आम्ही संघटना उभारतो

| Labels: | Posted On 2/11/09 at 11:24 PM

आत्ता पर्यंत आम्ही बर्‍याच संघटना, संस्था सुरू केल्या. काही संघटनांच्या संस्थापनेच्या वेळी जातीने हजर होतो. सगळ्याच्या सगळ्या एकजात आपटल्या. (वि.सू. - जातीने आणि एकजात हे जातीवाचक शब्द म्हणून वापरले नाहियेत) ह्या लेखाद्वारे आम्ही आमच्या / संघटना सुरू करणार्‍यांच्या चुका सांगणार आहोत. जेणेकरून अशा चुका तुमच्याकडून होणार नाहीत.

सुरुवात सगळ्यात लेटेस्ट पासून करूया -

'बँगलोर सात्विक आहार प्रचार आणि योगासन प्रसार समिती'


बंगळूरात एका ढोसरीचे समयी श्री. श्री. प. पू. चो. च्या. डॉण बाब बंगलोरी ह्यांच्या डोक्यात 'बँगलोर सात्विक आहार प्रचार आणि योगासन प्रसार समिती' काढायची कल्पना बरळली. सॉरी. तरळली. ही संघटना यशस्वी व्हावी म्हणून त्यांनी लगेच त्यावेळी तिथे हजर असलेले म. हा. डां. ब. र. ट. अभिज्ञ दादा बारलीकर ह्यांना संस्थापक पद देऊन टाकले. एक मेंबर पक्का झाला. मलाही एखादं पद हवं होतं. पण त्या दोघांनी 'सगळेच पदाधिकारी झाले तर आपण वट कोणाला दाखवणार?' असे ठरवून मला सभासद म्हणून नोंदवून घेतले. इतपत ठीक आहे. पण पुढे एक चूक झाली. आमच्या ब्रेनस्टॉर्मींग चे बिल २,००० च्या वर आल्याचे बघताच त्यावेळी त्यांनी मला आजीवन सभासदत्व शूल्क १,००० फक्त दे असे सांगितले.

पुढे ह्या सात्विक आहार आणि योगासनांची सुरुवात सभासद म्हणून मीच करावी आणि पहिलाच मेंबर कामाला लागल्याचे जगाला दाखवून समिती ची इमेज बनवावी असे त्यांनी ठरवले. पुढे मला मदत म्हणून डाण्याने रात्रपाळी झाली की घरी जायच्या आधी मला कॉल करून उठवायची जबाबदारी घेतली. अभिज्ञ नी पुढच्या ढोसरी ला खास माझ्यासाठी फ्रेश लाईम ज्युस आणून माझा पेशंस तपासायचे ठरवले. वर तो वाढावा म्हणून माझ्यासमोरच सामीष भोजन आणि अपेयपान करायचे ठरवले. आणि वर हे सगळं माझ्याच भल्यासाठी चालल्याचे माझ्या मनावर ठासवायचा प्रयत्न करून हा सगळा खर्च प्लस गाडीभाडे (डाण्या - त्याचं घर ते माझं घर व्हाया लंडन + अभिज्ञ - त्याचं घर ते माझं घर व्हाया ऍम्स्टरडॅम) मागितले.

हे सगळं ऐकल्यावर मी विचार करून सांगतो असं म्हणून त्यांना सप्तरंगी टांग दिली.

धडा - संघटना सुरू होण्या अगोदरच सभासदांना देशोधडीला लावायचे प्लॅन्स बनवू नयेत. बनवलेच तर ते किमान त्यांच्या समोर डिस्कस करू नयेत.



आखील भारतीय फुंके संघटना


ह्या संघटनेची सुरुवात सरकारच्या एका अमानवतावादी निर्णया पासून झाली. आमचे काही समाजवादी मित्र आणि आम्ही रेल्वेचे इंजीन स्टेशनात धूर सोडत बसते तसे कट्ट्यावर बसलो असताना ह्या अघोरी निर्णया विरूद्ध आवाज उठवायचे ठरवले. सार्वजनीक ठिकाणी धूम्रपान निषेधाचा निषेध सार्वजनीकरित्या करायचे मान्य झाले. लगेच तिथल्या तिथे आम्ही पुढाकार घेऊन आखील भारतीय फुंके संघटना स्थापन केली. बाबू पानवाल्याने आमच्या प्रयत्नांनी निर्णय बदलल्यास सगळ्यांना एक्-एक गोल्ड फ्लेक देण्याचे मोठ्या मनाने जाहीर केले.

