आयुष्याचे नाटक - प्रवेश सहावा

| Labels: | Posted On 6/26/08 at 2:49 PM

प्रवेश सहावा - कोंकण यात्रा




सुना आत्या म्हणजे बाबांची सगळ्यात लहान बहीण. २०-२२ वर्ष आई-बाबा आणि भावंडांवर तलवारबाजी करून एके दिवशी सुना आत्या सासरी राज्य करायला निघून गेली. तिला नवराही अगदी म्हणजे अगदीच गरीब मिळाला. सासू नव्हती. सासरेही बिचारे एका कोपऱ्यात देव देव करत बसले असायचे. तशी सुना आत्या मूळची खूप प्रेमळ. आम्हा भाचरांवर तर अमर्याद प्रेम केलं. तिचं सासर कोंकणात असल्याने दर सुट्टीत आमचा मुक्काम तिच्याकडेच असायचा. आंबे उतरवले नि मुंबईला ३ भावांकडे पेट्या आल्या नाहीत असं कधीच झालं नाही. पण तिच्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळीच जरब होती. सासरी गेल्या गेल्या तिने घराची सगळी सूत्र हातात घेतली आणि त्या घराचा बघता बघता कायापालट झाला. काका मुळात स्वभावाने गरीब आणि भिडस्त. पण ह्याच स्वभावामुळे एकट्याने आंबे, शेती, नारळी, पोफळी हा सगळा व्याप सांभाळणं कठीण जायचं. भरवशाचा माणूस कुणी नव्हता. सुना आत्याने तिथेही हळू हळू त्यांना मदत करायला सुरुवात केली. आणि ह्या सगळ्याला साथ मिळाली तिच्या करारी स्वभावाची, तीक्ष्ण जिभेची आणि टिपीकल कोकणस्थी खवट पणाची.

तर अशी ही सुना आत्या एक दिवस आमच्या घरी आली. आल्या आल्या आमच्या गप्पा सुरू झाल्या.
मी - पप्या कसा आहे गं?
आत्या - सतरां पारांवरचां मुंजा तो, त्याला काय धाड भरतिये?
मी - आणि पप्या चे प. पू.?
आत्या - तोही त्याचाच बाप. व्याघ्रेश्वराजवळ बसलेला असतो दिवसभर.
पप्याचे वडील ही एक अजब आसामी होती. टिपीकल कोकणीपणच आयडियल सँपल होतं. हयात कोंकणात घालवलेली, त्यात कोकणस्थ आणि वरून एकारांती असं डेडली काँबिनेशन होतं. पप्याने इंजिनियरिंगला ऍडमिशन घ्यायची ठरवल्यावर ह्यांनी 'हे पाहा, तू माझा एकुलता एक मुलगा आहेस हो. तुझी फी मी भरीन पण नंतर तू माझ्याकडे पाह्यलं नाहीस तर मी कुणाकडे पाहणार' असं म्हणून त्याची 'माझ्या वडिलांनी माझी इंजिनीयरींगची फी भरण्यासाठी स्वतःची हयातभराची कमाई घातली. पुढे मरेपर्यंत मी त्यांना सांभाळीन व यथासांग दिवस-कार्य करीन. अथवा माझ्यावर त्यांनी केलेला खर्च चालू व्याजदरासकट परत करीन. ' असं लिहिलेल्या कागदावर पंचांसमोर सही घेतली.

पण पप्या मुलगा गुणी निघाला. शिक्षण झाल्यावर गावातच बॉल-बेअरिंगची फॅक्टरी टाकली आणि बापालाही सांभाळतोय. एकदा बोलता बोलता हा विषय निघाल्यावर त्यांनी मला सांगितलं 'अरे एकुलता एक मुलगा तो. पैशापेक्षा का मोठा आहे? पण फुकट मिळालेल्या गोष्टीची किंमत नसते हो... ' हो चा उच्चार टिपीकल हेल काढून.

आत्याने नेहमी प्रमाणे आमच्या घरीही सूत्र हातात घेतली. सुनेने मला वळण लावायचे प्रयत्न केलेले बघून ती माझ्या बायको वर भारीच खूश झाली. 'जोश्यांच्या सगळ्यात नाठाळ आणि वात्रट कार्ट्याशी लग्न केलंस, धीराची आहेस हो पोरी' अशी सुरुवात करून जी माझी लक्तरं टांगायला सुरुवात केली ते ऐकून 'काश ये धरती फटकर मुझे अपने में समा ले' असं वाटलं. जायला निघालो तर मला हात धरून थांबवलं 'जातांयस कुठे, थांब थांब... ' हिने वर आत्त्याला चावी मारली 'अजून सांगा ना ह्याच्या लहानपणीच्या गमती जमती... ' आत्त्याचा पतंग एकदम भरदोल मध्ये उडायला लागला...
आत्या - अगं हा लहानपणापासून असाच आळशी आणि वेंधळा आहे. लहान पणापासून गोडाची फार आवड, म्हणून मी ह्याला लाडाने गोड्या म्हणायचे.
विद्या - अय्या... हा बोलला नाही मला कधी... कित्ती क्युट नाव आहे... गोड्या...
आत्या - आम्ही गिरगावात चाळीत राहायचो तेव्हाची गंमत सांगते, सगळ्या भावंडांच्या मुलांना अंघोळ घालायची मी. आणि हा त्याची वेळ आली की खुर्ची खाली लप, फडताळात शीर असं करून टाळायला बघायचा. एकदा ह्याला पकडून अंघोळ घालताना हात सोडवून जो नागव्याने धावत सुटला चाळभर तो पार अर्ध्या तासाने हातात आला.
मी - अग आत्ते तेव्हा मी २ वर्षाचाही नव्हतो...
आत्या - मला सांगतंयस? मला सांगतंयस? कुले धुतलेत तुझे ह्या हातानी... झोप तर अशी अनावर की कित्येकदा ताटावरच पेंगायला लागायचा. आता तू आलियेस, सुधार त्याला जरा. आम्ही हात टेकले... काय रे, सूनबाईला कुठे घेऊन जातोस की नाही फिरायला? की अजून त्या मध्यासोबतच कट्टा एके कट्टा? मध्ये फोन केला होतान त्याने, म्हणाला... आत्ते ये वेळ काढून राहायला.
मी - वा वा... जातो तर...
विद्या - कोणत्या बायकोला नेतोस? मला तर नाही नेलंस कधी...
मी - अगं असं काय करतेस??? आपण 'रंग दे बसंती' ला नव्हतो का गेलो...
विद्या - ते लग्ना आधी...
मी - आणि परवा बाजारात नेलं होतं ते???
विद्या - बघा ओ आत्या, कसा अरसिक आहे ते, कुट्ठे म्हणून न्यायला नको ह्याला मला.
आत्या - महितिये... आज का ओळखतेय ह्याला... अगं आता बाजारात तरी येतो, लग्ना आधी तर घरातही फिरत नसे. सोफ्यावरच चिकटून असायचा. ते काही नाही गोड्या, बॅगा भरा नि चला माझ्याबरोबर चार दिवस दापोलीस.
विद्या - सहीच... खरंच येतो...
(मला मनापासून कोंकणात राहायला आवडतं, पण ऑफिसची बरीच कामं होती
मी - नको गं आत्या सुट्टी मिळणं शक्य नाही.
आत्या -अरे पुढल्या सोमवारी सुट्टीच आहे ना कसलीशी, चला की तीन दिवस. शुक्रवारच्या रातराणीत बसू. पहाटे दापोलीस. तिथून पुन्हा सोमवार रात्रीची रातराणी पकडलीस की मंगळवारी कामावर जायला हजर.
मी - ह्म्म्म्म्म...
आत्या - अरे ह्म्म ह्म्म काय करतोय शुंभा सारखा...
मी - येतो...


