बंड्याची शाळा - धडा तिसरा

| Labels: | Posted On 3/10/09 at 2:15 PM

बंड्याची शाळा
(धडा तिसरा - मधली सुट्टी)



बाकी सगळ्या विषयांना ४५ मिनिटं आणि मधली सुट्टी फक्त ३० मिनिटं ह्या अन्यायाचं कारण मला अजून सापडलं नाहिये. मुलांना जे आवडतं ते करू द्यायचं नाही हा सर्व शाळांमध्ये अलिखित नियम असावा. पि. टी. चा तास आठवड्यातून फक्त २ दिवस आणि गणित, इतिहास मात्र रोज. कधी कधी तर दोन वेळा. ह्या बद्दल मी दहावीत असताना आमच्या एका सरांकडे खंत व्यक्त केली होती. तेव्हा 'मोठेपणी पि. टी. कामाला येणार नाही. हेच विषय कामाला येतील' असा सल्ला मला देण्यात आला. मास्तरांच्या इतर सल्ल्यांप्रमाणेच हा पण कुचकामी ठरला. रोज सकाळी लोकल पकडताना पि. टी. च्या तासाला मैदानाला मारलेल्या चकराच कामाला येतात. पाढे आणि तहाची कलमं स्टेशनवर उभा राहून मोट्ठ्याने म्हणायला लागलो तर फार फार तर सुट्ट्या पैशांचा प्रश्न सुटेल.

तर, शाळेच्या त्या आठ विषयांच्या रखरखीत वाळवंटात मधली सुट्टी म्हणजे आमचं हक्काचं ओऍसीस होतं. मधल्या सुट्टीच्या घंटेची आम्ही अगदी कानात प्राण आणून वाट पाहायचो. घंटा बडवणारा प्यून आज चुकून १० मिनिटं आधीच बेल वाजवेल अशी रोज आशा वाटायची. पण दहा वर्षात एकदाही असं झालं नाही. नियमाला अपवाद म्हणूनही नाही. मधली सुट्टी फार कमी वेळ असल्याने खेळण्याचा एक क्षणही वाया जाऊ नये म्हणून आम्ही आदल्या तासालाच डबा संपवायला सुरुवात करायचो. तास संपेपर्यंत आमचा डबाही संपलेला असायचा. मधल्या सुट्टीचा तो अर्धा तास हा हा म्हणता संपायचा. इतक्या पटापट बाकीचे तास कधीही संपले नाहीत.

मधल्या सुट्टीत शाळेच्या मैदानावर बरेच खेळ चालायचे. त्यातला सगळ्यात आवडता म्हणजे अर्थातच क्रिकेट. दिवसचे दिवस मॅचेस चालायच्या. कालच्या राहिलेल्या इनिंग्स आज कंटिन्यू व्हायच्या. त्यात कुणी तरी रन्स लिहिलेला कागद बदललेला असायचा, मग त्यावरून मारामारी झाली, १-२ जणांचे शर्ट फाटले की पुढे खेळायला सुरुवात व्हायची. त्यात पुन्हा गोंधळ. कालच्या आणि आजच्या मधल्या सुट्टीच्या दरम्यान काही जणांच्यात भांडणं झाल्यामुळे टीम्सची फेर-रचना व्हायची. इतकं होई पर्यंत पंधरा मिनिटं झालेली असायची.

दुसरा आवडता खेळ म्हणजे मारामारी. ह्यासाठी काहीही कारण लागत नसे. बाईंना नाव सांगितलं पासून ते मला खुन्नस का दिलीस इथपर्यंत काहीही चालत असे. सर्वसाधारणपणे मारामारी करणारेही काही ठरावीक विद्यार्थी असत. मी त्या फंदात कधीही पडलो नाही. कारण मारामारी म्हटलं की मार देण्यासोबतच मार खाणंही आलंच. पण मार खाण्याचा कोटा वर्गात मास्तर आणि घरी पिताश्री इमाने इतबारे पूर्ण करत असल्याने नव्याने मार खाणं नको व्हायचं. आम्ही आपले बाहेरून टाळ्या वाजवायला. दोन आडदांड मुलांना एकमेकांवर दात ओठा खाऊन तुटून पडताना बघण्यात जी मजा असते ती सांगून कळणार नाही. अशी मारामारी सुरू असताना, त्यातल्या एखाद्यावर असलेली खुन्नस काही जण काढून घेत. समोरा समोर मारामारी करायचा दम नसल्याने त्या गर्दीत ज्यानी आपल्याला आधी ठोकलं आहे अशाला गर्दीचा फायदा घेऊन लाथा बुक्के मारत. मग ह्यातून उप-मारामारी सुरू होत असे. वा वा वा. काय नजारा असे तो. १५-२० मुलं घोळक्यात आहेत, कोण कुणाला मारतंय ह्याचा पत्ता नाही, कोण कुणाच्या बाजूने आहे माहिती नाही, मार खाणाऱ्याला आपण मार का खातोय आणि मारणाऱ्याला आपण का मारतोय ह्याचाही बऱ्याचदा पत्ता नसे. पण मजा यायची.

शाळेच्या मैदानावर आम्हाला गोट्या खेळायला सक्त मनाई होती. तरीही आम्ही नियमाला न जुमानता एखादा कोपरा पकडून गोट्या खेळतच असू. त्यातले आवडते प्रकार म्हणजे दहा-वीस, राजा-राणी आणि ढुस्स. ह्यात पुन्हा चिटींग आणि मारामारीला ऊत यायचा. नेम धरताना बोट जमिनीला न टेकवणे, वीत घेताना अंतर ढापणे, गोटी शेजारी उभं राहून पायाने हळूच गोटी पुढे सरकवणे इत्यादी प्रकारांवरून यथेच्छ भांडणं व्हायची. चार आण्याला १० मिळणाऱ्या गोट्यांवरून इतकी मारामारी करायचो हे आठवून आज हसू येतं. पण त्यावेळी ती एक गोटी म्हणजे जगण्या-मरण्याचा प्रश्न असे.