ह्यामुळे उत्साह वाढून आम्ही आम्ही सिगारेटी ओढून मेलो तर सरकारच्या बापाचं काय जातं? हा सिगारेट इतकाच ज्वलंत लेख लिहून जनतेला जागॄत करायचा आणि सरकारला आम्हाला मोकळा धूर सोडू द्या अशी विनंती करायचा प्रयत्न केला. ह्या वरून आमच्यावर बरीच टिका झाली. अनेक लोकांनी तुम्हाला चटके दिले पाहिजेत अशी अरेरावीची भाषाही वापरली.

इतकं सगळं होऊनही ही संघटना यशस्वी झाली नाही. कारण नियमाची अंमलबजावणी करणारी लोकंच हा नियम पहिल्या दिवसापासून धाब्यावर बसवू लागली. त्यामुळे मग आमच्या संघटनेला कोण विचारणार. पहिल्याच दिवशी आमच्या संघटनेची ऍश झाली.

धडा - आपण जी संघटना काढतो आहोत त्याची खरंच गरज आहे का ह्याची खात्री करावी. तुम आगे बढो म्हणणारी जनता आपण आगे बढल्यावर मागच्या मागे सटकते. उगाच पुण्याला जाऊन 'विनय विकास समीती अथवा विनम्र भाषा प्रचार समिती' काढाल तर तोंडावर पडाल.


आपली बुडणारी संस्कॄती बचाव समिती

आमच्या गिरगावात भाटवडेकर चाळीमधे नाना परचूरेच्या घरी त्याचे आजोबा (रत्नांग्री, मधली आळी) काही दिवस वास्तव्यास आले होते. चाळीच्या गणेशोत्सवात झालेले सांस्कृतीक कार्यक्रम पाहिल्यानंतर आलेल्या हॄदयविकाराच्या झटक्यानंतर बरे झाल्यावर त्यांनी तडकाफडकी आपली बुडणारी संस्कॄती बचाव समिती ची स्थापना केली. पहिल्या सभेच्या दिवशी संकष्टी असल्या कारणाने सर्वांना साबूदाण्याची खिचडी, दाण्याची आमटी आणि आंबा बर्फी विनामूल्य वाटण्याचे ठरवले. हा मेनू कळताच अण्णांच्या सभेला अलोट गर्दी लोटली. (ह्या वेळी एका भामट्याने रस्त्यावरून जाणार्‍या लोकांना खिचडीची कूपन्स वाटल्याचे ऐकीवात आहे.)

समोरच्या चाळीत रहाणार्‍या डिसिल्वा अंकलनेही 'दिंदू क्शंखॄई भाछाय्लाच्च हघी' (खिचडी + हिंदू संस्कॄती वाचवायलाच हवी ) असे विधान केले. ह्या दरम्यान बर्‍याच मान्यवरांची भाषणं झाली. त्यात ग्रँटरोड येथे हातभट्टी लावणार्‍या तोड्या भाय ने 'सर्व्यांनी हुद्या पासून धेशीच दोसायचा निराधार करा' असे आवाहन केले आणि सँपल म्हणून पहिल्या धारेची नारंगी एक एक चमचा उपस्थीतांना वाटली.

अण्णा खूष झाले. लोकं तुडूंब झाली.

इतकं असूनही ही संघटनाही बंद पडली. कारण त्याच दरम्यान चाळीतल्या गोडसेंचे पुत्ररत्न कु. अशोक नुकतेच अमेरिकेहून शिक्षण संपवून परत आले होते. येतान त्याने ब्लॅक, ब्लू कलरची बरीच लेबलं आणि रॉथमन्स, कॅमल इत्यादींचे खोके आपल्या जुन्या मित्रांना द्यायला आणले होते. प्लस त्याच्या घरात ठणाणणार्‍या रॉबी विल्यम्सही, मॅडोना, इ. प्रभूती चाळीतल्या पोट्ट्या-पाट्ट्यांना वेड लावत होत्या. त्यात ह्या सभेच्या दुसर्‍याच दिवशी त्याने चाळीतली उत्साही जनता गोळा करून त्यांना मुंबैच्या रात्र-जगाची अनोखी सफर घडवली होती.

धडा - आपली काँपीटीशन कोण आहे ह्याचा पूर्ण विचार केल्यावरच संघटना काढावी. अन्यथा पोपट होतो. पंजाबात जाऊन दाढीचे दुकान फुकटात दाढ्या केल्या तरी चालणार नाही. फावला वेळ असेल तर संघटना जरूर काढावी पण ती चालेलच अशी अपेक्षा करू नये.


तर, आपण कुठलीही संघटना सुरू करण्याआधी ह्या सगळ्या धड्यांचा गॄहपाठ करावा अशी कळकळीची विनंती.

