मिथुनायण भाग ३ - शेरा

| Labels: | Posted On 8/25/11 at 9:51 AM

प्रभुजींचा जो अवतार आता आपण बघणार आहोत त्याचं नाव आहे शेरा. ह्या अवतारात ते एक नाही तर तीन तीन खलनायकांचा सामना करतात.

सिनेमाच्या सुरुवातीला एक मुलगी कुठल्या तरी पार्कींग लॉट मधे एकटीच गाडीच्या दिशेने जाताना दिसते. ती गाडीत बसते तितक्यात तिला समोर काही मास्क घातलेली मंडळी दिसतात. ती प्रचंड घाबरते. घाबरणारच, कारण त्यांनी मिकि माऊस चे मास्क घातलेले असतात. तिची गाडी काही सुरू होत नाही. समोर बघते तर सगळे माऊस गायब. पुन्हा वर बघते, सगळे हजर लगेच पुन्हा गायब. ती गाडीतून बाहेर पडून पळायला लागते, तितक्यात सगळे उंदरासारखे कुठून तरी अचानक प्रकट होतात. ते आता तिला काही तरी करणार इतक्यात दोन हात त्यांना बडव बडव बडवतात. चेहरा दिसत नाही कारण त्या मुलीच्या मागूनच सगळ्यांची पिटाई चाललेली असते. सगळ्यांना पिटुन झाल्यावर मुलीच्या मागून बाहेर येतात मिथुनदा. मुलीच्या मागून लढणे ह्याचा नवीनच अर्थ मिथुनदांमुळे आपल्याला कळतो. सगळ्यांकडे एक जळजळीत कटाक्ष टाकून पुन्हा एकदा पिटाई सेशन सुरू होतं.

पण ह्यावेळी एक गुंड मिथुनदांना भारी पडतो. तो मिथुनदांना झोडायला सुरूवात करतो. मिथुनदा खाली पडतात. तो गुंड पुढे येत स्वतःच्या चेहर्‍यावरचा मिकी माऊसचा मास्क काढतो (पण एक क्षण आपल्याला मास्क काढल्याचं कळतंच नाही) त्या मास्कच्या मागे असतो साक्षात मिथुनदा. उभा मिथुनदा पडलेल्या मिथुनकडे रागाने बघतो, एक तलवार काढतो आणि मिथुनदाच्या पोटात खुपसतो. आणि मिथुनदा आपल्या स्वप्नातून जागे होतात. हुश्श्श..

ते आपल्या खोलीतून बाहेर पडतात, दुसर्‍या खोलीत जातात. तिथे एका बाईला चेनने बांधून ठेवलेलं असतं. ती असते मिथुनदांची बायको. ती ड्रग ऍडीक्टही असते. म्हणूनच तिला बांधलेलं असतं. तिला प्रेमाने भरवून मिथुनदा एका माणसाकडे जातात. त्याचं नाव चंडोला. बॅड मॅन गुलशन ग्रोव्हर ने हा रोल केला आहे. मिथुनदा त्याला ड्रग माफियाला संपवायचं वचन देतात. चंडोला त्याला सगळ्या ड्रग माफियांची माहिती असलेली एक फाईल देतो.

ती फाईल घेऊन मिथुनदा घरी येतात. हॉलच्या लालभडक भिंतीवर त्यांच्या स्वर्गवासी बहिणीचा चंदनाचा हार घातलेला फोटो असतो. फोटोच्या बाजुला भिंतीवर खडूने लिहिलेलं असतं "डर इंसान को कमजोर करता है".

ग्रॅफिटी


मिथुनदा फ्लॅशबॅकमधे जातात.

त्यांचं कुटुंब, म्हणजे ते, बायको, बहिण आणि एक पोपट (पक्षी) खूप खूप खुश असतात. त्यांची बहिण एक अत्यंत लाडावलेली, बिंडोक, मठ्ठ आणि अति आगाऊ मुलगी असते. बायको सोज्वळ वगरे. फ्लॅशबॅक मधे आपण पोचतो तो दिवस मिथुनदांच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस असतो. बहिण गिफ्ट म्हणून त्यांच्या कडे एक प्लेट कांदा भजी मागावी तसा एक भांजा मागते. आढेवेढे घेत मिथुनदा तयार होतात. तयार होता म्हणजे हो म्हणतात, उगाच कल्पनाशक्ती ताणू नका. त्यांनी हो म्हटल्याबरोबर ती आचरट कार्टी भैय्या आणि भाभीला बेडरून मधे ढकलते आणि म्हणते "तो जाओ...". घ्या मारुतीचं नाव आणि व्हा सुरू.

बेडरूममधे अर्थातच एक गाण्याचा सिक्वेन्स पार पडतो. ह्या गाण्यात "जीस लडकी पे दिल आया है वो बडी पटाखा है" असं मिथुनदा स्वतःच्याच बायको विषयी म्हणतात.

दुसर्‍या दिवशी कळतं की मिथुनदांची बायको पोलिस इंस्पेक्टर आहे. इंस्पेक्टर शिवानी. ती पोलिस स्टेशन मधे जायला निघते. इकडे असरानीने एका हवालदाराचा रोल केला आहे. तो सायकल वरून येतो. सायकल स्टँडला लावताना कैक वेळा पडते. शेवटी तो वैतागुन तिला म्हणतो "अरी ओ १८५७ की छप्पन छुरी तेरा कोई कॅरेक्टर है के नहीं? क्यों सरकार की तरह गिरती है बार बार?". ह्यात गिरणारी म्हणजे गिरी हुई आणि गिरणारी म्हणजे सरकार असे दोन विनोद आहेत. तसेच, गिरे हुए लोग मतलब सरका असा छुपा विनोदही असू शकतो. हम है अंग्रेजोंके जमाने के जेलरका बेटा अंग्रेजोंके जमानेका हवालदार अशी तो स्वतःची ओळख करून देतो.

पोलिस स्टेशन मधे हिरवीणीच्या कॉलेजचे प्रिंसिपल तक्रार करतात की आमच्या कॉलेज मधे सर्रास ड्रग विकी सुरू आहे. कमिशनपसून मंत्र्यांपर्यंत सगळ्यांना सांगितलं, कुणीच ऐकत नाही.  बाई बंदोबस्त करायचं वचन देते आणि साध्या वेषात कॉलेजात पोचते. तिकडे ड्रग विकी करणार तरूण दिसतो.

शिवानी त्याच्याकडे ड्रग्ज मागते तर तो तिलाच जवळ ओढतो. आणि नंतर पुढची २० सेकंदं मिथुनची बायको त्याला फक्त गुद्दे मारते. पोटावर, पाठीवर, पायावर, डोक्यात, मानेवर.. बसून, उभं राहून, उडी मारून... गुद्देच गुद्दे. मिथुनच्या बायकोशी पंगा घेतल्यावर अजून काय होणार? लग्नाला ३ वर्ष झाली तरी प्रत्यक्ष मिथुनदांनी सुद्धा अशी गुस्ताखी केली नाही तर हा कोण उपटसुंभ? भोग लेका आता कर्माची फळं. इंस्पेक्टर शिवानी त्या ड्रग विकणार्‍याला पुन्हा गुद्देच गुद्दे मारते आणि यथेच्छ कुदवून झाल्यावर बेड्या ठोकते. तो चिडून तिला धमकी देतो "देख लुंगा तुझे, तुम जानती नहीं मै बल्लू बकरा का भाई हुं". मिथुनचीच बायको ती, डायलॉग हे तर तिचं हक्काचं कुरण. ती आता त्याला शब्दाचा मार देते "बकरा का भाई है ह्या बकरी की औलाद... blah blah blah blah"

इथे एंट्री होते व्हिलन, बल्लू बकराची "कानून हमारे लिये एक रब्बर की गुडिया है और पुलिस कठपुतलीयां. कानून सरकार ने बनाया और अपराध शैतान नें". बकराची आयटम त्याच्याहून महान "जब १००० इंसान मरते है तो अंडरवर्ल्ड में एक बकरा पैदा होता है". बकरा टाळ्या वाजवतो.