-----------------------------------------------------------------------------------------------

बॅगेत मी फक्त शॉर्टस घेतलेल्या पाहून बायको हैराण झाली 'अग तिथे काय करायचेत कपडे, तिथे गेल्यावर माझा शॉर्टस नि टी-शर्ट हाच गणवेश असतो. तरी बायकोने २ जीन्स टाकल्याच. माझी एक हँडबॅग आणि हिच्या २ सुटकेस असं सामान झालं. मी - अगं शालू नि पैठण्या काय करायच्यात तिथे?
विद्या - वा वा... कुठे कार्याला जावं लागलं तर...
मी - शालू घालून कोंकणातल्या लग्नाला गेलीस तर नवरा मुलगा तुलाच नवरी समजून हार घालेल... हा हा हा... आSSSSS
अंघोळ करून खोलीत कपडे बदलायला आलो तर आत्त्या आत बायकोशी गप्पा मारत होती. तिला म्हटलं जरा बाहेर जा कपडे बदलायचेत तर 'मला लाजतंयस, मला लाजतंयस' म्हणून फिस्कटली.

-----------------------------------------------------------------------------------------------

आपल्याला लहानपणापासून ओळखणारे मोठे आपला कधी, कुठे, कसा पोपट करतील सांगता येत नाही. माझ्या लग्नात बायको मला घास भरवत असताना एका मामाने खवचट पणे भर पंगतीत मोट्ठ्याने ओरडून 'अजून भरवावं लागतं का? ' असं विचारलं होतं. आणि वर स्वतःच ख्यॅ ख्यॅ ख्यॅ करून हसला होता.

-----------------------------------------------------------------------------------------------

गोरेगाव (कोंकणातले) ला बस थांबली तसा मी राष्ट्रकार्य करायला खाली उतरलो. उतरत असताना लवकर ये रे असं मला सांगून आत्याने एकदा मी कसा बाहेर गेलो नि येताना भलत्याच एस. टी. मध्ये कसा चढलो, कशी चुकामूक झाली इत्यादी कहाणी बायकोला ऐकवली.

५:३० ला एस. टी दापोली डेपो मधी शिरली आणि एकदम सगळ्या जुन्या आठवणी दाटून आल्या. ३-४ वर्षांनी येत असल्याने जुनी ओळखीची ठिकाणं शोधत शोधत घराकडे प्रवास सुरू झाला होता. पप्या गाडी घेऊन आम्हाला आणायला आला होता. दापोली-आसूद ८ किमी चा घाटातला वळणा-वळणाचा रस्ता. मागच्या काही वर्षात कोंकण बरंच बदललं होतं. आणि लोकंही. मातीचे रस्ते जाऊन आता डांबर आलं होतं. पूर्वी आड-वळणाला गल्लीत असणारा असणारा बार आता हमरस्त्यावर आला होता. आम्ही पहिल्यांदा आलो तेव्हा आसूद एक लहानसं गाव होतं. केशवराज आणि व्याघ्रेश्वर हे दोन देव आणि मुरुड अथवा हर्णेला जाताना तिठ्यावर लागणारा आसूद पुल हीच गावाची ओळख होती.

घरी आल्यावर दारातच आमचं स्वागत केलं आंब्याच्या जुन्या झाडानं. हे झाड आत्त्याच्या सासूबाईंनी लावलं होतं, पुढल्या पिढीला फळं मिळावीत म्हणून. लहानपणी आम्ही ४-५ भावंड आत्त्याकडे आलो की झाडावर दगड मारून आंबे पाडणं हा आमचा आवडता छंद असे. २०-२५ दगड मारले की एखादा आंबा पडायचा. कधी कधी झाडावर चढायचो. आत्या कायम ओरडायची 'अरे घरात पडलेत हवे तितके आंबे, वांदरांसारखे झाडावर काय चढताय? ' एकदा काकांनी समजावलं 'बाळांनो, झाडाला दगड मारू नका, त्यालाही लागतं. ' त्या नंतर आमचं दगड मारणं बंद झालं. झाडाला लागतंय म्हणून नव्हे, तर एके दिवशी झाडाने रागावून आपल्याला फांदी मारली तर पाठीचं काय होईल म्हणून.

आसूदच्या घरी कार्यक्रम ठरलेला असायचा. सकाळी म्हशींना घेऊन नदीवर जायचं, त्यांच्या सोबतच डुंबायचं, घरी आलं की मस्त पैकी मेतकूट भात, तूप, लोणचं आणि ताकातला पापड खाल्ला की अंगणात क्रिकेट खेळायला मोकळे. घरचा हरकाम्या बाबू आम्ही बॅट आपटून आपटून सारवलेल्या जमिनीला खड्डे पाडतो म्हणून आमच्यावर खेकसायचा. जेवणा आधी काकांसोबत वाडीला पाणी घालायचं. दुपारी आत्याने जेवायला काहीतरी खास केलेलं असायचं. तशी पानगी मी नंतर कुठेही खाल्ली नाही.

उन्हं कलली की मग आसूद पुलावर जाऊन जोश्यांच्या हॉटेलात यथेच्छ मिसळ चापायची. लहानपणी ती कायम तिखट लागायची. मग काका बरणीतले पेढे काढून देत. एकदा आमच्या ढकलाढकलीत एका खुर्चीचा हात मोडला. तो नोकराने उचलून एका कपाटामागे ठेवला. २ वर्षांनी पुन्हा गेलो तर खुर्चीही तशीच होती आणि कपाटा मागे ठेवलेला हातही तिथेच होता. रात्र झाली की भुतांचा गोष्टी ऐकता ऐकता झोप लागायची. मग काका एकेकाला उचलून गादीवर ठेवत. कधी कधी रात्र-रात्र भर पत्त्यांचे डावही चालत. पहाट झाली ही बर्वे बुवांचे दूरून ऐकू येणारे अभंग पार काळीज चिरत जात.