बंड्याची शाळा

| Labels: | Posted On 2/9/09 at 4:31 PM

खरं सांगायचं तर शाळेविषयी आत्ता जेव्हढं ममत्व वाटतं तितकं प्रत्यक्षात शाळेत असताना कधिही वाटलं नाही. त्यावेळी शाळा, अभ्यास, परीक्षा, रिझल्ट्स ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे एक कधिही न संपणारी शिक्षा वाटायची. वर्षानूवर्ष त्याच त्याच टॉर्चर मधून जाताना कधी एकदा शाळा संपून कॉलेजमधे जातोय असं वाटायचं. पण कॉलेजात पाऊल ठेवल्या ठेवल्या शाळेला मिस करायला सुरुवात झाली. नंतर कॉलेजच्या जीवनात रुळल्यावर शाळेचा कधी कधी विसरही पडला. सुदैवाने माझी शाळा घरा पासून जवळच असल्याने येता जाता शाळेचे दर्शन घडायचे. शिक्षक दिसले की आपसूकच पाया पडायचो, शाळेसमोरून जात असताना प्रार्थना सुरु असली की 'दक्ष' मधे उभा रहायचो, कॉलेजमधे असताना जेंव्हा सिग्रेट ओढायला सुरुवात केली तेव्हा एकवेळ बाबांनी बघितलं तरी चालेल पण बाईंनी बघू नये अशी देवाकडे प्रार्थना करायचो.

आज कळतंय शाळेचं महत्व. आमच्या शिक्षकांनी आम्हाला वळण लावण्याचे आणि सुजाण नागरीक बनवण्याचे बरेच प्रयत्न केले जे आम्ही पार वाया घालवले. आत्ता जाणवतंय की आपण आता जे काही २-५% माणसा सारखे वागतोय त्यात आई-बाबांइतकाच शाळेचाही हात आहे. आयुष्याला सुरुवात ह्या शाळेपासूनच झाली.

ह्या लेखमालेतून ते गेलेले दिवस पुन्हा एकदा जगण्याचा विचार आहे. पण पुन्हा एकदा त्या न केलेल्या अभ्यासाच्या, शिक्षेच्या, परिक्षेच्या, सिझल्ट्सच्या आठवणी नकोयत. त्यामुळे शाळेच्या दिवसात केलेल्या उनाडक्या, दंगा-मस्ती, आचरटपणा, वाह्यातपण ह्याच गोष्टी शब्दबद्ध करणार आहे.

ह्यातल्या काही घटना खर्‍या आहेत, काही पाहिलेल्या आहेत, काही ऐकलेल्या आहेत आणि काही पूर्णपणे माझ्या मनाचे श्लोक आहेत. बंड्या हे केवळ एक पात्र नसून ती एक (माझ्याशी ९९.९९९% साधर्म्य असणारी) प्रवॄत्ती आहे. 'बंड्याची शाळा' ह्या लेखमालेतून शालेय जीवनातील बर्‍याच गोष्टींचा विचार करणार आहे. तेव्हढीच जरा पुन्हा धमाल.




बंड्याची शाळा
(धडा पहिला - प्रगती पुस्तक)





माझ्या शाळेच्या १० वर्षात बाकिच्या कुठल्याही पुस्तकाने छळलं नसेल तेव्हढं ह्या एका पुस्तकाने छळलंय. हजारो वेळा ऐकलेला विनोद पुन्हा सांगायचा तर ते प्रगती पुस्तक नसून अधोगती पुस्तक होतं. ह्या वाक्यात नुसतंच प्रगती पुस्तक असं लिहून मधे (?) टाकून अजून एक 'वाचीक' विनोद करता येतो. असो. हा विनोद मला पहिल्यांदा आमच्या पिताश्रींनी ऐकवला. इयत्ता सातवी. त्यावेळीही आजच्या सारखंच काही कळत नव्हतं. पण तेव्हा वय सोबत होतं. चाचणी परीक्षेत सहा पैकी सहा विषयात मार्कांखाली लाल रेषा लेऊन आमचं प्रगती पुस्तक अवतरलं होतं. प्रगती पुस्तकांचं वाटप आमचे पी.टी. चे सर करायचे. रांगेत माझ्यापुढे अजय जाधव घोड्यासारखा दिड पायावर उभा होता. त्याची सुटका ३ लाल रेषांवर झाली. त्यामुळे मलाही हुरूप आल. पेपर दोघांनी मिळून सोडवला असल्याने जरा हायसं वाटलं.

पण माझ्या नशीबात सुखाने सुट्टी उपभोगणं तेव्हाही नव्हतं आत्ताही नाही. प्रगती पुस्तक देताना मास्तरांनी 'ऍहॅ रे जोशा, अभ्यास कर सांगत व्हतो तेंवा तुला खेळण्या पासून वेळ मिळंना, झालास ना फ्येल' असं ऐकवलं. आदल्याच वर्षी टिळकांचा शेंगांचा धडा पुस्तकात असल्याने बाणेदारपणाचं भूत डोक्यावर स्वार होतं. 'सर पण तुम्हीच सांगितलं होतं रोज किमान ३ तास मैदानी खेळ खेळा' असं मी मास्तरांना सांगितल्यावर मला काही कळायच्या आत त्यांनी माझ्या पायाचा अंगठा त्यांच्या अंगठ्याने जोरात दाबला. कळ आली म्हणून खाली वाकलो तर कपाळ बाकावर आपटलं. त्यावर आमचे पी.टी मास्तर मोठ्ठ्याने हसले.