बकराला खबर मिळते की शिवानीने त्याच्या भावाला पकडलंय. ह्या बकराचं वैशिष्ट्य म्हणजे तो दारू पीत असताना त्याला काही वाईट खबर मिळाली की तो हातातला ग्लास संपवतो आणि मग दचकतो. उगाच ग्लास हातातून सटकून दारू नको वाया जायला.

मिथुन बागेत झाडांना पाणी घालत असतो. तितक्यात बकराची माणसं त्याला एक गिफ्ट देऊन जातात. मिथुनदा गिफ्ट उघडतात. त्यात असतो त्यांचा लाडका पोपट (पक्षी). बहीण किंचाळून घरात पळते. पोपटाच्या पिंजर्‍यावर डोकं आपटून रडू लागते. पिंजर्‍यात तिला एक चिठ्ठी दिसते. ती घेऊन बाहेर येते. तोवर इकडे मिथुन त्या पोपटाला बागेतच गाडून वगरे मोकळा झालेला असतो.

(पोपट गाडताना मिथुनदा)



चिठ्ठीत लिहिलेलं असतं की माझ्या भावाला सोड नाही तर अशीच अवस्था तुझ्या बायकोची होईल. हे ऐकून मिथुनदा चवताळतो, त्याच्या एका हाताचा पंजा नागाच्या फण्यासारखा वर वर येऊ लागतो. हे बघून त्यांची बहीण त्यांना मानेनेच नाही म्हणते. मिथुनदा सावरतात. हताशपणे मिथुनदा चिठ्ठी टाकून घरात जातात.

सिनेमात व्हि. सि. आर. नावाचा अजून एक व्हिलन आहे. त्याची दोन मुलं मिथुनदा आणि त्यांच्या बहिणीसमोर एकाचा खून करतात. शिवानी साक्षीदार म्हणून म्हणून मिथुनला बोलावते. पण बहिणीला व्हि. सि. आर. ने किडनॅप केल्यामुळे मिथुनदा खोटी साक्ष देतात आणि व्हि. सि. आर. ची मुलं सुटतात.

पुढे बकराचा भाऊ त्याच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मिथुनदांच्या बहिणीला ड्रगचा ओव्हरडोस देऊन ठार करतो. मिथुनदांचा फणा पुन्हा वर येतो. पण आता थांबवणारं कुणी नसतं बहिणीची चिता मिथुनदांच्या डोळ्यात पेटते.

मिथुनदा नागासारखे कराटे खेळून, सुपरमॅन सारखे उडून बकर्‍याच्या भावाला मारतात.

(मिथुनदांचा अजून एक अवतार - सुपरमॅन)



त्याच्या ह्या पराक्रमामुळे चंडोला त्यांना बोलावून घेतो आणि म्हणतो की मी तुला ओळखलं. तूच शेरा आहेस. कारण ज्या प्रकारे बकराचा भाऊ मेला तसं कराटे स्किल जगात कुणाकडेच नाही. प्लीज ड्रग्ज माफियांना संपवण्यासाठी मला मदत कर. मिथुनदा त्याला नम्रपणे नकार देतो.

आत व्हिलनची माणसं शिवानीला पकडून नेतात आणि तिला ड्रग्जची सवय लावतात. ह्यामुळे पेटून उठलेले मिथुनदा एकेकाचा खून करायला सुरुवात करतात. व्हि. सि. आर. आणि बकराला आपले सापाचे कराटे खेळून ठार करतात. संपूर्ण मारामारीच्या दरम्यान मिथुनदांच्या हातवार्‍यांना नागांच्या फुत्कारण्याचा आवाज बॅकग्राउंड साउंड म्हणून वापरला आहे.

तर, ह्या दोघांना मारल्यावरही बराच वेळ शिल्लक असल्याने अजून एका व्हिलनची एंट्री होते. तो दुसरा तिसरा कुणी नसून असतो आपला बॅड बॉय गुलशन उर्फ चंडोला उर्फ ब्लॅकी - द बिग बॉस. आपल्या मार्गातील काट्यांना हटवण्यासाठी त्याने चंडोला बनून शेराचा उपयोग केलेला असतो.

शिवानी हळू हळू बरी होत असते. असरानी एकदा जयला पकडून लेक्चर देतो की असा कसा तू नामर्द की बायकोवर अत्याचार केलेल्यांना काहीच करत नाहीस. त्यावेळी जय त्याला आपली कहाणी ऐकवतो. पुन्हा फ्लॅशबॅक.

इथे आपल्याला कळतं की मिथुनदा पूर्वश्रमीचे गुन्हेगारी जगताचे बादशाह शेरा होते.



प्रतिस्पर्ध्यांनी आई आणि भावाचा खून केल्यावर ते वाममार्ग सोडून सन्मार्गाला लागलेले असतात. शेरा आता मेलेला असतो. त्याच्या जागी जय खुराना जन्म घेतो. मरणार्‍या आईला त्यांनी खूनखराबा न करण्याचं वचनही दिलेलं असतं. म्हणूनच ते चंडोला ला नकार देतात.

ह्या सिनेमात इतके फ्लॅशबॅक आहेत की वर्तमानात येण्या ऐवजी भूतकाळातच सिनेमा का उरकत नाहीत असा प्रश्न पडतो.

शिवानी बरी होत असल्याने ब्लॅकीला टेंशन येतं की ती आपल्या माणसांना ओळखेल, म्हणून तो तिला मारण्याचा प्लॅन करतो. पण तिथे ऐन वेळी जय उर्फ शेरा पोचतो. पुढे काय होतं ते सांगायला नकोच.      

मिथुनचा सिनेमा असल्याने त्याचा शेवटही साजेशा डायलॉगने होतो जो फक्त मिथुनच्या बाबतीतच ऐकवला जाऊ शकतो "शेरा ने अपने आप को कानून के हवाले कर दिया. उसे उम्रकैद की सजा हुई. मगर अच्छे बरताव के कारण उसे पांच साल में ही छोड दिया गया." उम्रकैद वरून डायरेक्ट ५ वर्ष? काय बोलणार आपण पामर?

नेहमीप्रमाणेच ह्या चित्रपटातही डायलॉग्ज की खैरात आहे:

१. अब मौत का ऐसा खेल होगा के मौत का भी कलेजा काप जाएगा.

२. अपना नाम जय से बदलकर पराजय कर दो.

३. मां की लाशपर दिया वचन मैने बहन की लाशपर तोड दिया.

४. ये अगर नंगा होकर गरम तव्वे पर बैठ जाये तो भी उसकी बात का यकीन मत करना.

५. सबर के फल नसीब के झाड पर लटक लटक के सड गये.



आता सिनेमातली काही निवडक दॄष्य:

(नागराज मिथुनदा)








आणि हे सिनेमाचं पोस्टर




पुढच्या परीक्षणापर्यंत क्रमशः

आपला

(मिथुनभक्त) ऍडी जोशी















मिथुनायण भाग २ - आग ही आग

| Labels: | Posted On 8/23/11 at 8:21 AM




साधारणपणे पंजाबी ड्रेसनी झाकलं जाईल इतकं अंग झाकणारा स्विम सूट घालून एक तरूणी समुद्रातून बाहेर येत, उर्सुला अँड्रेस च्या थोबाडीत मारेल अशी उन्मादक एंट्री घेते. दुसर्‍या क्षणी ती एका माणसाला खंडणीसाठी फोन करते. हिचं नाव डायना. तो हिम्मतवान व्यापारी तिला उत्तर देतो "तुम डायना हो या डायन, लेकीन मेरा खून नहीं चूस सकोगी". काही वेळातच त्या माणसाला त्याच्या बाणेदारपणाचं फळ मिळतं. त्याला त्याच्या घराच्या पार्कींग लॉट मधेच गोळी घालून ठार करण्यात येतं. मिथुनच्या चित्रपटात काम करणारा प्रत्येक जण मिथुन नसतो हे कळेपर्यंत त्याचा रोल संपलेला असतो.