ह्या सगळ्या आठवणी क्षणार्धात डोळ्यासमोरून झर्रकन सरकल्या आणि मी अभावीतपणे हसलो. बायकोने बघितलं. ती ही माझ्याकडे बघून समजल्यासारखं हसली.

पहिली बायको

| Labels: | Posted On 6/25/08 at 5:32 PM



माणूस आपलं पहिलं प्रेम विसरत नाही असं म्हणतात. त्यावर माझा आता १००% विश्वास बसलेला आहे. माझंही माझ्या पहिल्या प्रेमाच्या बाबतीत असंच झालं. बाइक घेईन तर RX100 च असं मी बऱ्याच आधी ठरवलं होतं. पण मला सायकल चालवताना पाहूनच बाबांनी मला बाइक घेऊन द्यायची नाही असं ठरवलं होतं. 'सायकलला २ चाकं असतात हे विसरलात का चिरंजीव? ' पासून ते 'अरे आधी सांगितलं असतंस तर पुढचं चाक विकतच घेतलं नसतं' इथपर्यंत अनेक टोमणे मारले. त्या नंतर बरीच वर्ष कधी बाइक ची गरज भासली नाही. पण मला एका आडनिड्या ठिकाणी असलेल्या ऑफिस मध्ये नोकरी लागली आणि बाइक शोध सुरू झाला. पण RX100चं प्रोडक्शन बऱ्याच आधी बंद झाल्याने नवीन बाइक घेता येणार नव्हती. गॅरेज मध्ये गेलो तर 'आज काल RX100 कोण विकतं साहेब? ' असं ऐकायला मिळायचं. आशा मावळत चालली होती. बाजूने जाणाऱ्या दुसर्यांच्या RX कडे रोड रोमियो सारखं टक लावून बघणं सुरू झालं होतं. आणि अशातच एके दिवशी मित्राचा फोन आला 'एक बाइक आहे, पटकन ये बघायला.' बरं वाटत नाही अशी थाप मारून ऑफिस मधून पळालो. बाइक बघितली. आवडली. पण एक प्रॉब्लेम असा होता ही मला बाइक चालवता येत नव्हती. त्यामुळे मग दुसऱ्या मित्राला घेऊन पुन्हा बाइक दर्शन करून आलो. त्याने नीट तपासणी करून बाईकचं हृदय, आतडी वगैरे ठीक आहेत, घेऊन टाक, असा सल्ला दिला. घेऊन टाकली. पहिल्या रात्री जेव्हा बाइक घरासमोर उभी होती तेव्हा मला एक मिनिटही झोप लागली नाही. कधी एकदा सकाळ होतेय आणि कधी एकदा हिला चालवतोय असं झालं होतं. दुसऱ्या दिवशी पासून त्या मित्राने अनलिमिटेड चहा सिगरेटच्या बदल्यात मला बाइक शिकवायला सुरुवात केली.

मी जुनी बाइक घेतली हे बघून बऱ्याच अजाण लोकांनी नाकं मुरडली. पण आता मी आहेच 'मल्लीका सोडून रेखा आवडणाऱ्या कॅटेगरी'तला त्याला कोण काय करणार. ज्यांना ही काय चीज आहे हे माहिती होतं त्यांनी मात्र माझं कौतुकंच केलं. जॅपनीज इंजिनियरिंग म्हणजे काय ह्याचा ही बाइक अत्यंत योग्य नमुना होती. साऊंड, सुसाट पिक-उप, वजनाला हलकी असं सॉलिड काँबिनेशन होतं.

हळू हळू मी आणि माझ्या बाइक मध्ये एक इमोशनल बाँड तयार होत होता. व्यवस्थित चालवता यायला लागल्यावर मी जुन्या दिसणाऱ्या बाइकचा काया पालट करायचं ठरवलं आणि बाइक गॅरेज मध्ये नेऊन टाकली. १५ दिवसांनी बाइक जेव्हा चकाचक होऊन आली तेव्हा मला काय वाटलं हे शब्दात सांगणं शक्य नाही. त्यानंतर मात्र माझी बाइक कायम त्याच कंडिशन मध्ये राहिली. सदैव चकाचक.

ह्या बाइक वर मी प्रचंड भटकलो. तीन साडे तीन वर्षात १, ००, ००+ किमी ची भटकंती केली. कोंकण फिरून आलो. रात्री अपरत्री मुंबई लोणावळा दीड तासात असले आचरट प्रकारही केले. ह्या एवढ्या प्रवासात हिने मला एकदाही दगा दिला नाही. नियमाला अपवाद म्हणूनही नाही. आयुष्य बाइकमय झालं होतं.

आणि एके दिवशी दुधात मिठाचा खडा पडावा तशी माझी बाइक कुणीतरी चोरली. त्या दिवशी माझ्या चेहऱ्यावरचा माज पहिल्यांदा उतरलेला पहिल्याचं लोकांनी सांगितलं. गणपतीचा धावा करणं सुरू झालं. कुठे तरी पडलेली, सोडलेली दिसेल अशी आशा करत होतो. पोलिसात कंप्लेंट नोंदवली होतीच. त्यांनाही रोज फोन करून पिडणं सुरू झालं. मला धीर द्यायचा सोडून एका पोलिसाने मला स्पष्टपणे सांगीतलं 'चोरीला गेलेली RX100 परत मिळाल्याचे अगदी हातावर मोजण्या इतके अनुभव आहेत. तेव्हा तू बाइक परत मिळण्याची आशा सोडून दे.' माझं बाइकवर असलेलं प्रेम माहिती असल्याने घरचेही हळहळले.

पण मनापासून प्रार्थना केली तर देव नक्की ऐकतो ह्याचा प्रत्यय आला आणि बरोब्बर ११व्या दिवशी मला 'बाइक मिळाली आहे' असा पोलीस स्टेशन मधून फोन आला. ह्या सगळ्या प्रोसेस मध्ये पोलीसांचं उत्तम सहकार्य मिळालं आणि एका आठवड्यात बाइकचा ताबा मिळाला. पण हे ११ दिवस मी अक्षरशः तळमळत काढले. रात्री मध्येच उठून गॅलरीतून डोकावून बघायचो स्वतःहून आली का घरी म्हणून. सुरुवातीचे २-३ दिवस झोपच आली नाही.