पुढचा आवडता उद्योग म्हणजे बोरं आणि चिंचा पाडणे. शाळेच्या आवारात आंब्याचं झाड होतं. पण त्याला हात लावायची कुणाच्यातही धमक नव्हती. एकदा मी मला झाडावर चढता येतं हे दाखवण्यासाठी त्या झाडावर चढलो. त्यावेळी खरं तर आंब्याचा सीझनही नव्हता, पण पैज लावून चढलो. आणि नेमके त्याच वेळी आमचे पि. टी. चे सर मैदानात आले. माझी वर पार म्हणजे पारच तंतरली. साक्षात यम आणि त्याचा रेडा एका शरीरात एकजीव होऊन समोर आल्यावर अजून काय होणार? सरांनी मला प्रेमाने खाली उतरायला सांगितलं "जोशा, माकडा सारखा वर काय चढलायस, पाच मोजायच्या आत खाली उतर. " मी काही ऐकलं नाही. कसा ऐकेन? साक्षात सिंह आणि अजगर एका शरीरात एकजीव होऊन समोर आल्यावर अजून काय होणार? खाली वाघ डरकाळ्या फोडत फेऱ्या मारत असताना झाडावर बसलेल्या माकडाची जी अवस्था होत असेल तीच माझी झाली होती. मग सरांनी आमच्यातल्या एकाला झाडावर चढून त्याला खाली उतरवायला सांगितलं. पण मास्तरांच्या कंपूत कोण सामील होणार. सगळ्यांनी झाडावर चढता येत नाही असं सांगून सुटका करून घेतली. शेवटी वैतागून मला आठवडाभर मधल्या सुट्टीत झाडावर चढून बसायची शिक्षा फर्मावून सर निघून गेले.

ही भयावह घटना सगळ्यांच्या मनात घर करून असल्याने आंब्याचं झाड आम्हाला वर्ज्य होतं. शाळेजवळच २-३ चिंचेची आणि बोरांची झाडं होती. किमान १० दगडाला एक ह्या हिशोबाने बोरं पडत असत. चिंचा काढायला आम्ही एक बांबू मिळवला होता. बोरं जो पाडेल तो खायचा पण चिंचांचं मात्र सार्वजनिक वाटप व्हायचं. कारण तो बांबू धरायला किमान २ मुलं लागत, पडणाऱ्या चिंचा खाली पडू दिल्या तर पिचकत त्यामुळे त्या झेलण्यासाठी २-३ पोरं अशी टीम असे. लोकांनी पाडलेली चिंचा, बोरं पळवणारीही काही वाह्यात कार्टी होती आमच्यात. मग तावडीत सापडल्यावर त्यांना मारही सार्वजनिक मिळत असे.

कधी कधी मधल्या सुट्टीत मी झोपतही असे. पण एकदा माझी झोप मधल्या सुट्टीवरून पुढच्या गणिताच्या तासाल कंटीन्यू झाली होती. आधी मास्तरांनी मी उठेन म्हणून वाट बघितली. पण ते होणे नाही हे लक्षात आल्यावर मला धपाटा घालून उठवलं. सगळा वर्ग फिदीफिदी हसत होतां. प्रचंड अपमान. त्यावर कडी म्हणून सरांनी मला पुढचा अर्धा तास झोपायची शिक्षा फर्मावली. दर पाच मिनिटांनी विचारीत "झोपलास का रे? " भीती आणि अपमानाने वाट लागली असताना झोप कशी येणार "नाही सर" मग मी न ऐकल्याबद्दल अजून २-४ धपाटे मिळाले होते.

ह्या शिवाय इतर आवडते उद्योग म्हणजे बाकांवर उड्या मारणे, लोकांच्या दप्तरांमध्ये कागदाचे बोळे भरणे, कुणी बाथरुम मध्ये गेल्यास बाहेरून कडी घालणे. एकदा कडी घालताना पकडल्या गेल्यामुळे मला तब्बल दहा मिनिटं बाथरुम मध्ये कोंडून ठेवण्यात आलं होतं. चालू तासाला हे झालं असतं तर दु:ख नव्हतं पण ती दहा मिनिटं मधल्या सुट्टीतली असल्याने जास्त वाईट वाटलं होतं.

शाळेतल्या ह्या सगळ्या उपद्व्यापांच्या खाणाखुणा आम्ही आजही अंगावर बाळगून आहोत. कधी कधी निवांत बसलो असताना एखादा अजून असलेला व्रण अथवा जखमेची खूण आठवते आणि मधल्या सुट्टीची आठवण मनात दाटते. अशी ही आमची आवडती मधली सुट्टी अजूनही आम्हाला प्रचंड जवळची वाटते. हिच्याशी बरोबरी करेल अशी एकही गोष्ट आमच्या शालेय जीवनात नव्हती. अजूनही नाही.

मधल्या सुट्टीच्या मजेची तुलनाच करायची झाली तर त्याला काही प्रमाणात पॅरेलल अशी एकच गोष्ट आहे - तुडुंब जेवल्यानंतरची रविवार दुपारची झोप.

आपली बुडणारी संस्कॄती आणि आपण

| Labels: | Posted On 3/5/09 at 2:07 AM

काय चाललंय काय? आपली संस्कॄती बुडतेय राव. आणि कुणाचं लक्ष नाहिये. रादर (खरं म्हणजे) कुणाला पडलीच नाहिये. एकदा कट्ट्यावर आमचे मित्र श्री जिग्नेस भाय ह्यांना मी असं म्हटल्यावर ते म्हणाले 'सेन्सेक्स पडला ना आता अशीच वाट लागणार, ऑगस्ट नंतर होईल सगळं ठीक'. मी हताश झालो.