डायना टायगर गँग नावाच्या एका खुँखार गँगची मेंबर असते. त्यांच्यासोबत भ्रष्ट पोलिस अधिकारी, एक मंत्री, अशी पिलावळही असते.

आता, टायगर गँग मुलाला जिवंत सोडण्याच्या बदल्यात त्या विधवेकडून खंडणी मागते. नवर्‍याला जिवे मारण्याच्या धमकीला एक रुपयाही द्यायचा नाही असं ठणकावून सांगणारी ती नारी मुलाच्या जिवावर आल्यावर तडक ५० लाख घेऊन सांगितलेल्या ठिकाणी पोचते. इथे मिथुनदांनी समस्त नवरे जमातीला एक गुप्त संदेश दिला आहे. ती खंडणी देणार इतक्यात तिथे असलेल्या सगळ्या गुंडांना एक बंदुकधारी हात धडाधड गोळ्या घालून ठार करतो. तो हात असतो अर्थातच मिथुनदांचा. ह्या सिनेमात त्यांच्या अवताराचं नाव आहे 'इन्स्पेक्टर अजय'. ह्या मारामारीच्यावेळी तिथे एक पिकनिकला आलेलं जोडपं आणि एक फोटोग्राफरही असते.

ह्या खुनखर्‍याब्याबद्दल मंत्री कमिशनरकडे जाऊन त्याला अजयला थांबवायला सांगतो. (आता इथे डायलॉग्सच्या भयानक फैरी झडतात.) त्यावेळी तिथे अजय पोचतो आणि मंत्र्याची कानउघाडणी करतो "अरे तू तो वो सियासी दलाल है जो मुर्दे का कफन छीनकर अपनी खाल पर ओढ लेता है". कमिशनर पुढे मंत्र्याला ऐकवतो "मगरमछ के आंसू, कुत्ते का भोंकना, लोमडी की चालाकी ये सारी चीजें लेकर तू पैदा हुवा है गोपाल भारती". इतकं सुंदर व्यक्तीचित्रण पु.लं. ना तरी जमलं असतं का? कमिशनर आणि अजय नी केलेल्या अपमानामुळे चवताळलेला मंत्री त्या दोघांची बदली करायची धमकी देतो. अजय उत्तर घेऊन तयारच असतो "तू हमारी बदली करवाएगा? अरे तीन साल में तू पांच पार्टीयां ऐसे बदल चुका है जैसे बेघर बंदर जिंदगीभर डालींया बदलता रहता है".

ह्या सिनेमान आपला लक्ष्या सुद्धा आहे. त्याच्या जोडीला आहे जॉनी लिव्हरचा डुप्लीकेट. ते दोघे जासूद असतात आणि टायगरला शोधत असतात. "मैने मरें हुएं भैस से दूध निकाला है, अंडे से निकली हुई मूर्गी को डंडे मारकर अंडे में बंद कर दिया है, कबरस्तान से निकले मुर्दे को कबरस्तान में वापस बंद कर दिया है" असं लक्ष्या स्वतःच वर्णन करतो. आता बोला.

मधे मधे सिनेमात जॅकी श्रॉफही दर्शन देत असतो. ते कशासाठी हे अर्धा सिनेमा होईपर्यंत कळत नही.

कमिशनर आता अजयला सरकारी ट्रेझरीच्या संरक्षणाची जबाबदारी देतो. इकडे टायगर गँग ही ट्रेझरी लुटायचा प्लॅन बनवत असते. तितक्यात तिथे कमिशनर पोचतो. सगळे पळू लागतात इतक्यात कमिशनर त्यांना थांबवतो "ओ बेवकूफी के अंडों से निकले कबुतरों, मैं कमिशनर नहीं टायगर हुं". टायगर जेंव्हा जवळ येतो तेव्हा कळतं की तो कमिशनरचा विद्रुप हमशकल आहे. ह्या टेझरी मधे २५० कोटींचे हीरे असतात. एकेका हिर्‍याचा आकार टग्ग्या इतका असतो. संपूर्ण सिनेमाभर ह्यांचा आकार बदलत राहतो. सिनेमाच्या शेवटी ह्या टग्ग्यांचे रव्याचे लाडू झालेले असतात.

ह्या सिनेमातला अजयचा दुखरा कोपरा म्हणजे त्याची स्वयंघोषीत प्रेयसी. ही दुर्दैवाने त्याच्या स्वर्गवासी बायकोसारखीच दिसत असते. मिथुनदा आणि त्याच्या सुखी कुटुंबाची वाताहात होण्याआधीच्या त्यांच्या संसाराची ओळख आपल्याला करून दिली जाते. "जो तेरा इश्क मिला, प्लॅटिनम डिस्क मिला" अशा मधुर शब्दांतून आपल्या भूतकाळात चक्कर मारून आणली जाते. मिथुनच्या बायकोचा गुंडांनी बलात्कार करून खून केलेला असतो. मिथुनदा शेवटी नव्या मैत्रीणीच्या प्रेमात पडतोच.

टायगर, डायना, मंत्री आणि त्यांची पिलावळ मिथुनदांना लगाम घालण्यासाठी त्यांना विधवेच्या खुनाच्या आरोपाखाली जेल मधे टाकते. इथे कळतं जॅकी दादा म्हणजे मिथुनदाला खबरा पुरवणारा खबरीलाल. कमिशनरचं अपहरण करून त्याच्या जागी टायगर जातो. मिथुनदा आणि जॅकी बाबा ह्या नव्या कमिशनरला घोडा लाऊन जेल मधून सुटतात आणि एकेका गुंडाचा खात्मा करायला सुरुवात करतात.

सिनेमाचा मुख्य व्हिलन "टायगर" आहे. पण त्याला घाबरायचं की त्याच्यावर हसायचं हेच कळत नाही. कारण डायना, मंत्री आणि गँगमधले अजून १-२ मेंबर्स टायगरला सिनेमाभर येता जाता हिडीस फिडीस करत असतात. त्याला "देख लुंगा टायगर के बच्चे" अशा धमक्याही देतात. हे कमी की काय म्हणून त्याला ब्लॅकमेलही करतात. धन्य आहे.

सिनेमाच्या मधेच कधी तरी आपल्याला टायटल साँग  ऐकवण्यात येतं "क्या क्या संभालोगी जवानी में, आग ही आग है पानी में". आश्चर्य म्हणजे ह्या गाण्यात डायना, मिथुनदांची प्रेयसी आणि एजून एक अशीच आयटम ह्या मिळून मिसळून नाचतात. ह्या गाण्यात प्रेक्षकांना काही महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात - लटके संभालू के झटके संभालूं? झुमका संभालूं के ठुमका संभालू? दिलकी लगी क्या बुझाये बुझेगी? आजु संभालूं के बाजू संभालूं? चुम्मा संभालूं के जुम्मा संभालूं, या अपने दिलका कबुतर संभालूं?

प्रेक्षकांना प्रश्नात टाकून सिनेमा पुढे सरकतो.

यथावकाश हिरे लुटले जातात. मिथुनदांची प्रेयसी मिथुनदांवर नाराज असते. तिचा असा समज झालेला असतो की मिथुनदांनीच विधवेचा खून केला आहे हिरेही पळवले आहेत. पण त्यांच्यातला गैरसमज लवकरच दून होतो आणि आपल्याला अजून एक सुंदर गाणे ऐकवले जाते "जब मिले दो जवानी, बने एक प्रेम कहानी, बजते हैं दिल के तार".

