकटेपणाचे निवांत क्षण अनुभवण्याची जागाही ही पाचवी खोली असे. चाळकर्‍यांचं बाकी सगळं आयुष्यच सार्वजनीक असल्याने इथेच काय तो एकांत मिळत असे. नको नकोसा वाटला तरी.

अशा ह्या आखुडशिंगी, बहुगुणी पाचव्या खोलीपासून एकेकाळी आमच्या दिवसाची सुरुवात होत असे. आणि शेवटही.

चाळीवर आणि चाळकर्‍यांवर अनेकांनी अनेक लेख लिहिले पण ही पाचवी खोली मात्र उपेक्षितच राहिली आणि म्हणूनच आमचा हा लेखन प्रपंच.


-------X-------

रावसाहेब

| Labels: | Posted On 3/14/11 at 6:30 PM


रावसाहेबांनी डोळे किलकिले करून बघितलं. आजूबाजूला कुणाची चाहूल नव्हती. अंमळ पडून रहावे असा विचार करून रावसाहेबांनी कूस बदलली. पडद्याच्या फटीतून सकाळची कोवळी किरणं रावसाहेबांना त्या थंड वातावरणात हवीहवीशी वाटणारी उब देत होती. म्हणजे, दिवस थंडीचे नव्हते, ती थंडी ए.सी.ची होती. मुंबईत राहून हिवाळा अनुभवायचा असेल तर एसी शिवाय पर्याय नाही हे त्यांना कळलं होतं. पुन्हा एकदा रावसाहेबांनी स्वतःला मऊ दुलईत गुरफटून घेतलं. मागचे काही दिवस हा त्यांचा नेहेमीचा उद्योग झाला होता. आताशा पूर्वीसारखे कुणी त्यांना सकाळी सकाळी उठवायच्या मागे लागलेले नसायचे. पूर्वी सकाळी घराचं जणू रणांगण झालेलं असायचं. ८ च्या आत आवरून घराबाहेर पडायची सगळ्यांची घाई असे. घरात २ बाथरूम्स असली तरी सकाळच्या घाईगडबडीत घरातल्या ५ माणसांना कमीच पडत. का कोण जाणे अप्पांनासुद्धा ८ वाजता देवळात हजर रहायची सवय होती. 'देव तिथे दिवसभर असतो, आमच्या ऑफिसच्या गडबडीनंतर तुम्ही तुमचं आवरत जा' ही तात्यासाहेबांची विनंती अप्पांनी कमी ऐकू येत असल्याच्या बहाण्याने अनेक वर्ष कानावरून घालवली होती.
एक एक जण स्वतःचं आवरून टेबलवर येऊन न्याहारी संपवत होता. रावसाहेब सगळ्यात शेवटी अंघोळीला जायचे. कावळ्याच्या अंघोळीसारखी अंघोळ उरकणे त्यांच्या स्वभावातच नव्हते. आधी छान पैकी २ बादल्या उन पाणी काढून घेणे, हळूहळू प्रत्येक तांब्या मनापासून अंगावर ओतणे, मग निवांतपणे शँपू, बॉडी वॉश चोळणे, पुन्हा अंगाला छान मसाज करणे, २ बादल्या पाणी संपलं की शेवटी पुन्हा बाजूला काढून ठेवलेले १-२ तांबे डोक्यावरून ओतणे अशी साग्रसंगीत अंघोळ रावसाहेब रोज करत. तोवर सगळ्यांची न्याहारी होऊन सगळे घराबाहेर पडायला एकदम तय्यार असत. माई सोडून. रिटायर झाल्यापासून माई सहसा घराबाहेर पडत नसत. पण सकाळी ७ ला सगळं आवरून तयार होण्याची त्यांची गेल्या ४० वर्षांची सवय त्यांना मोडायची नसल्याने सकाळच्या गडबडीस त्यांचाही हातभार लागे. तयारी करून माई ऑफिसची पर्स धरून सोफ्यावर बसून असत.
रावसाहेबांची न्याहारी गाडीतच होत असे. माई नेहमी त्यांना भरपूर डबे देत. न्याहारीचा डबा, मधेच भूक लागली तर काही तरी जवळ असावं म्हणून एक डबा आणि दुपारच्या जेवणाचा ४ खणी डबा. ह्यातला एखादा डबा जरी भरलेल्या अवस्थेत परत आला तर संध्याकाळी रावसाहेबांना हजार प्रश्न विचारून माई भंडावून सोडत. 'आवडलं नाही का? वेळ मिळाला नाही का? भूक नव्हती का? दुसरं काही देत जाऊ का? बाहेरचं खाऊन खाऊन घरचं जेवण आवडेनासं झालं वाटतं?' इत्यादि प्रश्नांच्या भडिमारामुळे रावसाहेब नेहमी सगळे डबे संपवूनच परत आणत असत.