पूर्वीच्या काळी (मी म्हातारा असताना) असं नव्हतं. आज-काल सगळीकडेच बोंबाबोंब आहे. आदरणीय चो.चे. दांडगट बाबा काडीलावे ह्यांच एक वचन सहज आठवलं. त्यांनी एका प्रवचनात सांगितलं होतं 'आज-कालची तरूण पिढी भोगवाद आणि चंगळवादाकडे झुकते आहे. कशा कशाची म्हणून काही काही ठेवली नाही त्यांनी. एकदा आरती सुरू असताना मी चक्क एका मुलाला सिगारेट ओढताना पाहिलं. मला इतका धक्का बसला की माझ्या हातातला बियरचा ग्लास खाली पडला'.

आदरणीय चो.चे. दांडगट बाबा काडीलावे यांचे हे उच्च विचार मनात घर करून बसले. त्यामुळे एकदा घर रिकामे असल्याने आम्ही आमचा कंपू जमवून समोर सगळे साहित्य घेऊन बसलो आणि मनन करायला सुरुवात केली. आज-काल वरचेवर ध्यानधारणा करत असल्याने समाधी अवस्थेत जायला जरा वेळ लागतो. तर, समाधीच्या तरल अवस्थेत पोचल्यावर आपली संस्कॄती बुडतेय म्हणजे नक्की काय होतंय ह्यावर विचार करायचं आमच्या अंतर्मनाने ठरवलं.

माणसाला दोन मनं असतात - अंतर्मन आणि बहिर्मन (आर. डी. बर्मन आणि एस्. डी. बर्मन ह्या लिस्ट मधे येत नाहित) त्यातलं अंतर्मन हे कायम आतल्या / अदॄष्य / समोर न दिसणार्‍या गोष्टींचा विचार करतं आणि बहिर्मन हे बाह्य / दॄष्य / समोर दिसणार्‍या गोष्टींचा विचार करतं. उदा. - डाण्याने रविवारी पुन्हा (सौम्य) टांग दिल्याबद्दल त्याला चांगलाच झापला पाहिजे असं बहिर्मन म्हणतं पण त्याच वेळी त्याच्याकडची शिवास रिगल अजून न संपल्याने त्याला शिव्या न घालणेच योग्य असे अंतर्मन सांगतं. त्याच वेळी बहिर्मन म्हणतं 'त्याने ती कधीच संपवली आहे, आत नुस्तीच हुल देतोय'. ह्यावर अंतर्मन म्हणतं 'चान्स घेऊन बघायला काय हरकत आहे?' तर असं सगळं आहे. जे मला समाधी अवस्थेत गेल्यावर सुचतं आणि तेंव्हाच कळतं.

तर, समाधीच्या तरल अवस्थेत पोचल्यावर आपली संस्कॄती बुडतेय म्हणजे नक्की काय होतंय ह्यावर विचार करायचं आमच्या अंतर्मनाने ठरवलं. त्यातून काही महत्वाचे मुद्दे माझ्यासमोर आले. पण त्याचवेळी धमालरावांचा फोन आला. त्यांच्याशी चर्चा केल्यावर 'आज-काल ड्राय-डेज ची संख्या वाढवल्याने असं होत असावं' असं अनुमान त्यांनी बांधलं. समाधीच्या त्या तरल अवस्थेत आम्हाला ते पटूनही गेलं. ह्या सगळ्यातून आमच्या अंतर्मनानी काही मुद्दे मांडले जे आमच्या प्रॅक्टीकल बहिर्मनाने आणि पूर्ण होशोहवासात असलेल्या चकणाखाऊ मित्रांनी खोडून काढले ते असे- (अवांतरः बहिर्मनलाही तरल करणारे द्रव्य बनवायचे कुणाला अजून कसले सुचले नाही?)

आपली संस्कॄती बुडतेय म्हणजे - आज-कालच्या मुलांना काही रीत-भात उरलीच नाही असं आमचे पिताश्री आम्हाला ऐकवत असतात. पण त्याच वेळी ते तरूण असताना आजोबाही त्यांना हेच ऐकवत असं सांगतात. त्यामुळे ह्या मुद्द्यात काही दम नाही राव. लार्ज भरावा लागेल.

आपली संस्कॄती बुडतेय म्हणजे - आज-कालच्या मुली कसले कसले कपडे घालतात. पूर्वी असं नव्हतं. पण पूवी ग्लोबल वॉर्मींगही नव्हतं. कसलं उकडतं राव आज-काल. तोकडे कपडे हे आता फॅशन स्टेटमेंट राहिलं नसून ती एक गरज झाली आहे. पुरूषांनाही असले तोकडे कपडे घालून फिरायला आवडेल पण मग त्यासाठी फिगर मेंटेन करावी लागेल, जितके मिली घाम बाहेर गेला तितके लिटर बियर आत ढकलणे बंद करावे लागेल, अरबट चरबट खाणे बंद करावे लागेल, सकाळी उशीरापर्यंत लोळणे बंद करून व्यायाम करावा लागेल. पण हे सगळे कष्ट घेण्यापेक्षा पायघोळ कपडे घालायचे आणि दुसर्‍यांना नावं ठेवायची हे जास्त सोप्प आहे. त्यामुळे ह्या मुद्द्यातही काही दम नाही राव. अजून एक लार्ज भरा.

आपली संस्कॄती बुडतेय म्हणजे - आज-कालच्या मुलांना स्तोत्र वगरे येतंच नाहीत. आता इथे मोठ्ठा लफडा आहे. कुणाच्या मानाने स्तोत्र येत नाहीत? मला एका लांबच्या आजीनी शाळेत असताना (मी शाळेत असताना) विचारलं होतं 'काय रे... काय काय येतं?' त्यावर मी छाती फुगवून म्हणालो 'रामरक्षा, अथर्वशीर्ष, मारूती स्तोत्र, गीतेचा पंधरावा अध्याय, तुकारामंचे काही अभंगही येतात...' ह्यावर तिने माझ्याकडे मी किस झाड की पत्ती असल्यासारखं बघून सांगितलं 'पुढल्या सुट्टीत चांगली महिनाभर येईन आणि तुला शीवमहिम्न शिकवून जाईन'. त्यावर मी म्हणलो 'अगं तुकारामांनी सांगितलंय की स्तोत्र म्हणता नाही आलं तरी तुम्ही मनापासून हाक मारल्यास ती देवापर्यंत पोचते' ह्यावर माझ्या पाठीवर पाच बोटं उमटवण्यात आली आणि कार्ट वाह्यात आहे ह्या तिच्या मताला अजून पुष्टी मिळाली.