बाइक मिळाली आणि आयुष्य पुन्हा एकदा मार्गावर आलं. त्या नंतर थोड्या दिवसांनी मी अजून एक RX घेतली. आता जुन्या बाइक ला फारच जपत होतो. मित्रही २-२ RX आहेत म्हणून हेवा करत होते. फार थोडे अतिशय जवळचे मित्र सोडले तर मी दुसऱ्या कुणालाही कधीही बाइक चालवायला दिली नाही. लोकं वैतागायचे, जोशा माजलाय म्हणायचे.

मी बाइकशी गप्पा मारायचो. सकाळी सकाळी बाइक सुरू केली की फायरिंग ऐकून कळायचं की आज हिचा मूड कसा आहे. पण फार काळ एकत्र रहायचं आमच्या नशिबात नसावं बहुतेक.

मी बँगलोर ला यायच्या थोड्याच आधी माझा अंधेरी जवळ माझा एक मोट्ठा अपघात झाला. ७० च्या स्पीड नि सुमो मध्ये मागून घुसलो. नशिबाने मी कायम हेल्मेट, जॅकेट, ग्लोव्हज घालत असल्याने मला थोडंसंच खरचटलं. पण बाइक चालवण्या पलीकडे गेली होती. तात्पुरती डागडुजी करून बाइक घरी आणली आणि मनावर दगड ठेवून थोड्या दिवसांनी विकून टाकली. पुन्हा त्या नंतरचे २ दिवस मला झोप लागली नाही.











आयुष्याचे नाटक - प्रवेश पाचवा

| Labels: | Posted On 6/24/08 at 7:45 PM

प्रवेश पाचवा - खुळ्यांची खुळं





पु. लं. नि सांगितल्या प्रमाणे स्त्रियांची म्हणून पुरुषांनी चालवलेली जी मासिकं असतात त्यातलंच एक वाचून विद्याला तिचं वजन उंचीच्या प्रमाणात जास्त आहे असा साक्षात्कार झाला आणि घरात फिटनेसचं वारं वाहू लागलं. 'पण तुझं वजन रुंदीच्या प्रमाणात बरोबर आहे... ख्यॅ ख्यॅ ख्यॅ... ' असं त्यावर मी म्हटल्याने बदला म्हणून हे फिटनेसचं झेंगट माझ्याही मागे लावण्यात आलं.

मी अगदीच हार्ड नट असल्याने जीम मध्ये नाव नोंदवण्यास सरळ नकार दिला. काही वर्षापूर्वी मी आणि मध्याने जीम मध्ये नाव नोंदवलं होतं. ३ महिन्याची फी भरली. पैसे भरले की झक मारत जाऊच हा आमचा विश्वास पार बुडीत निघाला आणि आठवड्या भरात आमची जीम बंद झाली. त्यानंतर काही महिन्यांनी आता वाट्टेल ते झालं तरी जायचंच असं ठरवून पुन्हा ३ महिन्यांचे पैसे भरून आलो. आणि पुन्हा आठवड्याभरात जीम बंद. तिसऱ्यावेळी गेलो तेव्हा शेवटी सर म्हणाले 'तुम्ही आधी आठवडाभर फुकट या. त्यानंतरही आलात तरच पैसे भरा. ' ती वेळ अर्थातच आमच्यावर कधी आली नाही.

हा अनुभव मी विद्याला ऐकवल्याने व्यायामाची सुरुवात चालण्यापासून करावी असे तिने आणि संध्या ने ठरवले. पहिल्या दिवशी सोडायला चल असं म्हणून हिने मला पहाटे उठवलं. 'बागेत चालायला जायचं तर तिथपर्यंत सोडायला गाडी कशाला हवी. चालतच जा की. ' हा सल्ला धुडकावून ती पंखा बंद करून निघून गेली. मध्याही संध्याला सोडायला आला होता. थोड्यावेळाने ह्या घामाघूम होऊन बाहेर आल्या तेव्हा आम्ही बागे समोरच्या हॉटेलात बसून जिलबीवर ताव मारत होतो. ते बघून संध्याने टोमणा मारला 'वा... बायका आत घाम गाळतायत आणि तुम्ही इथे जिलब्या हाणताय... ' त्यावर लगेच मी प्रती टोमणा दिला 'मॅडम रोज १२-१२ तास योगासनं करतो. शवासन आणि मकरासन आलटून पालटून... हा हा हा... ' उत्तरा दाखल मला अंगठा आणि मधलं बोट मुडपून पेरांच्या हाडांनी चिमटा काढण्यात आला.

संध्याकाळी येताना विद्या स्किपींग रोप्स घेऊन आली. आज पायांचा व्यायाम झाला आता उद्या खांदे आणि हातांचा व्यायाम होण्यासाठी दोरीच्या उड्या मारणार. दुसऱ्या दिवशी अचानक ६ वाजता धप्प... धप्प... धप्प... अशा आवाजांनी जाग आली. घाबरून जागा झालो तर बेडच्या बाजूला विद्या दोरीच्या उद्या मारत होती. 'अगं बिल्डिंग जुनी झाली आहे आपली' हे ओठांशी आलेलं वाक्य मी पुन्हा पंखा बंद होईल ह्या भीतीने मी गिळलं. पुढल्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा त्यांचा चालायचा व्यायाम आणि आमची जिलबी. दुकानदार जुन्या ओळखीचा असल्याने त्याने ऐकवलंच 'अरे बायको बरोबर येते त तुम्ही पन चालते का नाय? त्यावर मध्याने ऐकवलं 'आमी चालते त तुज्या जिलब्या कोन खाते??? ' देवाच्या कृपेने त्यांचं हे फिटनेसचं खूळ लवकरंच उतरलं आणि आमची सकाळची जिलबी बंद झाली. काही दिवस शांततेत गेले.

पण स्वस्थ म्हणून बसायचं नाही असा काही बायकांचा स्वभाव असतो. त्यानुसार फावल्या वेळात बिल्डिंग मधल्या मुलांना शिकवण्याचं खूळ हिच्या डोक्यात शिरलं. मुलांच्या आयांनी पण दुसरी कडे जाऊन काय हवा तो दंगा करू दे म्हणून आनंदाने परवानगी दिली. पण शिकवायचं काय हा प्रश्न होताच, कारण सगळी मुलं वेगवेगळ्या इयत्तेतली होती. त्यावर आपण संस्कारवर्ग सुरू करू असं ठरवण्यात आलं. मदतीला अर्थातच संध्या.

त्यानुसार रवीवारी सकाळी ७ वाजता ५-६ आयांनी आप-आपली कार्टी आमच्या घरी आणून सोडली आणि स्वतः झोपायला निघून गेल्या. आमच्या खालच्या साठे काकांचा अक्षय आला नि डायरेक्ट माझ्या शेजारी पांघरुणात शिरला. थोड्यावेळाने बायको त्याला शोधत शोधत बेडरूम मध्ये आली.