तात्या स्वतः गाडी चालवत. तात्या आणि अक्का दोघेही रग्गड कमावत असून ड्रायव्हर का नाही ठेवत असा विचार रावसाहेबांच्या मनात वरचेवर येत असे. रावसाहेब आरामात मागच्या सीटवर बसत, तात्या ड्रायव्हर सीट वर आणि अक्का तात्यांच्या बाजूच्या सीटवर. गाडीत बसल्यापासून तात्या ट्रॅफिकला शिव्या घालायला सुरुवात करत असत. रिक्षावाले हा त्यांचा शिव्या घालण्याचा हक्काचा आयटम. शिवी घातली की मागे रावसाहेब बसलेत हे जाणवून तात्या जीभ चावत आणि आरशातून मागच्या सीटवर बसलेल्या रावसाहेबांकडे बघत. रावसाहेब खिडकीतून बाहेर बघत आहेत हे बघून त्यांनी शिवी ऐकली नसावी असं स्वतःच समाधान करून घेत. पण रावसाहेबांना आता शिव्या अंगळवाणी पडलेल्या असल्याने ते तात्यांकडे दुर्लक्ष करत. किंबहून तात्यांना अवघडल्यासारखं वाटू नये म्हणून रावसाहेब मुद्दामच लक्ष नसल्याचं सोंग आणत.
माईने बांधून दिलेली न्याहारी संपवेपर्यंत रावसाहेबांची उतरण्याची जागा आलेली असे. आपण उतरलो की अक्का अंमळ तात्यांजवळ सरकून बसते हे रावसाहेबांनी बघितलं होतं. ते हसूनच त्यांच्याकडे दुर्लक्ष करत. अक्कांना सोडून तात्या त्यांच्या ऑफिसला जात असत. घरी सगळ्यात आधी रावसाहेबच परत येत असत. घर जवळ असल्याने निघाल्यापासून ३० मिनिटात ते घरी असत. माई त्यांची वाटच बघत असे. आल्या आल्या त्यांना काही तरी खायला करून देणे हा माईच्या दिवसातला हायपॉइंट असे. दुपारचं जेवण नुकतंच झालं असल्याने फारशी भूक नसली तरी प्रश्न नकोत म्हणून रावसाहेब समोर येईल ते गपगुमान गिळून आपल्या खोलीत जात असत.
घरी सगळ्यात उशीरा तात्या येत. किमान एकवेळचं जेवण सगळ्यांनी एकत्र घ्यावं असे तारे तात्यांनी एकदा तोडल्यापासून रावसाहेब तात्यांवर बारीक लक्ष ठेऊन होते. आणि हे तात्यांनाही माहित असल्याने तात्या जेवण्याच्या वेळेपर्यंत तरी पोचायचा प्रयत्न करत. कधी कधी उशीर होत असे पण तेव्हढं रावसाहेब चालवून घेत. जेवता जेवता सगळे जण आजच्या दिवसात काय काय घडलं हे इतरांना सांगत. जेवण झालं की मग सगळे समोरच्या बागेत चक्कर मारायला जात. रावसाहेबांन खरं तर झोप अनावर झाली असे. पण तरी ते कसे बसे पाय ओढत सगळ्यांसोबत फिरत. रावसाहेबांची पावलं अडखळू लागली की सगळे माघारी फिरत.
असा एकंदरीत रावसाहेबांचा दिवस असे. पण मागचे काही दिवस सगळं बदललं होतं. तात्या आणि अक्काची गडबड मात्र पूर्वीसारखीच होती. एकमेकांमुळे उशीर झाल्याचा आरोप एकमेकांवर करणेही पूर्वीसारखेच होते. रावसाहेब आपल्या खोलीत पडल्यापडल्या त्याची मजा घेत.
सद्ध्याचा हा दिनक्रम त्यांना मनापासून आवडत होता. माईसुद्धा आताशा त्यांच्या फार मागे लागत नसे. स्वप्नवत वाटावं असं आयुष्य रावसाहेब सद्ध्या जगत होते. पण हे सगळं लवकरच संपणार ह्याची जाणीव असल्याने ते मधूनच अंमळ दु:खीही होत. जमतंय तितके दिवस मजा करून घ्यावी असा विचार करून ते मनावर साचलेलं मळभ झटकत आणि पुन्हा कूस बदलत. रावसाहेबांच्या ह्या बदललेल्या आयुष्याचं कारण त्यांना माहित होतं. खरं तर ते ह्या दिवसांची मनापासून वाट बघत होते. रावसाहेब आनंदात होते. अजून थोडावेळ अंमळ पडून रहावे असा विचार करून रावसाहेबांनी पुन्हा एकदा कूस बदलली. आता तात्या आणि अक्कासोबत आवरून तयार व्हायची घाई नव्हती. आता त्यांना उठवायला कुणीही येणार नव्हतं. आता लवकर अंघोळ करायला कुणीही सांगणार नव्हतं.
कारण रावसाहेबांची वार्षीक परीक्षा संपून आता उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली होती.