आपली संस्कॄती बुडतेय म्हणजे - आजकालच्या उच्चशिक्षीत मुलांना मातॄभाषेत बोलायची लाज वाटते. असं ज्याला वाटतं त्यानी एके दिवशी आमच्या कट्ट्यावर यावं. इतकी वर्षं आपण बोललो ती खरी मराठी की ही ऐकतोय ती खरी मराठी असा प्रश्न पडेल. सॉफ्टवेअर इंजीनीयर ते साधे मेकॅनीकल इंजीनीयर आणि त्या दरम्यानचे सगळे आमच्याकडे विपूल प्रमाणात आहेत. ह्या सगळ्यांनी मिळून मराठी भाषेला दिलेले नवीन शब्द ऐकले तर भल्याभल्यांना झीट येईल. पण नकाच येऊ, इतकं शिकूनही सुसंस्कॄत नाही झालात अशी बोंबाबोंब सुरू होईल. आम्हाला काही फरक पडत नाही, पण त्यानंतर तुमचा जो उद्धार होईल त्यानी तुम्हाला भर म्हातारपणात वैराग्य आलं तर आम्ही जबाबदार नाही.

आपली संस्कॄती बुडतेय म्हणजे - आज-कालच्या मुलींच्या अपेक्षा फार वाढल्यात. असा मुद्दा गंट्याने मांडताच मक्या त्याच्यावर घसरला 'तू कोणती सिगारेट ओढतोस?' 'मोठी गोल्डफ्लेक' 'तुझे बाबा कोणती ओढायचे?' 'चारमिनार' 'मग तू गोल्डफ्लेक का ओढतोस, ती पण चारमिनार ओढणार्‍या बाबांच्या पैशाने?' 'चारमिनाल लय टुकार आहे यार' 'अरे मग माचीस घेण्याइतकं इन्कम नसताना तुला गोल्डफ्लेक ओढाविशी वाटते तर मग स्वतःच्या पायावर उभ्या असणार्‍या मुलीच्या अपेक्षा वाढल्या तर त्यात काय चूक आहे?'

हा आमचा प्रांत नसल्याने आणि आजचा स्पाँसरर मक्या असल्याने आम्ही लगेच मक्याला अणुमोदण देऊन अजून एक लार्ज भरला.

आपली संस्कॄती बुडतेय म्हणजे - नक्की सांगता येत नाही पण काही तरी होतंय यार.


गॅस झाला असेल. तू इनो घे, तोवर आम्ही अजून एक लार्ज भरतो.

बंड्याची शाळा - धडा दुसरा

| Labels: | Posted On 3/3/09 at 11:41 PM

बंड्याची शाळा
(धडा दुसरा - शिक्षा)



पाठीवर डस्टर ठेऊन ओणवे उभे राहणे, सरळ हातावर उभ्या पट्टीने आणि उलट्या हातावर आडव्या पट्टीने मार खाणे, बाकावर उभे राहणे, एखादा धडा १० वेळा लिहून काढणे, वर्गातल्या सगळ्या मुलांच्या वॉटर-बॅग्ज भरून आणणे, मैदानाला १० वेळा राउंड मारणे, शिट्टीच्या दोरीने पायावर फटके खाणे, दर तासाला फळा पुसणे ह्या सगळ्या क्षुल्लक शिक्षा सोडल्या तर शाळेत मला सर्वात जास्त घाबरवणारी एकच शिक्षा होती - पहिल्या बाकावर बसणे. पहिला बाक ही आमच्या कंपूतल्या भल्या-भल्यांना वठणीवर आणणारी गोष्ट होती. पहिल्या बाकावर बसणे म्हणजे चिलखत, बंदूक न घेता भारत-पाक सीमारेषेवर उभं राहण्यापेक्षा डेंजर गोष्ट वाटायची. भयाणतेला टरकवण्याची साथ म्हणून पहिला बाक कायम रिकामा असायचा. आरोपीला पहिल्या बाकावर एकट्याने बसवलं जायचं. मॉब मध्ये दंगल करणार्‍या एखाद्याला एकटा कोठडीत डांबला की तो कसा एकदम गलीतगात्र होतो, तशी अवस्था व्हायची आमची. इथे जो बसला तो सुधारला अशी आमच्या शिक्षकांची श्रद्धा असल्याने पहिले २ बाक रिमांडवरच्या गुन्हेगारांसाठी कायम रिकामे ठेवले जायचे. आणि मग सुधारसत्र सुरू व्हायचं.

ह्यातूनही न सुधारलेल्या आरोपींची रवानगी प्रयोगशाळेत व्हायची. प्रयोगशाळेच्या एका कोपऱ्यात पि. टी. च्या सरांचं टेबल होतं. आरोपीला आत ढकलून दरवाजा बंद केला जायचा. प्रयोगशाळेत मोठे मोठे सापळे, कारच्या बॅटरीज, एका भिंतीवर कुणीतरी भेट दिलेला चाबूक, गॅदरींगसाठी बनवलेले भाले असं सगळं भयानक साहित्य असायचं. आता ह्या सगळ्याचा वापर आपल्यावर होणार ह्या विचाराने भले भले टरकायचे. केवळ पुढे काय होणार ह्या कल्पनेने अनेकांच्या चड्ड्या ओल्या झालेल्या आहेत. असा एखादा सुटून परत कंपूत आला की मग जी वर्णनं रंगायची ती ऐकून आजपासून वर्गात मस्ती बंद, अभ्यासाला सुरूवात असे पण अनेकांनी केलेत. पाळले नाही हे सांगायला नको. आम्ही मस्ती केली नाही तर पि. टी. च्या सरांचा उपयोग काय? का उगाच कुणाच्या पोटावर पाय द्या?