ऊठ ना रे सोन्या...

उं हूं...

शहाणी बाळं झोपतात का इतक्या वेळ...

ऍडी काका झोपलाय की...

अरे तो कुठे बाळ आहे... (तो कुठे शहाणा आहे हे शब्द तिने मुश्किलीने आवरले असावेत)

मी पण मोठा झालोय...

बघ बाहेर सगळे जण किती मजा करतायत...

(मी हळूच पांघरून वर करून बघितलं तर अक्षयची धाकटी बहीण खुर्चीवर पेंगत होती, नि एक मुलगा सूर्यनमस्काराच्या ६व्या आसनातच हात लांब करून झोपला होता)

काय करतायत???

तू बघ तर येऊन...

नंतर बघतो...

हा आता ऐकत नाही म्हणून बायकोने त्याला उचलून न्यायचे ठरवले. तिची थोडी गंमत करावी म्हणून मी पांघरुणाखालून हात घालून त्याला धरून ठेवला. ते बायकोला कळलं असावं म्हणून ती म्हणाली 'ऍडी काकाला घेऊन आलास तर तुला चॉकलेट देईन. ' लगेच सोडलं त्याला. त्यानंतर बाहेर अर्धा तास प्रचंड रडारड आणि कल्ला करून मुलं आप आपल्या घरी निघून गेली.

अक्षयचे बाबा अरविंद मला २ वर्षच सीनियर. तो पण माझ्या सारखाच निशाचर आणि सूर्यवंशी. ह्या बिल्डिंगच्या पाण्यातच काहीतरी आहे राव. दुपारी कट्ट्यावर जायला निघालो. बऱ्याच दिवसात गप्पा झाल्या नव्हत्या म्हणून त्यालाही सोबत न्यावे असा विचार करून बेल वाजवली तर साठे आजींनी दार उघडलं.

मला बघून मिष्किल पणे विचारलं 'काय रे??? खु खु खु खु... '

काय झालं आजी...

मला काय होणारे??? तुम्हाला काय झालंय???

मला कुठे काय झालंय...

नाही... मुलं सांभाळायचा सराव सुरू झालाय म्हणून विचारलं हो...

असं काही नाहीये हो आजी. अजून किमान वर्षभर तरी विचार नाही...

अजून वर्षभर??? अरे अजून थांबलास तर मुलाला घेऊन फिरताना मुला ऐवजी नातू समजतील हो लोकं त्याला... खु खु खु खु

ह्यांच्या नातवाच्या वेळी मध्याने मोट्ठा किस्सा केला होता. नातवाच्या बारशाला आम्ही जमलो असताना त्यांनी नातवाच्या जिभेवर मधाचा थेंब लावला. का लावला म्हणून विचारल्यावर म्हणाल्या 'ह्याने मूल हुशार आणि चटपटीत होतं' त्यावर आगाऊ मध्याने 'अरविंदला लावलं नव्हतं का? ' असं विचारलं. अरविंदला ओळखणारी लोकं, त्याचे बाबा, स्वतः अरविंद आणि खुद्द त्याची बायकोही मोट्ट्याने खो खो करून हसले होते. पण त्यानंतर साठे आजींनी 'माधव अतिशय आगाऊ कार्टा आहे, त्याची साथ सोड. ' असं मला हजार वेळा तरी ऐकवलं असेल.

बायकोचे हे संस्कार वर्गही लवकरच बंद पडले. आता पुढे काय होतंय ही धास्ती होतीच. पण सुदैवाने तसं काही झालं नाही. थोडे दिवस घरात शांतता होती.

आणि एके दिवशी अचानक शांत समुद्रात वादळ यावं तसं आमच्या घरात सुना आत्त्याचं आगमन झालं.

आयुष्याचे नाटक - प्रवेश चौथा

| Labels: | Posted On 6/20/08 at 11:05 PM

प्रवेश चौथा - रियरव्ह्यू मिरर




लग्नाळूपणाला मी आता बऱ्यापैकी सरावलोय. पॉकेट मनी ५, ००० वरून ५, ५०० झालाय. बायकोच्या म्हणण्यानुसार शेपूट अजून पूर्णं सरळ झालेलं नाहीये. पण माझ्या आणि उरलेल्या ४ पांडवांच्या मते मी बराच सुधारलोय. शनिवार, रविवार ९ ला उठतो, स्वतःच्या पांघरुणाची घडी स्वतः घालतो, ऑफिसमधून आलो की मोजे बुटात आणि बूट शू-रॅक मध्ये ठेवतो, चहा पिऊन झाला की कप-बशी विसळून ठेवतो, एक दिवसा आड दाढी करतो (इथे मी भिंतीवर डोकं आपटतोय अशी कल्पना करा) आणि अशाच अजून तत्सम वाईट सवयी मलाही लागत आहेत. थोडक्यात, ऍड्याचा ऍडमीकी व्हायला सुरुवात झालेली आहे (बायको, दुसरं कोण? ).

एका शुक्रवार संध्याकाळी आम्ही कट्ट्यावर बसून आमच्या मौलिक विचारांची आदान प्रदान आणि आमचं जीवना विषयीचं भन्नाट तत्त्वज्ञान वाटत बसलो होतो. आज आमच्या सोबत मध्याचा मावसभाऊ गंट्या आपटे पण होता. गंट्याने मराठीत यम ये केलंय. आपण ह्या जगात थोडे उशीरा आल्याची त्याला खंत आहे. त्याला मनातून समाजवादी व्हायचं होतं. पण आज-काल समाजवाद्यांना कुणी विचारत नाही असं त्याचं म्हणणं आहे. आणि एकंदरीत त्याची शरीरयष्टी व खाण्या-पिण्याच्या सवयी बघता त्याने तो विचार तूर्तास बाजूला ठेवलाय. त्यामुळे आतून समाजवादी पण बाहेरून भोगवादी असं दुहेरी आयुष्य जगताना गंट्या दिसामासाने वाढतोय. त्या विषयावर छेडलं तर 'अरे वाढीचं वय आहे माझं' असं सांगून मोकळा होतो.

असो. तर असे आम्ही कट्ट्यावर बसलो असताना एकदम विंचू चावल्या सारखा अथवा झोपेतून अकाली उठवल्यासारखा गंट्या ओरडला.

गंट्या - माणूस लग्न का करतो.???

एक आवाज - अरे कामवाल्या बायकांचे भाव किती वाढलेत आज-काल...