हळू हळू सगळ्यांना कळतं की हा कमिशनर तोतया आहे आणि तोच टायगर आहे. व्हिलन गँग पैकी एक मिथुनदांच्या प्रेयसीचा मामा असतो. तो टायगरला चुना लाऊन हिरे भाचीच्या घरात लपवतो. हिर्‍यांच्या मोहापाई आता मिथुनदांची प्रेयसी, आधीची उगाच आयटम ह्यांना कमिशनरसोबत बांधलं जातं. इतके दिवस बंदीवासात असूनही कमिशनर त्याच वर्दीतल्या कडक इस्त्रीच्या शर्ट मधेच असतो.

हिरे घेऊन टायगर पळणार इतक्यात मिथुनदा अड्ड्यावर पोचतात. शेवटची हाणामारी होते, मिथुनदा आणि जॅकी बाबा आपल्या अक्षय बंदुकांनी गुंडांचा खात्मा करतात, सगळीकडे आनंदी आनंद होतो.


सिनेमातले निवडक यादगार संवाद:

१. चोट खाते खाते फौलाद भी चिखने लगता है, तो तू क्या चीज है.

२. जो हमारी बात मानता है वो हसता है, जो नहीं मानता वो खून के आंसू रोता है.

३. मौत कभी ठोकर खा कर वापस नहीं जाती टायगर, आती है तो जान लेकर ही जाती है.

४. मेरा सबसे बडा खजाना मेरी बेटी है.

५. हम कानून को जिंदा रखने के लिया कानून का गैर कानूनी ऑपरेशन करते हैं.

६. जब कभी मैं जुर्म का जुआं खेलता हुं तो जोकर हमेशा अपनी जेब में रखता हुं.

७. टाईम कम है. सोचना शुरू करदे अब उपर वाले को क्या जवाब देना हैं.

८. मेरे लिये किसी की जान लेना उतनाही आसान है जितना टेलिफोन पे बात करने के लिये रिसिव्हर उठाना.


शेवटची हाणामारी झाल्यावर "आग ही आग है पानी में" ह्या सुमधुर गाण्याने सिनेमाची सांगता होते. इथे आपल्याला कळतं की ही आग इंतेकामची नसून इश्काची आहे. किंवा "आग ही आग" मधली एक आग इंतेकामची आणि दुसरी आग इश्काची असंही असू शकतं. मधला "ही" म्हणजे अर्थातच मिथुनदा हे वेगळं सांगायला नकोच.

पुढच्या परीक्षणापर्यंत क्रमशः  


मिथुनायण भाग १ - 'जस्टीस चौधरी' (म्हणजेच ओरिजिनल सरकार)

| Labels: | Posted On 8/21/11 at 11:23 AM



दुर्जनांचे निर्दालन जितक्या सातत्याने मिथुनदा करत आले आहेत तितकं सातत्य पोलिसांना दाखवलं असतं तर आज गुन्हेगार स्वस्त साखर, मनमिळावू बायको आणि कामसू सरकारी कर्मचारी ह्यांचा इतकीच दुर्मीळ गोष्ट झाली असती. पण तसे होणे नाही. त्यामुळे आपल्या चित्रपटांतून, विविध अवतार घेऊन मिथुनदा त्यांच्या भक्तांना अन्याय निर्मुलनाचं मार्गदर्शन करत आले आहेत. त्यांच्या सहस्त्रावतारांपैकी एक 'जस्टीस चौधरी' आज पुन्हा पाहिला आणि त्याचे परीक्षण करायचा इच्छा अनावर झाली. अर्थात मिथुनदांच्या कुठल्याही कॄतीचं परीक्षण करायची प्रत्यक्ष मिथुनदांशिवाय दुसर्‍या कुणाचीही लायकी नाही. अपवाद फक्त आद्य दुर्जन निर्दालक सुपरस्टार भगवान रजनीकांत ह्यांचा.

जस्टीस चौधरी सिनेमाची सुरुवात होते एका खुनापासून. एका सद्गुणी माणसाला संपवण्यासाठी काही गुंड पोलिसालाच सुपारी देऊन त्याचा काटा काढतात. त्याची बहीण वेगवेगळ्या पोज मधे खूप रडते. कानून के रखवालेच कानून से खिलवाड करत असल्याने तिला कुणी तरी खरा न्याय मिळवण्यासाठी जस्टीस चौधरी कडे जायचा सल्ला देतो.

मिथुनदांची एंट्री. मिथुनदा डोळ्यांतून अंगार ओकत भगवान शंकराची पूजा करतायत. केवळ घंटा हलवून त्यातून डमरू, तबला, झांजा, ड्रम, घंटा इत्यादी अनेक वाद्यांचे आवाज काढतायत. पूजा संपते, देव सुटकेचा निश्वास टाकतो. मिथुनदा तयार होऊन बाहेर येतात. एक माणूस त्याच्या भावाला वाचवायची विनंती त्यांना करतो. जजशी सेटींग करून त्याच्या भावाला शिक्षा द्यायची दुष्टांची योजना असते. मिथुनदा त्याच्या भावाला अभय देतात. माणूस निघून जातो. मिथुनदांचा सहकारी, छोटन, त्यांना विचारतो की त्याचा भाऊ खरंच निर्दोष आहे का ते चेक करूया का. ह्यावर मिथुनदा त्याला एक युनिव्हर्सल ट्रुथ ऐकवतात "माई के दूध और मजबूर इंसान के आंसुओंमें मिलावट नाही होत है". ऐकणारा धन्य होतो.

पुढे मिथुनदा त्या दुष्ट पोलिस अधिकार्‍याला यमसदनी धाडतात. त्यांच्या हाणामारीच्या दृष्यांच्या वेळी 'टर्मीनेटर' चे पार्श्वसंगीत वाजते हा योगायोग नाही. टर्मीनेटर मधे कोणकोणते गुण असावेत, तो नक्की किती ताकदवान असावा, त्याच्याकडे कोणत्या पॉवर असाव्यात ह्याची कल्पना जेम्स कॅमरूनने मिथुनदांवरूनच घेतली आहे.

तर मिथुनदा आपली अशी अनेक अवतारकार्य पार पाडत असतात. त्यांच्यामुळे बरंच नुकसान सोसावं लागल्याने त्यांचा दुश्मन 'अजगर ठकराल' दुबईहून परत येतो. येऊन मिथुनदांची भेट घेतो. म्हणतो दोस्ती करू, मिळून मिसळून राहू आणि वाटून खाऊ. अर्थातच मिथुनदा त्याला नकार देतात. त्यावर तो क्षुद्र किटक त्यांना म्हणतो 'मेरा नाम है अजगर ठकराल, मै दुश्मन को काटता नही, सीधा निगलता हूं'. त्या अजाण बालकाला मिथुनदांच्या पावरचा अंदाज नसल्याने तो असं बरळतो. त्यावर मिथुनदा त्याला शांतपणे सांगतात 'जस्टीस चौधरी अपने दुश्मनको निगलता नहीं, पालता है, खेलता है'.

अशा कठोर माणसाचा एक हळवा कोपराही असतो. मिथुनदांनी जिच्या पोटी अवतार घेतलेला असतो त्या आईला वाटतं की ते गुन्हेगार आहेत. म्हणून ती त्यांच्याशी एक शब्दही बोलत नसते. मिथुनदांना एक भाऊही असतो, तो मात्र त्यांचा भक्त असतो.

सिनेमाच्या सुरुवातीला ज्या मुलीला मिथुनदांनी मदत केलेली असते तिला ते पुढेही सतत मदत करत राहतात. बेरहम जमाना आणि बस्तीवाले तिला मिथुनदांची रखेल समजून तिच्या चारित्र्यावर शक घेतात. मुलीचं चारीत्र्य म्हणजे एक काच असल्याने तिला असल्या दगडांपासून वाचवण्यासाठी आणि पुन्हा सन्मान प्राप्त करून देण्यासाठी मिथुनदा तिथल्या तिथे तिला प्रपोज करतात 'मुझसे शादी करोगी?'. मुलगी पार गोंधळते, काहीच बोलत नाही. तिला कळलं नसावं म्हणून ते पुन्हा विचारतात. ह्या वेळी इंग्रजीत 'विल यु मॅरी मी?'. तिचा होकार बघून मिथुनदा तिच्या भांगेत सिंदुर भरून तिच्याशी लग्न केल्याचं घोषीत करतात. लग्नाच्या निमित्ताने एक बेली डांस सदृश सांस्कृतीक कार्यक्रम पार पडतो.