थर्ड डिग्री लावण्याचा अनुभव असलेल्या लोकांनाच पी.टी चे मास्तर नेमत असावेत असा माझा कयास आहे. स्वत:ला कमीत कमी त्रास होऊन मुलांना जास्तीत जास्त शिक्षा द्यायचे विविध उपाय आमचे मास्तर शोधत असत. मुलांना थोबडवण्याची आणि अंगठ्याने खांदे दाबायची जबाबदारी आमच्या वर्गातल्या शित्या कडे त्यांनी दिली होती. शित्या २-३ वर्ष नापास झाल्याने आमच्याहून बराच थोराड होता. ह्यामुळे त्याला कुणी आपल्यात घेत नसे. गम्मत अशी की मास्तरांचं काम करतो म्हणून त्याची सुटका नव्हती. मास्तर त्याला दर आठवड्याला घाऊक मार देत असत.

असो. सुरुवातीला बरेच दिवस जिवाच्या आकांताने ते प्रगती पुस्तक घरच्यांच्या नजरे पासून लपवत होतो. घरी प्रगती पुस्तक मिळालं का अशी रोज चौकशी होई आणि शाळेतही मास्तर न विसरता सही करून आणलं का म्हणून रोज विचारीत. बाबा बाहेर गावी गेलेत ह्या सबबीवर त्यांना ४-५ दिवस थोपवलं. त्या नंतर बाबांची तब्ब्येत बरी नाहिये, ऑफीस मधून यायला उशीर झाला अशी वेग वेगळी कारणं देत होतो. ती सगळी संपल्याने मी एके दिवशी 'बाबांचा हात फ्रॅक्चर झालाय, महिनाभर प्लॅस्टर मधे असणार आहे' असं सांगितल्यावर मास्तरांचा संयम सुटला आणि उद्याच्या उद्या सही आणली नाहीस तर वर्गात घेणार नाही असं अल्टीमेटम मिळालं.

कसा बसा धीर गोळा केला. जेऊन घेतलं (कदाचीत नंतर मिळालं नसतं) आणि प्रगती पुस्तक बाबांच्या हातात देऊन मान खाली घालून त्यांच्या समोर उभा राहिलो.
मी - ...........
बाबा - ...........
मी - .................................
बाबा - अरे थोबाड उघडून बोलशील का काही?
मी - पण बाबा....
बाबा - थोबाड बंद ठेव..... सहा विषयात चक्क नापास??????
मी - सहाच विषय होते...........
बाबा - माहिती आहे मला. हे प्रगती पुस्तक आहे की अधोगती पुस्तक? उद्या पासून तुझं टी.व्ही. बघणं बंद.....
मी - अहो पण परीक्षा आहे म्हणून आपण २ महिने आधीच केबल बंद केली आहे...........
बाबा - ह्या प्रगती पुस्तकावर मी सही करणार नाही......
मी - मला उद्या वर्गात बसू देणार नाहीत.......
बाबा - जा की मग उंडारायला.....
इतक्यात आमचे सुखकर्ता, दुखहर्ता, संकट-मोचन आजोबा हॉल मधे अवतरले. मी उगाच मुसमुसायला लागलो. ते बघून हुकुमीपणे आजोबा विरघळले.
आजोबा - अरे नको चिडूस इतका त्याच्यावर, पुढल्यावेळी करेल अभ्यास, करशील ना रे.....
मी - ह्यावेळी पण केला होता........
बाबा - बघा बघा काही लाज आहे का बघा त्याला, अभ्यास केला होता मग मास्तरांना काय हौस आहे लाल रेषा काढायची???
आजोबा - असू दे रे, लहान आहे अजून. आण मी सही करतो....
मी - पण बाबांचीच सही आणायला सांगितली आहे....
आजोबा - मी तुझ्या बाबांचा बाबा आहे....
बाबा - द्या इथे, करतो सही. दुसरं काय करणार आम्ही....
आजोबा - त्याचा अभ्यास घेत जा....
बाबा - बाबा आता तुमी माझ्यावर घसरू नका....
आजोबा - का नको घसरू....


त्यांची जुंपलेली पाहून मी तिथून हळूच बेडरूम मधे सटकलो. आता पुढचे ४ महिने वर्गात बसायला मिळणार होतं. पण त्या नंतर पुन्हा एकदा हे प्रगती पुस्तक अवतरणार होतं. त्याचा काय बंदोबस्त करावा ह्या विचारात शांत पणे झोपी गेलो.