आम्ही सगळे कोरस मध्ये चमकलो. हे आतलं गुपित भर दिवसा, सार्वजनिक ठिकाणी, चार लोकांसमोर मोट्ट्याने ओरडून सांगण्याची हिंमत असलेला हा थोर महापुरुष कोण हे पाहण्यासाठी आवाजाच्या दिशेने माना वळवल्या. पाहतो तर एक माणूस दुसऱ्या कुणाशीतरी फोन वर बोलत होता.

गंट्या - माणूस लग्न का करतो.???

आम्ही सगळे गप्प.

गंट्या - मी सांगतो.

मी - गंट्या, गंटुड्या, गंटोब्या, माझ्या सोन्या, माझ्या गोंडस गुलाबा... तुझं लग्न कुठे झालंय अजून.

गंट्या - म्हणूनच मी ह्या विषयावर अधिकारवाणीने बोलू शकतो. सोसायटीच्या टीम मध्येही क्रिकेट न खेळून सुद्धा तुम्ही गांगुलीने कसे शॉट्स मारावेत हे सांगता ना? तर फंडा असा आहे, श्री श्री डार्वीन महाराज इंग्लंडकर ह्यांच्या मते माणूस हा पूर्वी एप सदृश प्राणी होता.

विज्या (मध्याकडे बघत) - पूर्वी???

मध्या - चड्डीत राहा बे साल्या...

गंट्या - अजाण बालकांनो गप्प बसा. मध्ये मध्ये बोलू नका. तर सगळ्या प्राण्यांमध्ये सगळ्यात आळशी प्राणी माणूस आहे. आणि माणसांमधला सर्वात आळशी प्राणी म्हणजे पुरूष.

मध्या, विज्या, विन्या (माझ्याकडे बघत) - खरंय...

मी - चड्डीत राहा बे साल्यांनो... असं काही नाही गंट्याशेट. सगळे पुरूष असे नसतात.

गंट्या - बSSSSरं... आता आपण तुझंच उदाहरण घेऊया. तू हॉल मधल्या सोफ्यावर बसल्या बसल्या दात घासतोस, चहा पितोस, नाश्ता करतोस, पेपर वाचतोस, TV बघतोस, जेवतोस, Laptop घेऊन chatting करतोस (मी - अरे Laptop असतोच त्यासाठी) दुपारी TV सुरू ठेवून झोपतोस. म्हणजे तू फक्त झोपायला जाताना आणि अंघोळ करताना त्या सोफ्यावरून बूड उचलतोस.

मी - साल्यांनो तुम्हाला गेम करायला दर वेळी मीच भेटतो का? गंट्या उगाच काहीतरी फेकू नकोस.

गंट्या - मी फेकतोय? बSSSSरं. आता तू नि ह्या मध्याने प्रेमविवाह केलात. प्रेम केलंत ठीक आहे. समजू शकतो. घरातल्या मांजरांनाही प्रेम लागतं. पण विवाह का केलात?

मी - त्याचं असं आहे बाळा, तू अजून दुपट्यात आहेस. थोडा मोठा झालास की सांगीन नक्की.

विन्या - सांग रे. मलाही तुमच्या प्रेमप्रकरणात इंटरेस्ट आहे. ताईला विचारलं होतं. ती म्हणाली 'थोबाड फोडीन, CET चा अभ्यास झाला का? '. पण तू आपला माणूस आहेस बॉस. सांगून टाक तुमची प्रेमकहाणी.

मी - अबे ए साल्या, मी तुझ्या बहिणीचा नवरा आहे. आदराने वाग.

विन्या - सारी दुनिया एक तरफ, जोरू का भाई एक तरफ ही म्हण ऐकली आहेस का?

मी - बSSSSरं. सांगतो. सांग रे मध्या.

मध्या - तू 'शान' पिक्चर पहिलायस का? त्यात एक डायलॉग आहे. फोन से आवाज सुननी हो तो पहले कॉईन डालना पडता है.

मी (एक नाणं काढत) - ये ले. घे टाकून नि कर भुंकायला सुरुवात.

मध्या - तर मित्रहो, आमच्या दोघांचा प्रेमविवाह.

गंट्या - पुढे बोल. आम्हाला सगळ्यांना हे जाणून घ्यायची उत्सुकता आहे की विद्या आणि संध्या सारख्या गुणवान मुलींनी तुमच्यात काय पहिलं.

विज्या - मला नाहीये. मी असं कधीही म्हणालो नाहीये.

गंट्या - अरे आम्ही म्हणजे आदरार्थी एकवचन रे सोन्या. बोल तू मध्या.

मध्या - आम्ही लास्ट इयरला असताना संध्या आणि विद्यानी कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. आमची पहिली भेट झाली कॉलेजच्या गेट वर.

पहिला दिवस असल्याने रॅगींग करण्यासाठी आम्ही ज्युनीयर्सना गेट वरच पकडत होतो. ह्या दोघींनी घाबरत घाबरत कॉलेज मध्ये एंट्री घेतली आणि बघता क्षणीच मला संध्या आणि ह्याला विद्या आवडली. आम्ही आमच्या कंपूला ह्यांना जाऊ दे अशी खूण केली. त्या दोघी दबकत दबकत आता अडवतील मग अडवतील अशी धाकधूक बाळगत निघून गेल्या. त्यानंतर आम्ही सगळ्यांना तंबी दिली. ह्या दोघींकडे बघाल तर हात कलम केले जातील.

मग सुरू झाला एक जीवघेणा प्रवास. जीवघेणा अशासाठी की सुरुवातीला आम्हाला ह्या दिसायच्याच नाहीत. मग कळलं की ह्या पहिल्या लेक्चरच्या १० मिनिटं आधी येतात, सगळी लेक्चर्स अटेंड करतात आणि आम्ही कँटिन मध्ये पडीक असताना कॉलेज सुटलं की निघून जातात. त्यामुळे मग दुसऱ्या दिवशी पासून आम्हीही पहिल्या लेक्चरच्या वेळी कॉलेजला जाऊ लागलो. आई खूश झाली. बाबांना संशय आला.

ह्यांना बघण्यासाठी कॉमर्सला असून आम्ही आर्ट्सची लेक्चर्स अटेंड करू लागलो. पण गाडी पुढे सरकत नव्हती. आम्ही कितीही स्मार्ट, बिनधास्त असलो (इथे कोरस मध्ये हशा आला) तरी मुलींशी बोलायचं म्हणजे हात-पाय थरथरायला लागायचे. त्यामुळे ४ महिने झाले तरी आमची ओळख नव्हती झाली.

पण ती संधी लवकरच आली. आणि ह्या नालायक ऍडी नि त्या संधीची माती केली.