इथे अजगर ठकरालची पाचावर धारण बसल्याने तो त्याच्याहून मोठा भाई, डोग्रा - उर्फ शक्ती कपूर, ह्याला आवताण धाडतो. ह्या डोग्राला रक्ताचा वास आवडत असल्याने तो येता जाता स्वतःचीच नस कापून रक्ताचा वास घेत असतो. तो येतो त्या दिवशी त्याचा वाढदिवस असल्याने केक आणलेला असतो. तो केक कापणार इतक्यात ठकरालचा एक माणूस मोठ्या आवाजात बडबड करू लागतो. डोग्राला ऊंची आवाज से नफरत असल्याने तो केक वर डोकं आपटून आपटून आणि गळा कापून त्या माणसाला जीव घेतो.

डोग्रा व्यापाराच्या नावा खाली ड्रग्स आणि हत्यारांचे वितरण करायचा प्लॅन बनवत असतो. त्याला टिव्ही वर मुलाखत देताना बघून मिथुनदा टिव्ही फोडतात आणि भुतकाळात जातात. ते फ्लॅशबॅक मधून आपल्याला त्यांचे वडील, आई, भाऊ, बहीण आणि ओरिजिनल बायको ह्यांचे दर्शन घडवतात. एकच खटकतं ते म्हणजे त्यांच्या बायकोचा एक डायलॉग - 'दिनभर तो आप अदालत में रेहते हैं, और घर आने पर टिव्ही लगाके बैठ जाते हैं' अशी मर्त्य मानवांबद्दल करायची तक्रार मिथुनदांची बायको त्यांच्या बद्दल करते. मूर्ख, अजाण बाई.

त्यावेळी मिथुनदा खरोखरच न्यायालयात जस्टीस असतात. न्यायनिष्ठूर मिथूनदा डोग्राच्या भावाला त्याच्या गुन्ह्यांसाठी सजा ए मौत सुनावतात. बदला म्हणून डोग्रा त्यांची बायको, बहीण आणि वडिलांची हत्या करतो त्यांच्या डोळ्यादेखत करतो. घरासमोरच्या लॉनवरच तिघांच्या चिता पेटवण्यात येतात. मिथुनदांच्या भावाच्या डोळ्यातून घळाघळा अश्रु वाहत असतात. पण त्याचा चेहरा पाहून हे कळत नाही की डोळ्यात पाणी दु:खामुळे आलंय की चितेच्या धूरामुळे.

सुडाने पेटून मिथुनदा आता डोग्राची माणसं मारू लागतात. तेव्हा त्यांना जहांगीर नावारा एक डॉन भेटतो आणि इथूनच मिथुनदांचा न्यायाधीश ते समांतर सरकार असा प्रवास सुरू होतो.

बॅक टू वर्तमान. मिथुनदा डोग्राला भेटून आधी त्याच्या दोन भावांना आणि मग त्याला मारणार असल्याचं सांगतात. त्यानुसार ते एका भावाला मारतात. डोग्रा त्यांची सुपारी एक शार्प शूटरला देतो, जो मिथुनदांवर गोळी झाडतो. मिथुनदा त्याच्या मेल्याचं नाटक करतात. मिथुनदा मरत नाहीत त्यांना लागून गोळीच मरते. आता ते डोग्राच्या दुसर्‍या भावाला मारतात.

इथे डोग्राची माणसं मिथुनदांच्या भावाला जखमी करून त्याच्या प्रेयसीला पळवून नेतातत. अजगरचा भाउ तिच्याशी पाट मांडणार इतक्यात मिथुनदा तिथे पोचतात. आपल्या अक्षय बंदुकीने दुष्टांना नाश करतात आणि डोग्राला पकडून भाऊ ऍडमीट असलेल्या हॉस्पिटल मधे पोचतात. इथे ते त्यांची आई, बायको आणि भावाची प्रेयसी ह्यांना सांगतात की मी गुंड झालो कारण डोग्रापर्यंत पोचायचा तो एकच मार्ग होता. आता त्याला मारून ते स्वतःला कानूनच्या हवाले करणार असतात.

शेवटी ते डोग्राला गोळी घालतात आणि आईच्या हातात पिस्तुल देऊन आपण गुन्हेगारी सोडल्याचं घोषीत करतात. सिनेमा संपतो.

सिनेमाभर आपल्याला मिथुनदांच्या अनेक लीला पहायला मिळतात. सिनेमा संपला तरी मिथुनदांचे काही मौलीक विचार मोती मात्र मनात घर करून राहतातः
१. माई के हाथ का खाना हर बेटे को नसीब नहीं होता.
२. जस्टीस चौधरी सिर्फ एक ही बार माफ करता है, दुसरी बार माफी नहीं मौत मिलेगी.
३. आग और बारूद एक दुसरे से हाथ मिला ही नहीं सकते.
४. मेरे सामने तेरी औकात इतनी भी नहीं के मै तुझे अपना दुश्मन समझुं.
५. मै जिसे रेकमेंड करता हुं उसे इंटरव्ह्यु देने की जरूरत नहीं पडती.
६. जस्टीस चौधरी जुर्म के भयानक जंगल का शेर है. और जो एक बार शेर की पनाह में आ जाता है, भेडिये उसकी तरफ आंख उठाकर भी नहीं देखतें.


माणसाच्या स्वभावाचे विविध कंगोरे दर्शवणारी, अन्यायाविरुद्ध लढायची प्रेरणा देणारी, मनोरंजन करणारी, राग लोभ माया मत्सर काम क्रोध ह्यांचा उत्कट आविष्कार असणारी कलाकॄती म्हणजे जस्टीस चौधरी. आपण नक्की बघा आणि अभिप्राय कळवा. सिडी नाही मिळाली तर पूर्ण सिनेमा आंतरजालावर उपलब्ध आहेच. लवकरच भेटू मिथुनदांच्या अजून एका अवताराची माहिती घेऊन.