बाबा - काही लाज आहे का बघा त्याला. नापास होऊन आलाय आणि शांत पणे झोपलाय बघा कसा........

इथे जोशी रहातात - भाग २

| Labels: | Posted On 2/5/09 at 11:55 PM

भाई जोशी मोनोलॉग २

तात्याची बायको सगुणा अगदी नावा प्रामाणेच होती. पण ह्याचा हा आळस मात्र तिच्या पार डोक्यात जायचा. एके दिवशी बिचारी ह्याला झोपेतून उठवण्यासाठी मोठ्याने ओरडली आणि हार्ट अटॅक येऊन सासूकडे निघून गेली. त्यानंतर तर ह्या दोघांना मोकळं रान मिळालं. आईच्या भितीने का होईना चंद्या निदान दहावी तरी पास झाला. शेंबूड पुसता येत नव्हता तेव्हापासून शेजारी पाजारी चंद्याच्या तक्रारी घेऊन आमच्याकडे यायचे. लोकांच्या वाळत घातलेल्या कपड्यांवर पाणी ओतणे, वाळवणं पळवणे, वाड्यातल्या कॉमन संडासात कुणी गेले असता बाहेरून कडी घालणे, दुपारी लोकं झोपले असताना कडी वाजवणे, एक ना दोन. अप्पाला तर ह्या दोघांनी कधीच गुंडाळून ठेवलं होतं. अप्पा महा खट म्हणूनच इतकी वर्ष तग धरून आहे. दुसर्‍या एखाद्याने ह्यांना कंटाळून एकतर स्वत: जीव तरी दिला असता किंवा आत्महत्या तरी केली असती. मला चिंता आहे ती अप्पा गेल्यावर तात्याचं काय होणार ह्याची.

बाबांचा मोनोलॉग

मागची पन्नास वर्ष अशीच काढली. काही न करता आणि जगाला धक्का न लावता. आमच्या आईला माझ्याकडून फार अपेक्षा. मुलगा मोठेपणी कुणी तरी मोठा होईल. पण बाबांनी बाळाचे पाय पाळण्यातच बघितले होते. बाबांचे एक काका लोकांचे कान पाहून भविष्य सांगायचे. त्यांनी बाबांना सांगितलं होतं 'तुझ्या मुलाच्या आयुष्यात राजयोग आहे. सगळं व्यवस्थीत होईल, चिंता नको.' त्या प्रमाणे सगळं व्यवस्थीत झालं. फार काही करावं लागलं नाही. कारण डोक्यावर हक्काचं छप्पर होतं, कमावता बाप होता, दुसर्‍या जबाबदार्‍या नव्हता. मग कशाल ४ कवड्या मिळवण्यासाठी रक्त आटवा.

आमची बायको भारी तापट होती. मी सुखाने झोपलेलो तिला अजिबात बघवायचं नाही. येता जाता ओरडायची. एकेदिवशी अशीच मला झोपेतुन उठवण्यासाठी माझ्यावर रागावली आणि अतिरागामुळे हार्ट अटॅक आला आणि कायमची शांत झाली. आमचं पुत्ररत्न म्हणजे माझ्यावर कडी आहे. माझं आयुष्य गेलं असंच, पण त्याला मात्र नक्कीच काही तरी उद्योग धंदा करायला लावलं पाहिजे. आता आला
की बोलतो आज त्याच्याशी.