पि.टी.चे सर आधीच दिसायचे भयानक. त्यात मुलांना लगेच मारून सोडण्यात त्यांना इंटरेस्ट नसे. आधी नुसतंच डोळे वटारून पहायचं, मोठ्ठ्याने ओरडायचं, भरपूर घाबरवायचं, मग दोन तीनदा हूल द्यायची आणि आरोपी थोडा रिलॅक्स होतोय असं वाटलं की मग मारायचं. त्यांचा हातही वायुवेगाने चाले. काय झालं हे कळायच्या आतच गाल एकदम गरम व्हायचा, तारे चमकायचे. त्यातून सावतोय तोच पायावर चुरचुरल्यासारखं व्हायचं. पाय चोळायला खाली वाकलं की अचानक पाठ मोडल्यासारखं वाटायचं. आणि हे सगळं जेमतेम ५-१० सेकंदात व्हायचं. मग हे पुढच्याला शिक्षा द्यायला मोकळे.

आमची शाळा दुपारची असल्याने मस्त जेऊन शाळेत जायचो. पहिल्या तासाला प्रार्थना, हजेरी वगरेंमुळे वर्गात जरा गोंधळ असायचा. त्यात पहिली १५-२० मिनीटं जायची. मग १५-२० मिनीटात तास संपायचा. खरा त्रास दुसऱ्या तासापासून सुरू व्हायचा. झोप अनावर झालेली असायची. त्यात मास्तरांचंही दुसऱ्या कुठल्यातरी वर्गावर वॉर्म-अप झालेलं असल्याने ते पूर्ण उत्साहात असायचे. पुढच्या मुलामागे लपून डुलक्या खाताना फार कसरत करावी लागायची. कसं कोण जाणे मास्तरांना कळायचं आणि मग ते तिथूनच खडू फेकून मारायला सुरुवात करायचे.

पण एकदा ह्या झोपेमुळेच मी वाचलोय. गणिताचे सर एका तासाला फळ्यावर लिहीत असताना कुणीतरी त्यांच्या दिशेने एक रॉकेट सोडलं. मास्तर मागे वळून न बघताच "जोश्या.... " असे कडाडले. आणि जेंव्हा वळले मी निष्पापपणे झोपलो असल्याचं त्यांना दिसलं. त्यानंतर मागच्या तीन बाकावरच्या मुलांना आळीपाळीने बोलावून कुणी सोडलं, कुणी सोडलं असं विचारलं. पण मित्रांची नावं मास्तरांना सांगायची नाहीत असा आमचा अलिखीत नियम असल्याने कुणीही उत्तर दिलं नाही. तोवर मला जाग आली होती. मास्तरांनी मग मी सोडून सगळ्यांना बाल्कनीत उभं केलं आणि मनसोक्त कुदवलं. दहा वर्षात तो एकच असा दिवस होता की मी मार खाणार्‍यांच्यात नव्हतो. मित्रांना मार खाताना पाहून प्रचंड हसू येत होतं, पण कसं बसं स्वतःला आवरलं. नाहितर शाळा सुटल्यावर मास्तरांचा राग माझ्यावर निघाला असता.

सर्वसाधारणपणे वर्गात दंगा करणे, बोलणे आणि गॄहपाठ न करणे ह्या तीन महत्वाच्या कारणांसाठी आम्हाला रिमांड वर घेतले जाई. मास्तर आणि बाई ह्यांच्या शिक्षा करायच्या तर्‍हा वेगवेगळ्या होत्या. बाई ओरडायच्या, ओणवे उभे करायच्या, फार फार तर पट्टी मारायच्या. मास्तर मात्र एकदम फिजीकल व्हायचे. शोले मधला असरानी जसा कैद्यांना म्हणतो 'तुम्ही सुधारणार नाही ह्याची खात्री असल्यानी मी माझा वेळ फुकट घालवणार नाही' तसंच मास्तरांचं होतं. धर की झोड, धर की झोड. पण ह्यामुळे आम्ही अधिकाधीक निगरगट्ट झालो असं आमचं मत आहे.

इतकं सगळं असलं तरी मास्तरांनी आम्हाला चुकूनही कधी वर्गाबाहेर उभं केलं नाही. कारण वर्गाबाहेर उभं राहणं ही आमच्या दृष्टीने शिक्षा नव्हतीच. ती पाऊण तासाची सुटका होती.

मास्तरांनी हात टेकल्यावर पुढची स्टेप म्हणजे घरच्यांना शाळेत बोलावणे. आपले बाबा शाळेत येणार ह्यापेक्षा ते येऊन गेल्यावर घरी आपलं काय होणार ह्या विचारानेच घाम फुटायचा. आतापर्यंत बाबांनी केलेल्या शिक्षा आठवून आठवून फार फार तर अमुक अमुक होईल अशी मनाची तयारी करायचो, पण बाबाही जोशीच असल्याने ते दर वेळी नवी आयडीया काढायचे. सर्वात कॄर प्रकार म्हणजे संध्याकाळी बाल्कनीत उभं करणे. जग खाली खेळत असताना आपण बाल्कनीत उभं राहून त्यांना बघणं ह्या सारखी शिक्षा जगात दुसरी नसेल. त्यात शिक्षा म्हणून उभा आहे हे कळल्यावर मित्रांनाही चेव चढायचा. यथेच्छ चिडवून घ्यायचे. दर वेळी टीम पाडताना 'तुझं नाव घेऊ का रे? ' असं विचारायचे, कधी स्कोर मोज म्हणायचे. लय त्रास.

अशीच एक इन्होवेटीव्ह शिक्षा मला वार्षीक परीक्षेत कमी मार्क मिळाल्यावर झाली होती. उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाला गेलो तेंव्हा जाताना बाबांनी पुढल्या वर्षीची पुस्तकं सोबत घ्यायला लावली. रोज सकाळी आणि संध्याकाळी एक एक धडा वाचायचा.