आपला,

(मिथुनभक्त) आदि जोशी

श्रावण स्पेशल १ - झिंगलेल्या बाबाची कहाणी

| Labels: | Posted On 8/12/11 at 11:19 AM


सद्ध्या श्रावण का काय ते सुरू असल्याने दारू हा केवळ बोलण्याचा विषय राहिलेला आहे. त्यामुळे आम्ही आता काही खास श्रावण स्पेशल लिखाण करायचे योजिले आहे.
त्यातला हा पहिला पेग एका फांदीवरच्या समस्त कावळ्यांना अर्पण.
झिंगलेल्या बाबाची कहाणी
आपण बघतो की साधारण पणे बेवड्या माणसांच्या संसाराची, मुलांची अवस्था फार वाईट असते. बाबा दारू पिऊन घरी येतो, शेष नागासारखं घर डोक्यावर घेतो. पण ह्या सगळ्याला दुसरी बाजूही असते. दारूच्या बाबतीत बापसे बेटा सवाई असं घडलं तर काय होईल हेच बघण्याचा आता आपण प्रयत्न करणार आहोत.
सोफ्यावर निजलेला एक बंडू बाळ
संपलेली दारू ओठा सुकलेली लाळ
कामवली सखू बाई आली आज नाही
धुतलेला ग्लास एक उरलेला नाही
झोपेतच आता तुला पाजतो बशीत
निजतच तरी पण ढोसशी खुशीत
सांगायची आहे माझ्या बेवड्या मुला
झिंगलेल्या बाबाची या कहाणी तुला
आटपाट नगरात बार होते भारी
दररोज राजा करी एकेकाची वारी
रोज सकाळीस राजा निघताना बोले
आंटी कडे जाणे काल राहूनिया गेले
जमलेच नाही काल जाणे मला जरी
आज परी जाणार मी वेळेतच बारी
स्वप्नातल्या बार मधे मारू मग फेरी
खर्या खुर्या पेगमधे दारू भरू भारी
पाजीन मी थकलेल्या हातानी तुला
झिंगलेल्या बाबाची या कहाणी तुला
बारमधे उशिरा तू असतो बसून, भंडावला बाबा गेला दारूत बुडून. तास तास जातो खाल मानेने निघून, एक एक पेग जातो हळूच संपून. वाटते की उठुनिया तुझ्या पास यावे, तुझ्या सोबत मी ही पुन्हा बसायला घ्यावे. उगाचच बेट काही लावावी तुझ्याशी, चिमुकले टकिला शॉट्स वाटावे तुझ्याशी.
बरळत अडखळत बोलतोस काही
ढोसताना भान तुला उरतच नाही
चोरूनिया तुझा ग्लास संपवाया पाही
दुरुनच आपल्याला बघणारी आई
तरी सुद्धा दोघेजण दंगा मांडू असा
चादरीला ग्लास देई ओलसर ठसा
सांगायची आहे माझ्या बेवड्या मुला
झिंगलेल्या बाबाची या कहाणी तुला
ट्रे मधे लुकलुकलेला पहिला ग्लास, आणि पहिल्यांदाच घेतलास जेव्हा ओठी एक लार्ज. सोडा घालण्याआधी सुद्धा संपवलास तू खंबा, रांगत रांगत घेतलास जेव्हा बारचा तू ताबा. लुटू लुटू उभं रहात भरलास नवा ग्लास, तुझा अचाट स्टॅमीनासमोर बाबा हरला आज.
असा गेलो आहे बाळा पुरा घाबरून
हल्ली तुला ढोसताना पाहतो दुरून
असा कसा बाळ देव बाबाला ह्या देतो
खंबा घेऊन येतो आणि एकटाच पितो
हातातून ग्लास तुझ्या जाई निसटून
उरे काय तुझ्या माझ्या बाटली मधून
जरी येते ओठी तुझ्या माझ्यासाठी शिवी
दारू साठी वाटे मला जणू एक ओवी
माझ्यासाठी थोडी तरी ठेवशील का रे
ढोसताना बाबा तुला आठवेल का रे
बारला तू जाता जाता उंबरठ्यामधे
बाबासाठी येईल का दारू ग्लास मधे
-----x-----
- आदि जोशी
(कवितेतला बाबा मी नव्हे.)

-----
सूचना - लिखाण आवडले आणि जर ते कुणाला पाठवावेसे वाटले तर नाव गाळून पाठवू नये. स्वतःचे लेख दुसर्‍याच्या नावावर मेल मधे बघायचा कंटाळा आलाय आता.

अरेरे तुझे काय झाले हे जोश्या

| | Posted On 5/27/11 at 11:40 PM

हे आमचे मनाचे श्लोक. शेवटच्या कडव्यातल्या शेवटच्या वाक्याशी बायको सहमत आहे.





अरेरे तुझे काय झाले हे जोश्या,

खुला सांड होतास फसलास जोश्या.

कुर्‍हाडीवरी पाय मारोनी घेशी,

तरी दात वेंगाडुनी हसतोस जोश्या.



अशी बुद्धी तू टाकली का गहाण,

कपाळावरी मारुनी घे वहाण.

उपयोग त्याचा परी शुन्य जोश्या,

खुला सांड होतास फसलास जोश्या.



पाजी जगाला जो बुद्धीचे डोस,

करी देव पोपट त्याचाच खास.

स्वतःहून खड्ड्यात पडलास जोश्या,

खुला सांड होतास फसलास जोश्या.



सगे सोयरे मग्न पार्टीत खास,

मनी हासती ते तुझ्या धाडसास.

इथे वाट परतीची नसते रे जोश्या,

खुला सांड होतास फसलास जोश्या.



जरा आठवी तो दिवस तू भयाण,

जगाच्या समक्ष तुझे शीरकाण.

अजाच्या गळी माळ पडली रे जोश्या,

खुला सांड होतास फसलास जोश्या.



कशी घोडचूक ही केलीस छान,

स्वतः खाटीका हाती देतोस मान.

असा बुद्धीभेद तुझा होई जोश्या,

खुला सांड होतास फसलास जोश्या.



पुन्हा पारतंत्र्यात गेलास जोश्या,

विनाशर्त शरणागत झालास जोश्या,

तुझी लावली तू स्वतः वाट जोश्या,

कसा मूर्ख, बिंडोक आहेस जोश्या.





-------------------------------------------समाप्तच-------------------------------------------





पाचवी खोली

| Labels: | Posted On 3/29/11 at 9:54 AM


गिरगावातल्या चाळीत वाढलेल्या आमच्यासारख्या लोकांचं घराबद्दलचं एक स्वप्न असतं. स्वप्न सुरू - घरात एक प्रशस्त, हवेशीर संडास असावा - स्वप्न समाप्त. जास्त अपेक्षा नाहीत. मजल्यावरच्या ४ बिर्‍हाडात मिळून एक असलेल्या सार्वजनीक संडासाला आम्ही प्रेमाने पाचवी खोली म्हणत असू. काही लोक त्याला 'मालकाची खोली' असंही म्हणत. संडासाला 'मालकाची खोली' म्हणण्यामागे चाळ मालकाला नावं ठेवणं इतकाच हेतू नसून त्या बोलण्याला 'फक्त खोलीचं भाडं देऊन संडास फुकट वापरता' असं मालकाने ऐकवल्याची पार्श्वभूमी असे. चाळीतला संडास हा क्लिओपात्राच्या बाथ-टब सारखा लेख लिहायच्या लायकीचा जिन्नस नाही. कुणी लेख लिहावा इतकी ही उदात्त वस्तू अथवा वास्तू नाहीच. पण चाळकर्‍यांच्या जीवनात हिचं महत्व अनन्यसाधारण आहे हे नाकारता येत नाही.

जे चाळीत राहिले नाहीत त्यांच्यासाठी सांगायचं तर ही पाचवी खोली साधारण सिनेमात दिसणार्‍या पोलिसांच्या टॉर्चर रूम सारखी दिसते. फक्त इथे सत्य शोधक पट्टा नसतो. साधारण ६x६ ची खोली. जास्त जोरात लावली तर तुटेल अशी भीती वाटणारी कडी. कडी लाऊनही उघडाच राहिलाय असं वाटणारा दरवाजा. स्वातंत्र्यपूर्वकाळात कोबा केलेली जमीन. एक शोभेचा नळ. काचा फुटलेली आणि कुणीतरी पुठ्ठा चिकटवलेली खिडकी. संशोधनाचा विषय ठरावा असा रंग. भरीसभर म्हणून त्या खिळखिळ्या दरवाजातून किलकिलत आत येणारा प्रकाशाचा झोत पाचव्या खोलीत एक गूढ-भयाण वातावरण निर्माण करत असे.

दरवाजाच्या त्या फटीखेरीज हवा येण्याजाण्याचा दुसरा मार्ग नसल्याने खोलीतल्या ह्या भयाण वातावरणाला कुंद कारूण्याची झालरही लागत असे. कुणी जास्तवेळ आत राहिल्यास लोकं बाहेरून 'मेलास का रे?' असं ओरडत. ह्या ओरडण्याचे कारण चेष्टा नसून आतल्या माणसाविषयी कळकळ असे. कारण माणूस फार वेळ आत राहिला तर गुदमरून मरण्याचीच शक्यता जास्त. कदचित त्यामुळेच लोकं बाहेरही पटापट येत. आणि ती तशी यावीत ह्यासाठीच कुणी तिथे एग्झॉस्ट फॅन वगरे बसवले नसावेत. कोण जाणे, एखादा आत रमला तर इतरांची पंचाईत व्हायची. फ्लश, एग्झॉस्ट फॅन सारख्या चैनी त्या काळी नव्हत्या. आणि असत्या तरी त्या नळासारख्या शोभेपुरत्याच राहिल्या असत्या.