मुलगा - हाय डॅड...
बाप - हॅल्लो सन... कुठे शेण खात होतास इतका वेळ? ही यायची वेळ झाली का? आमची जेवणं झाली कधीच. आत तुला कोण वाढणार, तुझा बाप?
मुलगा - हो...
बाप - कानफटवीन... कुठे होतास इतका वेळ?
मुलगा - अहो कट्ट्यावर गेलो तर कळलं की आज आपल्या नाट्यग्रुहात एक कवी संमेलन आहे... फुकट प्रवेश होतं म्हणून बसलो थोडा वेळ...
बाप - वा वा वा... कोण कवी होते...
मुलगा - होते हो असेच नवशे गवशे... टिपीकल इंटेलेक्चुअल 'आव' आणणारे...
बाप - म्हणजे????
मुलगा - म्हणजे आत्म्याची जाणीव, भावने मागची भावना, एकट्यातलं जग....
बाप - बापरे... तुझी उतरली असेल मग खाडकन...
मुलगा - हो ना... पण अशी गाढ झोप लागली म्हणून सांगू...
बाप - अरे मग कविता ऐकलीस की नाही...
मुलगा - ऐकली ना... ऐकवू का???
(बाप होऊन जाऊ दे अशी खूण करतो)
मुलगा - पुन्हा तीच सकाळ, पुन्हा तीच दुपार...
बाप - वा वा... वा वा...
मुलगा - पुन्हा तीच सकाळ, पुन्हा तीच दुपार... पुन्हा त्याच असहाय्यतेचा, आत्म्यावर बलात्कार...
बाप - आइच्चा घो...
मुलगा - दुसरी ऐका...
शब्द डोळ्यांनी बोलतात, मनाचे मौन आहे...
बाप - ह्म्म्म्म....
मुलगा - शब्द डोळ्यांनी बोलतात, मनाचे मौन आहे... भंगल्या नात्यात माझ्या, उसास्यांची चैन आहे...
बाप - बास...
मुलगा - अहो ह्या नंतर झोप लागली मला
बाप - आता काय प्रोग्राम?
मुलगा - नेहेमीचाच... जेवण आणि निद्रादेवीची आराधना...
बाप - वा... निद्रादेवीची आराधना म्हणे. गादीवर पडल्यापासून दुसर्‍या मिनीटाला अजगर होतो तुझा... घोरायला लागतोस लगेच...
मुलगा - अहो कसलं काय... ह्या घरात मनसोक्त घोरता पण येत नाही....
बाप - का रे???
मुलगा - जोरात घोरलो तर कुठच्या तरी भिंतीचे पोपडे पडतील अशी भीती वाटते...
बाप - अरे इतकी काळजी आहेत तर पैसे कमवा आणि वाडा करा की नीट.
मुलगा - ह्म्म्म... रमी खेळायची का?
बाप - काढ पत्ते...
(मुलगा पत्ते आणायला आत जातो आणि आतून पत्ते पिसत पिसत बाहेर येतो)
बाप - नीट पिस... आणि पत्ते लाऊ नकोस...
मुलगा - अहो पत्ते म्हणजे काय सायकल आहे का हवी तशी फिरवायला...
बाप - मग दर वेळी कसा रे तूच जिंकतोस...
मुलगा - नशीब... तुमचं नशीब फुल्या फुल्या आहे त्याला तुम्ही तरी काय करणार...
बाप - तुझ्या सारखं अवली कार्ट आमच्या घरात आलं तेव्हाच हे कळायला हवं होतं मला...
(पत्ते वाटून झालेत)
बाप - काय मग चंदू शेट... पोटापाण्यासाठी पुढे-मागे काही करायचा विचार आहे की नाही?
मुलगा - विचार सुरू आहे...
बाप - शब्बास, काय विचार सुरू आहे?
मुलगा - झाला की सांगिनच... सद्ध्या तरी काही तरी बिझनेस करायचा विचार आहे...
बाप - वा वा वा... पण धंद्याला लागणारं भांडवल कुठून मिळवणार...
मुलगा - तुमच्याकडून...
बाप - म्हणजे थोडक्यात मला धंद्याला लावायचा विचार आहे तर... चंद्या, धंदा करणं तेरे बस की बात नहीं है...
मुलगा - का हो...
बाप - मुळात त्या साठी तल्लख बुद्धी आणि गोडबोल्या स्वभाव लागतो. ह्या दोन पैकी एकही आपल्याकडे नाहिये...
मुलगा - बास का...
बाप - बास का काय... मागच्या वर्षी फटाक्यांचा धंदा केला होतास... शेवटच्या दिवशी सगळे फटाके तुलाच उडवायला लागले...
मुलगा - होतं असं कधी कधी...
बाप - कधी कधी? मधे एकदा आंब्याचा व्यापार करण्यासाठी अजोबांकडून पैसे घेतलेस. तुला मेल्या हापूस आणि पायरी मधला फरक कळत नाही.
मुलगा - का लाज काढताय???
बाप - चंद्या मेल्या कसं होणार तुझं पुढे???
मुलगा - होईल हो... तुम्ही टेंशन नका घेऊ...
बाप - कसं होईल...
मुलगा - बाबा एक सांगा, माणसाला जगायला काय लागतं?
बाप - काय?
मुलगा - रोटी कपडा और मकान... आत्ता रोटी आजोबा देतायत, कपड्यांची मला हौस नाही आणि मकान आहेच की आपलं.
बाप - मी आणि आजोबा भिंतीवर लटकलो की काय करणार आपण?
मुलगा - त्याला वेळ आहे हो अजून बराच. तुम्ही अजून किमान ३० वर्ष आणि आजोबा किमान १५ वर्ष कुठेही जात नाही.
बाप - मागच्या आठवड्यात आपले हॉटेल वाले तांबे भेटले होते.
मुलगा - काय म्हणाले???
बाप - त्यांची मुलगी आहे लग्नाची. तुझ्यासाठी विचारत होते.
मुलगा - अहो ती टिपीकल वरण-भात मॉडेल आहे हो.
बाप - हॉटेल मधे पार्टनरशीप देतो म्हणाले.
मुलगा - पण ती अगदीच साजूक तूप आहे हो. जराही तडका नाही...
बाप - तुला बिपाशा बासू हवी आहे का मग?
मुलगा - तिला मी चाललो तर मला ती नक्कीच धावेल...
बाप - अरे अशा बायका सांभाळणं कठिण असतं सोन्या. एकदम हाय मेंटेनन्स आयटम आहे तो. त्यात तुला स्वतःच्या पैशाने चड्डीची नाडी घ्यायची ऐपत नाही.
मुलगा - जाऊ द्या हो...
बाप - तुला कुणी आवडते का रे?
मुलगा - एक आहे...
बाप - कोण? कुठची? कुणाची? काय करते?
मुलगा - आपले शिंत्रे काका आहेत ना त्यांची 'शिला'
बाप - ती??? अरे ती अजून कॉलेज मधे आहे...
मुलगा - मग???
बाप - अरे तुला लग्न करायचंय की मुलगी दत्तक घ्यायची आहे?
मुलगा - बाबा तुम्ही विचारलत कुणी आवडते का? मी सांगितलं.
बाप - झक मारली तुला विचारलं. कुठे अक्कल शेण खायला गेली होती माझी देव जाणे...
(आजोबा आतून बाहेर येतात)
आजोबा - वा वा वा... आज बाप-मुलगा मिळून त्यांच्या आवडत्या डिश वर ताव मारतायत वाटतं. चालू द्या चालू द्या...
मुलगा - बसा आजोबा... पाच, तिन, दोन खेळू...
आजोबा - मी झाडांना पाणी घालायला चाललोय... उठ आणि मदतीला ये...
मुलगा - अहो बाबा एकटे कसे रमी खेळतील? अर्थात एकटे खेळले तरी हरतील म्हणा... (बाबा मारायची ऍक्शन करतात) आजोबा आपण अफूची, भांगेची किंवा मोहाची झाडं लावायची का हो? तुमचे किती पैसे वाचतील विचार करा... (आजोबा मारायची ऍक्शन करतात)
आजोबा - चल उठ आता…
बाप - थांबा बाबा मी येतो
(दोघे बाहेर जातात)