असो. ते दिवस गेले, त्या शिक्षाही गेल्या. इब्लीसपणा कमी झाला नाहिये, पण वयाने वाढल्याने पूर्वी सारख्या शिक्षा आता होत नाहीत. वैतागून मध्ये एकदा बाबा मला म्हणाले 'तुझं कार्ट तुझ्यासारखं होईल तेंव्हा कळेल तुला' (तसं ते होणारच! आडातलंच पोहोऱ्यात येणार! ) हे ऐकून मात्र माझी पाचावर धारण बसली. शाळेतल्या मोठ्या मोठ्या शिक्षा हसत हसत भोगल्या, पण ही शिक्षा मात्र झेपणार नाही.

इथे जोशी रहातात (अंतिम भाग)

| Labels: | Posted On at 12:06 AM

तर अशी ही भुतावळ ह्या दोन खोल्यांमध्ये मागची अनेक वर्ष राहतेय. माणसाच्या गरजा मर्यादित असल्या की त्याला अधिक पैशाची गरज भासत नाही हे माझं वाक्य, तात्या आणि चंद्याने फारच मनावर घेतलंय. तसं वाड्यातल्या ह्या दोनच खोल्या वापरात असला तरी अख्खा वाडाच जोशांचा आहे बरं का! पण करणार काय. वाड्याचंही वय झालंय त्यामुळे भिंतींचा रंग उडालाय, पोपडे पडलेत, प्लॅस्टर निघालंय अशा विदीर्ण अवस्थेत सद्ध्या वाडा आहे. अप्पांना पेंशन मध्ये हे सगळं ठीक करणं निव्वळ अशक्य असल्याने बाकीच्या खोल्या तूर्तास बंद आहेत. बरं, एखाद्या बिल्डरला वाडा विकायचा म्हटला तर अप्पा तुळशी वृंदावना शेजारी अंगणात आपल्याला गाडतील ह्याची तात्या आणि चंद्याला खात्री आहे. अप्पांच्या म्हणण्यानुसार तात्या एकदम वाया गेलाय. आणि चंद्याही त्याच्याच पावलावर पाऊल ठेवतोय ह्याचंही दु:ख आहे. पण देवाघरी जाण्याआधी वाड्याला पुन्हा पूर्वीसारखं चकचकीत करायचं ही महत्त्वाकांक्षा मात्र अप्पा जोश्यांच्या मनात अजून आहे.


तात्या आणि चंद्या हातात स्टीलचा ग्लास घेऊन हॉल मध्ये बसलेत.

मुलगा - कसं वाटतंय तात्याराव...
बाप - बापाला नावाने हाक मारतोस???
मुलगा - पुढे राव लावलंय की...
बाप - म्हणून काय झालं? जोशी आहेस म्हणून सांभाळून घेतोय तुला...
मुलगा - बाबा... शांत व्हा... माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या
बाप - कोणत्या रे?
मुलगा - हे सोनेरी द्रव्य पिऊन कसं वाटतंय तात्याराव तुम्हाला???
बाप - भारीच आहे रे... च्यायला ह्याच्यासाठी कुठून पैसे आले तुझ्याकडे???
मुलगा - आंबे खा हो तात्या तुम्ही... बाठी कशाला मोजताय? आपला वाडा किती जुना आहे हो?
बाप - असेल साधारण सत्तर-एक वर्ष जुना? का रे?
मुलगा - सहज हो... कुठे गुप्तधन मिळालं तर काय मजा येईल ना? घराला तळघर, तळघरात सोन्याचे हंडे आणि एक सुंदर अप्सरा...
बाप - गाडलेली अप्सरा घेऊन काय करणारेस? आणि हंड्यांचं म्हणशील तर नो चान्स. अरे भाई जोशींनी आयुष्यभर काडी काडी जोडून हा वाडा उभा केलाय. अर्धपोटीही राहिलेत बऱ्याचदा असं अप्पा म्हणतात. पूर्वी भाडेकरू होते पण आता मॉडर्न मुलांना वाडा आवडत नाही म्हणून गेले बिल्डिंग मध्ये राहायला.
मुलगा - च्यायला... त्यात काय आहे न आवडण्यासारखं? मी नाही राहत इथे... सोबत वाड्या इतके जुने आजोबा पण आहेत...
बाप - चिरंजीव... आपल्याला दुसरा काही पर्याय आहे? छप्पर सोडा, साधं कौल तरी आहे का टाळक्यावर?
मुलगा - आयला हो...
बाप - चल आवर पटापट... आजोबा यायची वेळ झाली...
मुलगा - आज कुठे गेलेत हो???
बाप - कुणास ठाऊक, कुठे जाताय म्हणून विचारलं तर म्हणाले 'झाडांना पाणी घाल, मला यायला संध्याकाळ होईल' (कोरस हास्य)
(दोघे उठून आत जातात)
(आजोबा घरात येतात)
आजोबा - तात्या... चंद्या... बाहेर या नालायकांनो...
बाप - आलात बाबा... कुठे होतात आज दिवसभर?
आजोबा - इंटरव्ह्यूला गेलो होतो...
तात्या + चंद्या - काय???
बाप - तुम्ही आणि नोकरी...
मुलगा - अहो मस्त बसून पेंशन खायच्या वयात कुठे जाता नोकरीला...
आजोबा - कार्ट्या... तुम्हाला एक नवा पैसा कमावायची ना अक्कल ना इच्छा... म्हणून आता मीच पुन्हा नोकरी करायचं ठरवलंय... पार्ट टाईम आहे... पण तेव्हढाच जरा विरंगुळा आणि कमाई. नाहीतरी घरी बसून तुमचे माकडचाळे बघण्यापेक्षा ते बरं, नाही का?
मुलगा - हो ना...
बाप - हो ना काय गधड्या...
मुलगा - आजोबा मला पहिल्या पगारात काय घेणार???
बाप - गप रे... बाबा पण हे बरं दिसतं का?
आजोबा - नाही... पण हे असं भूत बंगला झालेलं घरही बरं दिसत नाही. भाईंच्या शेजारी लटकण्याआधी हा वाडा त्यांनी दिला तसा पुन्हा मस्त करणार.
मुलगा - आजोबा... ह्या वाड्यावर इतका का जीव लावून बसलायत तुम्ही... परवा कापसे बिल्डर भेटला होता. म्हणाला, वाड्याच्या जागी बिल्डिंग बांधली तर २ बेडरूम चे ३ फ्लॅट्स आणि तिघांना प्रत्येकी ३० लाख रुपये. च्यामारी आयुष्यभर तंगड्या वर करून तंगड्या तोडता येतील...
आजोबा - ये इथे... तोडतो तुझी तंगडी...
मुलगा - गंमत हो... मला माहिती आहे ह्या वाड्यात आपल्या मूळ पुरुषाचा वास आहे... मी आलोच पाच मिनिटात...
बाप - अरे आत्ता कुठे निघालास, जेवायची वेळ झाली...
आजोबा - तात्या... अरे माझी तरी कुठे इच्छा आहे नोकरी करायची... पण अरे सरकारी नोकरीत पेंशन ते किती मिळणार. आणि तुलाही बोलून काही उपयोग नाही. आपली आयुष्य संपली रे, पण मला चिंता वाटते चंद्याची. काय करील अरे तो आपल्या नंतर? त्याला वेळीच सुधार बाबा... मी काय आज आहे उद्या नाही...
बाप - चिंता नका करू बाबा... होईल सगळं ठीक...
आजोबा - आपोआप कसं होईल ठीक?
बाप - आज आम्ही दुपारी त्याच विषयावर बोलत होतो... चंद्याने एक मस्त प्लॅन बनवलाय. तो सक्सेसफुल झाला की आयुष्याची चिंता मिटेल...
आजोबा - असं म्हणतोस??? पण तू लक्ष ठेव बाबा त्याच्यावर. वाईट मार्गाला लागायला नको...