(इथे अचानक सगळ्यांचा इंटरेस्ट वाढला. सगळे कान टवकारून ऐकू लागले. )

मी कॉलेजच्या सांस्कृतिक मंडळाचा धडाडीचा कार्यकर्ता असल्याने (इथे पुन्हा कोरस मध्ये हशा आला) त्यांच्याशी आमची ओळख झाली. म्हणजे आधी माझी त्या दोघींशी झाली आणि मग मी मग ह्याची करून दिली. त्याबद्दल कबूल केलेली पार्टी ह्याने अजून मला दिलेली नाहीये. असो.

संध्या आणि विद्या दोघींना अभिनयाची आणि गाण्याची आवड. त्यामुळे त्यांनी नाटकात आणि वाद्यवृंदात भाग घेण्यासाठी इच्छुक म्हणून नाव नोंदवलं. त्यांचं दोन्ही कडे सिलेक्शन व्हावं म्हणून आम्ही देवाची प्रार्थना करत होतो. कारण मग त्या नंतर आम्हाला आपसूकच तयारी साठी म्हणून त्यांच्या सोबत वेळ घालवता येणार होता.

एलीमीनेशन राउंडाला जे सर होते त्यांना जुनी गाणी आवडत असल्याने मी संध्या आणि विद्याला म्हणालो एखादं जुनं गाणं म्हणा. त्यावर संध्या नाक फेंदारून म्हणाली 'तुला काय करायचंय? ' तिने कुठलं तरी नवीन गाणं म्हटलं. पण आवाज चांगला असल्याने दोघी सिलेक्ट झाल्या. माझा जीव भांड्यात पडला. सरांनी सिलेक्ट झालेल्या लोकांची नावं वाचून दाखवताना तिचं नाव वाचल्यावर मी हसून तिच्याकडे बघितलं. तिने पुन्हा एकदा नाक फेंदारून 'हूं' केलं.

फायनल लिस्ट बोर्डावर लावण्यासाठी मी तयारी करत होतो. ह्या माठ ऍडीला सोबत घेतलं होतं. विद्याच्या ID कार्डची झेरॉक्स हातात आल्यावर आधी हा १० मिनिटं बघतच बसला आणि शेवटी ह्याने Vidya हे नाव मराठीत लिहिताना 'विड्या' असं लिहिलं आणि मी ती लिस्ट न बघता नोटीस बोर्डावर चिकटवली. आणि दुसऱ्या दिवशी कॉलेज मध्ये जो ठणाणा झालाय त्याला तोड नाही. आम्ही कॉलेज मध्ये पाऊल ठेवायच्या आत आम्हाला खबर आली 'मराठीचे जोशी सर तुम्हाला शोधतायत'. आम्ही थोडे गोंधळात पडलो. कॉमर्सच्या पोरांना जोशी सरांनी का शोधावं? जोशी सर आमच्या कॉलेजचे उप-मुख्याध्यापकही होते. एकदा वाटलं आपण आर्ट्सच्या लेक्चर्सना बसतो हे त्यांना कळलं असेल. नंतर वाटलं कॉलेज-डे संबंधी काही बोलायचं असेल. शेवटी जे असेल ते असेल, देख लेंगे, असं म्हणून आम्ही त्यांच्या केबिन मध्ये गेलो.

इथे मी मध्याला थांबवला 'आता मी सांगतो'.

तर, आम्ही जोशी सरांच्या केबिन मध्ये गेलो. आणि आत जाऊन बघतो तर आत ह्या दोघी बसल्या होत्या. आम्हाला काही उलगडा होईना. सर म्हणाले 'बसा जोशी, बसा रानडे. ' आम्ही बसल्यावर त्यांनी मला आणि मध्याला एक कागद दिला. मी वाचलं तर त्यावर इंग्रजीत Vidya लिहिलं होतं. माझी टरकली. म्हटलं ह्यांना कसं कळलं. मध्याच्या कागदावर संध्या असेल असं वाटलं म्हणून बघितलं तर त्याच्यावरही Vidya च लिहिलेलं होतं. आत तर फुल्ल वेड लागायची पाळी. इथे ह्या दोघी आमच्या कडे आम्ही क्षुद्र जंतू असल्यासारख्या बघत होत्या. तेव्हढ्यात सरांनी दुसरा कागद दिला. तो कोरा होता. पेन दिलं नि म्हणाले लिहा तो शब्द मराठीत. मी ह्यावेळी बरोबर 'विद्या' लिहिला. मध्याने गोची केली. त्याने Vidya मराठीत तीन वेग वेगळ्या प्रकारे लिहिला.

सर - काल नोटीस बोर्डावरची लिस्ट कुणी बनवली?

मी - मी. म्हणजे मध्या... माधवनी मला झेरॉक्स दिल्या, मी नावं लिहीली.

सर - अरे काय हे. आज बरोबर लिहिलेलं हेच नाव काल तू 'विड्या' असं का लिहिलंस कळू शकेल काय?

मी उडालोच. अशी चूक माझ्या कडून होणं शक्यच नाही असं मनात आलं होतं, पण तेव्हढ्यात सरांनी लिस्टची कॉपी मला दाखवली. मनात म्हटलं 'चांगलाच पोपट झाला राव'.

मी - सर, चूक झाली. माफ करा.

सर - मला काय सांगताय? हिला सांगा.

मी - विद्या बाई, माझ्या हातून चूक झाली. मला माफ करा.

विद्या - पण तुझ्या मुळे मला सकाळ पासून सगळे चिडवतायत त्याचं काय?

मी - कोण चिडवतंय नाव सांग.

विद्या - तुला काय करायचंय?

मी - नाव तर सांग ना

विद्या - मग तू काय करशील. मारशील त्यांना जाऊन?

मी - ते काय करायचं हा माझा प्रश्न आहे. तू फक्त नाव सांग. (आता झालेल्या अपमानामुळे मी जरा वैतागलो होतो आणि त्यात ही आगाऊपणे उत्तरं देत होती. ) मी त्यांना मारीन नाही तर गोळा करून पार्टी देईन.

आता संध्या मध्ये पडली - बघ, मी म्हणाले नव्हते तुला. हा ह्यांचाच प्लॅन आहे. ते सगळे ह्यांचेच मित्र आहेत. ह्यांनी सांगितलेलं गाणं म्हणायला आपण नकार दिला म्हणून आपली जिरवतायत ते.

हे ऐकून मध्याही पेटला - वा वा वा... तुम्ही घशातून जे भीतिदायक आवाज काढता त्याला गाणं म्हणत असतील तर ऍडी टॉम क्रूज आहे.

चुकून मध्याने नको त्या शेपटावर पाय ठेवला. आता टॉम क्रूजची पोस्टर्स ह्यांच्या बेडरूम मध्ये आहेत नि तो ह्या दोघींचा मानलेला नवरा आहे हे आम्हाला कसं कळणार?