मुंबईचं प्रतिबिंब मुंबईकराच्या आयुष्यात दिसतं असं म्हणतात. आणि ते बघायला पाचव्या खोली सारखी दुसरी उत्तम जागा नाही. गर्दी, भयानक उकाडा, खूप घाम, कोंदट हवा, मान टाकलेला नळ ही मुंबईची सगळी लक्षणं ह्या ६x६ च्या खोलीत दिसून येतात.

पाचव्या खोलीतली भित्तीचित्रे आणि लिखाण हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. आफ्रिकेतल्या गुहेत सापडणार्‍या चित्रांशी साधर्म्य असलेल्या ह्या चित्रांचे चित्रकार आफ्रिकन चित्रकारांप्रमाणेच अनाम आहेत. माणसाच्या शरीराचं इतकं तपशीलवार चित्रण खजुराहोच्या शिल्पांनंतर इथेच दिसतं. कोणाचे कुणाशी जुळले आहे, कोण कशी चालू आहे, कोण एकाचवेळी अनेकांसोबत फिरत आहे अशा जिव्हाळ्याच्या विषयांवर इथे साधकबाधक चर्चा होऊन त्याची तपशीलवार नोंद ह्या भिंतीवर करून ठेवलेली आढळते. तसंच चाळीत घडणार्‍या भांडणांपासून ते मॅचच्या टाईमटेबलपर्यंत सगळ्या लेटेस्ट घडामोडीही ह्या भिंतीवर कोरून ठेवलेल्या आढळत. काही इतिहास संशोधकांच्या मते सद्ध्या प्रचलीत असलेल्या फेसबूक मधील वॉलची जननी हीच पाचव्या खोलीतली वॉल आहे. एका भिंतीवर तर "माझी होशील का" असा प्रश्न आणि त्याखाली "नाही" असं उत्तरही वाचायला मिळालं होतं.

ह्या पाचव्या खोलीने आम्हाला काय काय शिकवलं हे लिहायला लागलो तर यादी फार मोठी होईल. हठयोग्यांसारखं एका पायावर उभं राहून रांगेत तप करायला शिकवलं. सकाळी सकाळी प्रत्येक मजल्यावर असे अनेक ध्यानमहर्षी दिसत. शेअरींग आणि वेटींगचे प्रात्यक्षिक इथे दिसे. एक माणूस माणूस आत गेला की तो जाताना पेपर दुसर्‍या माणसाकडे पास करत असे आणि तो पुढच्याकडे. रांगेचा फायदा सर्वांना ही ओवी इथे प्रत्यक्षात अनुभवली जात असे. इतकी शिस्तबद्ध रांग मुंबईत दुसरीकडे कुठेही दिसणार नाही.

अनेक जण तर सकाळी सकाळी बायकोची कटकट नको म्हणून शांत चित्ताने विडी शिलगावून रांगेत उभे राहत आणि नंबर आला की लोकांना पास देऊन पुढे पाठवत. माणसं उठली की आधी देवापुढे हात जोडायचे सोडून तोंडात ब्रश खुपसून रांगेत उभे राहत. घरात २ पेक्षा अधीक मुलं असली तर एक दुधाच्या रांगेत आणि एक इथल्या रांगेत असं चित्र दिसे.

इथे आम्ही पाण्याची बचत करायला शिकलो. पाचव्या खोलीत नळ असे, पण वयस्क माणसांना उठताना आधार म्हणूनच त्याचा वापर होई. त्यातून पाणी येताना कुणीही कधीही पाहिले नव्हते. 'हा नळ मालकाने टाकीला जोडलेलाच नाही, नुस्ताच पाईप टाकलाय' असंही एकदा एकाने मला सांगितलं होतं. अशा परिस्थितीत सगळी भिस्त घरून आणलेल्या बादलीवर असे. घरून निघून मधल्या वाटेत पाण्याचा एकही थेंब खाली न पडू देता, बादली अजिबात डचमळू न देता मुक्कामी पोचणे हे येरागबाळ्याचे काम नव्हे.

पाचव्या खोलीने आम्हाला विजेची बचत करायला शिकवली. प्रत्येकाच्या घरात इथल्या दिव्याचा वेगळा स्विच असे. घरून निघताना तो सुरू करून निघावा लागे. कार्यभाग आटपून माणूस बाहेर पडला की दरवाज्याची बाहेरची कडी लावल्याचा आणि घरून दिव्याचा स्विच ऑफ केल्याचा आवाज एकदमच येत असे. लोकांचे कुले धुवायला आपली वीज का जाळा? असे साधे सोपे तत्व त्या मागे असे. आजकालच्या मुलांना एखाद्या खोलीतून बाहेर पडताना दिवे आणि पंखे बंद करावे हे शिकवावं लागतं. इथे तो आमच्या चाळीच्या संस्कारांचाच भाग होता. कारण 'जरा जाऊन येतो, जोशांचा दिवा सुरू आहे' असे संवादही केवळ आणि केवळ चाळीतच ऐकू येत.

अनेक लोकांच्या प्राणायामाच्या सवयीची सुरुवात इथूनच झाली. जीव मुठीत धरून 'बसणे' म्हणजे काय ह्याचा शब्दशः अनुभव इथे येत असे. आत जाताना छातीभरून श्वास घ्यायचा आणि तो सोडायला लागायच्या आधी बाहेर यायचं असे अचाट प्रकार इथे बघायला मिळत. मुंबईच्या घाईगडबडीच्या आणि गर्दीने व्यापून राहिलेल्या आयुष्यात काही एकटेपणाचे निवांत क्षण अनुभवण्याची जागाही ही पाचवी खोली असे. चाळकर्‍यांचं बाकी सगळं आयुष्यच सार्वजनीक असल्याने इथेच काय तो एकांत मिळत असे. नको नकोसा वाटला तरी.

अशा ह्या आखुडशिंगी, बहुगुणी पाचव्या खोलीपासून एकेकाळी आमच्या दिवसाची सुरुवात होत असे. आणि शेवटही.

चाळीवर आणि चाळकर्‍यांवर अनेकांनी अनेक लेख लिहिले पण ही पाचवी खोली मात्र उपेक्षितच राहिली आणि म्हणूनच आमचा हा लेखन प्रपंच.