(हे नाटक ह्यापुढे दोन वेगळ्या प्रकारे घडून दोन वेगळ्या प्रकारे संपते. दोन शेवट दिले आहेत. जो आवडेल तो आपला मानावा. )



शेवट एक




(चंद्या हातात एक छोटा पुडा घेऊन येतो)
मुलगा - अप्पाराव तोंड उघडा... (पेढा भरवतो... ) तुम्हाला नोकरी लागल्या बद्दल अभिनंदन...
आजोबा - अरे एकच आणलास???
मुलगा - अहो, पाचच रुपये होते खिशात, त्यात एकच आला...
(तिघेही बसतात. तात्या चंद्याला पाणी देतात)
मुलगा - आजोबा, तुम्हाला नोकरी करायची काहीही गरज नाहीये...
आजोबा - हो का???
मुलगा - हो...
आजोबा - तात्या म्हणत होता तुझ्याकडे काहीतरी सॉल्लीड प्लॅन आहे. सक्सेसफुल झाला तर आयुष्याची चिंता मिटेल... मगाशी काय म्हणालास??? हां, तंगड्या वर करून तंगड्या तोडता येतील...
मुलगा - तुमचा विश्वास बसणार नाही... पण मी आता सुधारायचं ठरवलंय...
आजोबा - हा हा हा हा हा... चंद्या, मेल्या वय झालं रे माझं... इतके भयानक विनोद नको ऐकवत जाऊस...
मुलगा - मला वाटलंच होतं तुमचा विश्वास नाही बसणार...
बाप - कसा बसेल???
आजोबा - बरं, तू म्हणतोस तर एक क्षण मान्य करू... पण सुधारणारेस म्हणजे नक्की काय करणार आहेस???
मुलगा - पुढे शिकणार...
आजोबा - व्वा...
बाप - पण तू शिकून कमावायला लागेपर्यंत काय???
मुलगा - सांगतोय हो पुढे... आपल्या वाड्याच्या मागे जागा आहे ना तिथे २ दुकानं बांधायची...
आजोबा - आणि???
मुलगा - आणि ती रेंट वर द्यायची...
आजोबा - अरे स्वतःची दुकानं रेंट वर देण्यापेक्षा स्वतः चालवा की...
मुलगा - ज्या धंद्यांना मरण नाही असे तीनच धंदे आहेत आजच्या काळात... पानवाला, मोची आणि डॉक्टर... ह्यातलं मला काहीही येत नाही...
आजोबा - ह्म्म्म्म.... विचार करावा लागेल
मुलगा - विचार नका करू आजोबा, कृती करा...
आजोबा - कानफाट फोडीन, मला नको सांगूस काय करायचं ते.... हे बघ अशी कुठलीही दुकानं बांधायला माझी परवानगी नाही...
मुलगा - माहिती आहे हो... तर अशी २ दुकानं बांधायची... ती भाड्यावर द्यायची नाहीत... आपल्याकडेच ठेवायची...
आजोबा - आणि काय करायचं?
मुलगा - एका दुकानात आपण इलेक्ट्रिक स्टोअर टाकायचं...
आजोबा - ते चालवणार कोण???
मुलगा - तुमचा मुलगा तात्या... बऱ्याच वर्षा पूर्वी तुमचा मुलगा इलेक्ट्रिकल इंजिनियर झाला होता...
बाप - अरे माझं वय झालं आता...
मुलगा - थोडेच दिवस हो बाबा... माझं शिक्षण झालं की मग मी बसत जाईन दुकानावर...
आजोबा - चंद्या आज काहीतरी वेगळं प्यायलास का रे?
मुलगा - नाही हो...
आजोबा - मग इतका बदल अचानक कशाने झाला?
मुलगा - काल बर्वे नगरात गेलो होतो... तिथे काळे वाडा होता ना...
बाप - पोस्ट ऑफिस समोर...
मुलगा - हो... त्या जागी आता एक बिल्डिंग उभी राहिली आहे...
आजोबा - काय सांगतोस काय??? फार वाईट झालं रे. काळे आजोबांना ओळखत होतो मी, फार जीव होता त्यांचा वाड्यावर...
मुलगा - हो ना... पण ३ वर्षापूर्वी काळे आजोबा वारले, मग नातवंडांनी वाडा विकला बिल्डरला नि पैसे घेऊन बसलेत मजेत...
बाप - ह्म्म्म्म...
मुलगा - ते बघितलं आणि एकदम मनात विचार आला... आपल्या वाड्याचं असं नाही होता कामा... आत्ताच हात पाय हलवले नाहीत तर पुढे वाट लागेल...
आजोबा - खरंय तुझं... अरे भाई जोशींनी काडी काडी जमवून हा वाडा बांधलाय, प्रसंगी उपाशी राहिले पण वाड्याचं काम थांबवलं नाही...
मुलगा - हो ना... मग आता आम्ही किमान जे आहे ते तरी नीट सांभाळायला हवं ना...
आजोबा - खरंय रे चंद्या तुझं... देवाने तुला सुबुद्धी दिली आता यश देओ...
मुलगा - खरंय ना??? (चंद्या खिशातून अजून दोन पेढे काढतो) मग भरवा हे पेढे आम्हाला...
बाप - अरे खिशात पाचच रुपये होते ना???
मुलगा - अहो ते माझ्या खिशात... तुमच्या खिशातले दहा रुपये पण घेऊन गेलो होतो ना...