इथे जोशी रहातात

| Labels: | Posted On at 12:27 AM

नमस्कार. मी भाई जोशी. हे आमचं घर - जोशी वाडा. मला मरून जवळ जवळ २० वर्ष झाली. भूत भूत म्हणून ओरडू नका. खरी भूतं भेटायचीत तुम्हाला अजून. ह्यांच्या सोबत राहाण्यापेक्षा वर गेलो हे फार बरं झालं असं वाटतंय. पहिल्याच बाळंतपणाच्यावेळी माझी बायको मला सोडून गेली. माझा मुलगा अप्पा, स्वभावाला अतिशय गरीब. इतका... की बिचारा बायकोलाही अहो म्हणायचा. त्याचा मुलगा तात्या, प्रमाणाबाहेर आळशी. ह्याचा जन्म बैलपोळ्याच्या दिवशीचा. जास्त झोपल्याबद्दल एकदा कुणीतरी ओरडलं तर झोपून झोपून कंटाळा आला म्हणून झोपलो होतो असं उत्तर दिलं ह्याने. पण मुळात ह्याचाही स्वभाव अतिशय साधा आणि सरळ. इथपर्यंत जोशांच्या घरात सगळं ठिक चाललं होतं. आणि त्या नंतर चंद्या जन्मला. त्याच्याबद्दल बोलायला गेलं तर विष्णू सहस्त्रनामासारखी सहस्त्र शिव्यांची यादी तयार होईल. जन्मल्याबरोबर सर्वसाधारण मुलासारखा न रडता तो ख्यॅक् करून हसला तेव्हाच मला संशय आला होता. त्यात त्याला डॉक्टरांनी उलटा धरला असता वळवळ केल्याने तो डोक्यावर पडला. गरिब बाप आणि राक्षसगुणी मुलगा ह्यांच्यामधे आमच्या बिचार्‍या तात्याचा मात्र उस झालाय.

बाप तोंडावर पेपर ठेऊन झोपलाय. मुलगा घरच्या कपड्यांत खांद्यावर टॉवेल घेऊन एंट्री घेतो. बापाला झोपलेलं पाहून हैराण होतो.