-------X-------

रावसाहेब

| Labels: | Posted On 3/14/11 at 6:30 PM


रावसाहेबांनी डोळे किलकिले करून बघितलं. आजूबाजूला कुणाची चाहूल नव्हती. अंमळ पडून रहावे असा विचार करून रावसाहेबांनी कूस बदलली. पडद्याच्या फटीतून सकाळची कोवळी किरणं रावसाहेबांना त्या थंड वातावरणात हवीहवीशी वाटणारी उब देत होती. म्हणजे, दिवस थंडीचे नव्हते, ती थंडी ए.सी.ची होती. मुंबईत राहून हिवाळा अनुभवायचा असेल तर एसी शिवाय पर्याय नाही हे त्यांना कळलं होतं. पुन्हा एकदा रावसाहेबांनी स्वतःला मऊ दुलईत गुरफटून घेतलं. मागचे काही दिवस हा त्यांचा नेहेमीचा उद्योग झाला होता. आताशा पूर्वीसारखे कुणी त्यांना सकाळी सकाळी उठवायच्या मागे लागलेले नसायचे. पूर्वी सकाळी घराचं जणू रणांगण झालेलं असायचं. ८ च्या आत आवरून घराबाहेर पडायची सगळ्यांची घाई असे. घरात २ बाथरूम्स असली तरी सकाळच्या घाईगडबडीत घरातल्या ५ माणसांना कमीच पडत. का कोण जाणे अप्पांनासुद्धा ८ वाजता देवळात हजर रहायची सवय होती. 'देव तिथे दिवसभर असतो, आमच्या ऑफिसच्या गडबडीनंतर तुम्ही तुमचं आवरत जा' ही तात्यासाहेबांची विनंती अप्पांनी कमी ऐकू येत असल्याच्या बहाण्याने अनेक वर्ष कानावरून घालवली होती.
एक एक जण स्वतःचं आवरून टेबलवर येऊन न्याहारी संपवत होता. रावसाहेब सगळ्यात शेवटी अंघोळीला जायचे. कावळ्याच्या अंघोळीसारखी अंघोळ उरकणे त्यांच्या स्वभावातच नव्हते. आधी छान पैकी २ बादल्या उन पाणी काढून घेणे, हळूहळू प्रत्येक तांब्या मनापासून अंगावर ओतणे, मग निवांतपणे शँपू, बॉडी वॉश चोळणे, पुन्हा अंगाला छान मसाज करणे, २ बादल्या पाणी संपलं की शेवटी पुन्हा बाजूला काढून ठेवलेले १-२ तांबे डोक्यावरून ओतणे अशी साग्रसंगीत अंघोळ रावसाहेब रोज करत. तोवर सगळ्यांची न्याहारी होऊन सगळे घराबाहेर पडायला एकदम तय्यार असत. माई सोडून. रिटायर झाल्यापासून माई सहसा घराबाहेर पडत नसत. पण सकाळी ७ ला सगळं आवरून तयार होण्याची त्यांची गेल्या ४० वर्षांची सवय त्यांना मोडायची नसल्याने सकाळच्या गडबडीस त्यांचाही हातभार लागे. तयारी करून माई ऑफिसची पर्स धरून सोफ्यावर बसून असत.
रावसाहेबांची न्याहारी गाडीतच होत असे. माई नेहमी त्यांना भरपूर डबे देत. न्याहारीचा डबा, मधेच भूक लागली तर काही तरी जवळ असावं म्हणून एक डबा आणि दुपारच्या जेवणाचा ४ खणी डबा. ह्यातला एखादा डबा जरी भरलेल्या अवस्थेत परत आला तर संध्याकाळी रावसाहेबांना हजार प्रश्न विचारून माई भंडावून सोडत. 'आवडलं नाही का? वेळ मिळाला नाही का? भूक नव्हती का? दुसरं काही देत जाऊ का? बाहेरचं खाऊन खाऊन घरचं जेवण आवडेनासं झालं वाटतं?' इत्यादि प्रश्नांच्या भडिमारामुळे रावसाहेब नेहमी सगळे डबे संपवूनच परत आणत असत.
तात्या स्वतः गाडी चालवत. तात्या आणि अक्का दोघेही रग्गड कमावत असून ड्रायव्हर का नाही ठेवत असा विचार रावसाहेबांच्या मनात वरचेवर येत असे. रावसाहेब आरामात मागच्या सीटवर बसत, तात्या ड्रायव्हर सीट वर आणि अक्का तात्यांच्या बाजूच्या सीटवर. गाडीत बसल्यापासून तात्या ट्रॅफिकला शिव्या घालायला सुरुवात करत असत. रिक्षावाले हा त्यांचा शिव्या घालण्याचा हक्काचा आयटम. शिवी घातली की मागे रावसाहेब बसलेत हे जाणवून तात्या जीभ चावत आणि आरशातून मागच्या सीटवर बसलेल्या रावसाहेबांकडे बघत. रावसाहेब खिडकीतून बाहेर बघत आहेत हे बघून त्यांनी शिवी ऐकली नसावी असं स्वतःच समाधान करून घेत. पण रावसाहेबांना आता शिव्या अंगळवाणी पडलेल्या असल्याने ते तात्यांकडे दुर्लक्ष करत. किंबहून तात्यांना अवघडल्यासारखं वाटू नये म्हणून रावसाहेब मुद्दामच लक्ष नसल्याचं सोंग आणत.
माईने बांधून दिलेली न्याहारी संपवेपर्यंत रावसाहेबांची उतरण्याची जागा आलेली असे. आपण उतरलो की अक्का अंमळ तात्यांजवळ सरकून बसते हे रावसाहेबांनी बघितलं होतं. ते हसूनच त्यांच्याकडे दुर्लक्ष करत. अक्कांना सोडून तात्या त्यांच्या ऑफिसला जात असत. घरी सगळ्यात आधी रावसाहेबच परत येत असत. घर जवळ असल्याने निघाल्यापासून ३० मिनिटात ते घरी असत. माई त्यांची वाटच बघत असे. आल्या आल्या त्यांना काही तरी खायला करून देणे हा माईच्या दिवसातला हायपॉइंट असे. दुपारचं जेवण नुकतंच झालं असल्याने फारशी भूक नसली तरी प्रश्न नकोत म्हणून रावसाहेब समोर येईल ते गपगुमान गिळून आपल्या खोलीत जात असत.
घरी सगळ्यात उशीरा तात्या येत. किमान एकवेळचं जेवण सगळ्यांनी एकत्र घ्यावं असे तारे तात्यांनी एकदा तोडल्यापासून रावसाहेब तात्यांवर बारीक लक्ष ठेऊन होते. आणि हे तात्यांनाही माहित असल्याने तात्या जेवण्याच्या वेळेपर्यंत तरी पोचायचा प्रयत्न करत. कधी कधी उशीर होत असे पण तेव्हढं रावसाहेब चालवून घेत. जेवता जेवता सगळे जण आजच्या दिवसात काय काय घडलं हे इतरांना सांगत. जेवण झालं की मग सगळे समोरच्या बागेत चक्कर मारायला जात. रावसाहेबांन खरं तर झोप अनावर झाली असे. पण तरी ते कसे बसे पाय ओढत सगळ्यांसोबत फिरत. रावसाहेबांची पावलं अडखळू लागली की सगळे माघारी फिरत.
असा एकंदरीत रावसाहेबांचा दिवस असे. पण मागचे काही दिवस सगळं बदललं होतं. तात्या आणि अक्काची गडबड मात्र पूर्वीसारखीच होती. एकमेकांमुळे उशीर झाल्याचा आरोप एकमेकांवर करणेही पूर्वीसारखेच होते. रावसाहेब आपल्या खोलीत पडल्यापडल्या त्याची मजा घेत.
सद्ध्याचा हा दिनक्रम त्यांना मनापासून आवडत होता. माईसुद्धा आताशा त्यांच्या फार मागे लागत नसे. स्वप्नवत वाटावं असं आयुष्य रावसाहेब सद्ध्या जगत होते. पण हे सगळं लवकरच संपणार ह्याची जाणीव असल्याने ते मधूनच अंमळ दु:खीही होत. जमतंय तितके दिवस मजा करून घ्यावी असा विचार करून ते मनावर साचलेलं मळभ झटकत आणि पुन्हा कूस बदलत. रावसाहेबांच्या ह्या बदललेल्या आयुष्याचं कारण त्यांना माहित होतं. खरं तर ते ह्या दिवसांची मनापासून वाट बघत होते. रावसाहेब आनंदात होते. अजून थोडावेळ अंमळ पडून रहावे असा विचार करून रावसाहेबांनी पुन्हा एकदा कूस बदलली. आता तात्या आणि अक्कासोबत आवरून तयार व्हायची घाई नव्हती. आता त्यांना उठवायला कुणीही येणार नव्हतं. आता लवकर अंघोळ करायला कुणीही सांगणार नव्हतं.
कारण रावसाहेबांची वार्षीक परीक्षा संपून आता उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली होती.

आजचा मुंबई टाईम्स विकेण्ड

| | Posted On 2/25/11 at 11:48 AM