(तिघेही आनंदाने हसू लागतात. पडदा पडतो. )



शेवट दोन



(चंद्या हातात एक छोटा पुडा घेऊन येतो)
मुलगा - अप्पाराव तोंड उघडा... (पेढा भरवतो... ) तुम्हाला नोकरी लागल्या बद्दल अभिनंदन...
आजोबा - अरे एकच आणलास???
मुलगा - अहो, पाचच रुपये होते खिशात, त्यात एकच आला...
(तिघेही बसतात. तात्या चंद्याला पाणी देतात)
आजोबा - तात्या म्हणत होता तुझ्याकडे काही तरी झकास प्लॅन आहे... सक्सेसफुल झाला तर आयुष्याची चिंता मिटेल... मगाशी काय म्हणालास??? हां, तंगड्या वर करून तंगड्या तोडता येतील...
मुलगा - तो प्लॅन ना??? झाला सक्सेसफुल...
आजोबा - अरे दुपारीच ठरवलात ना? लगेच सक्सेसफुल कसा झाला???
मुलगा - हो... तुम्ही पेढा खाल्लात ना???
आजोबा - म्हणजे?
मुलगा - अहो तुम्ही पेढा खाल्लात ना... तोच माझा प्लॅन होता...
आजोबा - म्हणजे???
मुलगा - त्यात विष घातलंय...
(आजोबा उठायचा प्रयत्न करता पण खाली कोसळतात. अजून जिवंत आहेत. )

बाप - तुम्ही आहात तोवर ह्या वाड्याची वीट पण विकू देणार नाही ह्याची आम्हाला खात्री होती... मी तुम्हाला बऱ्याच आधी सुचवलं होतं. पण तुम्ही मुस्कटात भडकवलीत तेव्हा माझ्या. अहो जागांचे भाव किती वाढलेत माहिती आहे का? ह्या सोन्याच्या तुकड्यावर बसून किती दिवस आम्ही भिकाऱ्या सारखं जगायचं?
मुलगा - म्हणून मग आम्ही ठरवलं, तुम्हाला पाडायचं आणि नंतर वाडा पाडायचा. आहे की नाही एकदम सॉलिड प्लॅन. (चंद्या तात्याला क्वार्टर देतो) आणि गंमत माहिती आहे का? पोस्ट मॉर्टेम मध्ये हे विष कळत नाही. तुम्ही ब्रेन हॅमरेज नि मरणारा आता...
(बाप बाटली उघडतो आणि एक मोठ्ठा घोट घेतो... )
बाप - आता आज पासून ठीक १ महिन्याने आपण लखपती होणार. ४५ लाख तुझे नि ४५ लाख माझे. जास्तीचा एक फ्लॅट येतोय तो विकून टाकू आणि मस्त वर्ल्ड टूर करून येऊ.
मुलगा - नाही हो बाबा...
बाप - अरे नाही का? जाऊ की. नव्या फ्लॅट चे पण २५-३० लाख येतीलच की.
मुलगा - त्या साठी नाही हो नाही म्हणालो, तुम्ही ४५ लाखाच हिशोब लावला त्या साठी नाही म्हणालो...
बाप - अरे तो आधी तिघांना मिळून ९० लाख देणार होता ना...
मुलगा - हो... आता आजोबा गेले...
बाप - तेच तर... आता उरलो आपण दोघे... म्हणजे प्रत्येकी ४५ लाख होतात ना...
मुलगा - तसे होतात हो... पुन्हा हिशोब करू. मिळणार होते ९० लाख, म्हणजे प्रत्येकी ३०. आजोबा गेले म्हणजे झाले प्रत्येकी ४५ लाख. आता तुम्ही पण जाणार...
बाप - काय?
मुलगा - हो... अहो त्या दारूत पण विष घातलंय...
बाप - काय???
मुलगा - पण हे विष वेगळं आहे बरं का... च्यायला एकाच दिवशी एकाच घरात दोघांचे मेंदू फुटले तर पोलिसांना संशय येईल. त्यामुळे थोडी व्हेरायटी... तुमचं हृदय बंद पडणार.
(तात्या मरायला टेकलाय... )
तात्या - मी तुझा बाप आहे...
मुलगा - हो...
कोसळण्याआधी तात्यांचे शेवटचे शब्द - तू मगाशी मी आल्या आल्या तुला पाणी दिलं आठवतंय का?
(चंद्या घसा पकडून खाली कोसळतो. )