विद्या - तोंड बघितलंय का आरशात? उर्श्वमुखी कुठचा...

मी - काय कुठचा???

विद्या - तुला काय करायचंय? मी त्याला बोललेय.

जोशी सर - बाळांनो, तुम्ही कुठे आहात ह्याचं भान आहे का तुम्हाला?

आम्ही - सॉरी सर...

विद्या - सर ह्याला आत्ताच्या आत्ता कॉलेज मधून काढून टाका.

मी - हॅ हॅ हॅ... शुद्धलेखनाच्या चुका पेपर मध्ये केल्या तरी काढत नाहीत. आणि मॅडम मी कॉलेजचा G.S. आहे. असल्या फालतू गोष्टीवरून माझ्यावर ऍक्शन घेतली तर लय भारी पडेल.

विद्या - काय करशील??? मारशील मला?

मी - तू सारखी मारा-मारीच्या गोष्टी का करतेयस?

सर - जोशी... शांत व्हा...

संध्या - सर मी एक सुचवू? ह्यांना 'विद्या' हे नाव हजार वेळा लिहायची शिक्षा द्या.

मध्या - काहीही काय...

मी - चालेल... (आणि मध्याला डोळा मारला)

नंतर माझ्या वाटचं हजार वेळा आणि मध्याच्या वाटचं हजार वेळा असं ते नाव मी २ हजार वेळा लिहून काढलं.

तर अशी आमच्या चौघांची आप-आपसात पहिली ऑफिशियल ओळख झाली. त्यानंतर आम्ही कॉलेज-डे च्या तयारी साठी बऱ्याच वेळा भेटलो. पण गाडी काही पुढे जात नव्हती. हे शेवटचं वर्ष होतं. त्यानंतर आम्ही कॉलेजच्या बाहेर पडणार होतो. आता निदान रोज दर्शन तरी होत होतं. पण एकदा बाहेर पडलं की संपलं सगळं.

म्हणून मग आम्ही शेवटी ठरवलं 'बॉस, स्वतः जाऊन स्वतःसाठी प्रपोज करायचा आपल्यात दम नाही. म्हणून मग आपण आता एक मेकांच्या वतीने प्रपोज करायचं. ' त्या प्रमाणे मी संध्याकडे आणि मध्या विद्या कडे गेलो. थोड्यावेळाने मी आणि मध्या एकमेकांना येऊन भेटलो. कुणी काही बोलेचना.

शेवटी मीच धीर करून विचारलं - काय झालं रे?

मध्या - ती म्हणाली, तू तसा बरा आहेस पण जरा जास्त आगाऊ आहेस...

मी - आयला, संध्या पण असंच म्हणाली. पुढे?

मध्या - त्याला सांग, CA कंप्लीट झाल्या शिवाय काही नाही.

मी - आयला, संध्या पण असंच म्हणाली. ह्याचा अर्थ काय?

मध्या - ह्याचा अर्थ असा की आता अभ्यासाला लागायचं.

मग ह्या नंतर पुढची चार वर्षं आम्ही तारेवरची कसरत करत काढली. CA रिझल्ट घेऊन दोघींना भेटायला गेलो. मोठ्या आशेने रिझल्ट दाखवला.

चेहेऱ्या वरची सुरुकुतीही न हलवता विद्या म्हणाली - गुड. पण तू CA झालास म्हणजे मी तुला हो म्हणीन असा अर्थ होत नाही.

माझी नेहमीप्रमाणे सटकलीच - मग आता काय फायनान्स मिनिस्टर व्हायची वाट बघणारेस का?

विद्या - चिडू नको रे...

मी - चिडू नको तर काय तुझी पुजा करू?

विद्या - मला चालेल.

मी - हे बघ, माझं तुझ्यावर प्रेम आहे. बाइक इतकं नसेल पण त्याच्या जवळपास आहे. आणि हे मी मनापासून बोलतोय. ह्या तीन वर्षात मी एकाही मुली कडे बघितलं नाहीये. म्हणजे, तसं बघितलं, पण तसं नाही बघितलं. तुला मी आवडत असेन, काही विचार केला असशील तर मला स्पष्टपणे सांग. नाहीतर...

विद्या - नाहीतर काय???

मी - नाहीतर... मी तुला विचार करायला अजून वेळ देईन...

ह्यावर विद्या जी काही गोड हसलेय की ते बघून काळजाचं पाणी होणं, सुटकेचा निःश्वास सोडणं, पोटात गार वाटणं, जीव भांड्यात पडणं हे सगळं मला एकदमच झालं. मी लगेच मध्याला हुश्श्श्श असा SMS केला आणि तेव्हढ्यात मध्याचा मला हुश्श्श्श असा SMS आला. ह्यापुढचं तर तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे.

कहाणी सांगून झाल्यावर भानावर आलो तर आजू बाजूला अजून जनता जमून टाळ्या वाजवत होती.

गंभीर भाव चेहऱ्यावर आणून गंट्या म्हणाला - हे सगळं ठीक आहे. पण माझा मूळ प्रश्न अजून अनुत्तरितच आहे...

मी - कोणता???

गंट्या - माणूस लग्न का करतो...???

देव

| Labels: | Posted On 6/13/08 at 2:38 PM



(चित्र नेट वरून घेतलंय. चित्रकार कोण हे माहिती नाही, पण त्याची हरकत असेल तर इथून कढण्यात येईल.)




वार गणेशाचा, रांगा ही लागल्या,
अशा लांब भल्या, दर्शनासी.

लांबुनी चालत, गाडीत बसून,
येती भक्त जन, देवळात.

लोक घालवीती, तास पाठी तास,
एका दर्शनास, देवाजीच्या.

आतल्या आत, चिडे गणराय,
म्हणे सांगू काय, निर्बुद्धांस.

वेळ हा वाचवा, सचोटीचा धंदा,
ठेवोनीया श्रद्धा, माझ्यावरी.

कर्म न करीता, येता देवळात,
विचार मनात, जगातले.

इथे फक्त माझी, मुर्ती रहातसे,
समजावे कैसे, अडाण्यांस.

देह इथे परी, मन फिरतसे,
लुबाडावे कैसे, दुसर्‍यास.

पाप करोनीया, देता मला लाच,
मनातली बोच, जात नसे.

घालविता वेळ, नासाडता अन्न,
पावेन मी कसा, हाची प्रश्न.

सत्य आचरणा, पुण्य ही होईल,
देवच येईल, पहाण्यांस.

करा दान धर्म, मला नको काही,
एक हाक खरी, मला खूप.

मनास विचारा, मला आत शोधा,
सपडेन खरा, तुमच्यात.