मोनोलॉग (चंद्या) -


ह्या घरात जोशी रहातात. घर फार मोठं नाहिये. पण माणसंही फार नाहियेत. सर्वसाधारण मध्यमवर्गीयांसारखी बेतशुद्ध संतती असल्याने आहे त्या खोल्या पुरतायत. आता आपण ह्या जोश्यांच्या घरातली महत्वाची पात्र बघू. हे टेबल, ही खुर्ची आणि हा टिपॉय. असो. ते पाठमोरे दिसतायत ते भाई जोशी आणि त्यांच्या बाजूला आहेत त्या माई जोशी. त्यांचे फोटो हे असे पाठमोरे कसे ह्याची कहाणी अथवा अफवा सॉल्लीड इंटरेस्टींग आहे. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला हे दोघे फोटो काढायला स्टुडीयो मधे गेले होते. फोटोग्राफरचं फोकसींग चुकलं आणि मागच्या आरशाचा फोटो काढला गेला. त्यात हे दोघे असे पाठमोरे होते.

भाई जोशी तरूणपणीच कोंकणातून मुंबईला आले. नोकरीत जम बसल्यावर लग्न झालं. मधून मधून कोंकणात जात असत पण इस्टेटीवरून चुलत्याशी वाजल्याने मरेपर्यंत कोंकणात पाऊन ठेवणार नाही अशी ह्यांनी प्रतिज्ञा केली आणि ती खरी करून दाखवली. प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी करण्यावर कटाक्ष असणार्‍या भाईंना लग्नानंतर दहा महिने व्हायच्या आतच एक गोंडस मुलगा झाला. त्याचं नाव अप्पा जोशी. सद्ध्या जोश्यांच्या घरातलं सर्वात सिनीयर आणि एकमेव सरळमार्गी कॅरेक्टर. त्यांच्या मुलाचं नाव तात्या जोशी. आणि मी त्यांचा दिवटा चंद्या जोशी.

मुलगा - बाबा उठा. आजोबांची संध्या संपायची वेळ झाली.
बाप - काय रे. ह्या वेळी तू घरी कसा? आणि टॉवेल घेऊन कुठे चाललायस?
मुलगा - अंघोळीला.
बाप - आत्ता??? संध्याकाळी ६ वाजता???
मुलगा - अहो मी पण आत्ताच उठलो.
बाप - अरे तुला काही लाज लज्जा???
मुलगा - हॅ हॅ हॅ हॅ ... बाबा...
बाप - काय??
मुलगा - थोडे पैसे देता का? आज मित्रांसोबत पिक्चर टाकायला प्लॅन आहे...
बाप - अरे काय हे? २५ वर्षाचा घोडा झालास आणि बापाकडे पैसे मागतोस. आजूबाजूला बघ जरा. तुझ्या वयाची मुलं नोकरीला लागून घरखर्चाला हातभार लावायला लागली. आणि तू कोडग्यासारखा अजून बापाकडे पैसे मागतोयस??? कसं होणार अरे तुझं?
मुलगा - मला नोकरी सारखी शुल्लक कामं करून आयुष्य फुकट घालवायचं नाहिये. माझं अवतार कार्य फार मोठं आहे.
बाप - हो का? काय आहे तुमचं अवतार कार्य?
मुलगा - ते मी ठरवतोय अजून. बाबा, तुम्हाला आठवतं?
बाप - काय?
मुलगा - तुम्ही म्हणायचात की लहानपणी मी खूप हुशार होतो?
बाप - होतास बर्‍यापैकी... त्याचं आत्ता काय?
मुलगा - मग लहानपणी हुशार असलेला मुलगा मोठेपणी असा कसा झाला ह्याचा विचार कधी केलाय तुम्ही???

(बाप गोंधळतो)

मुलगा - मुलातले सुप्त गुण हेरून त्यांना वाव देणं हे आई-बापाचं कर्तव्य नाहिये का? कबीराने पण सांगितलंय 'लहान मुल म्हणजे फिरत्या चाकावर ठेवलेला मऊ मातीचा गोळा. त्याला आकार देणं हे आई-बापाचं काम आहे ना...

(बाप अजूनच गोंधळतो)

मुलगा - मग तुमच्या ह्या मातीच्या गोळ्याचं छान सुबक मडकं नं होता त्याचा असा दगड झाला हा माझा दोष आहे का?
बाप - व्वा...
मुलगा - व्वा काय?
बाप - तू निदान मी दगड आहे हे स्वतः कबूल तरी कलंस.
मुलगा - मुलगा असा निघाला हे तुमच्यातल्या पालकाचं अपयश नाहिये का?
बाप - कानफटवीन आता.
मुलगा - बाबा तुम्ही मला वेळीच जर घरातल्या एका कोपर्‍यात नेऊन विचारलं असतं की 'बाबारे तुझा प्रॉब्लेम काय आहे, तू असा भैसाटल्या सारखा का वागतोस' तर मी आज नक्कीच वेगळा असतो.
बाप - अरे तुला कोपर्‍यात घेऊन घेऊन घरातले सगळे कोपरे संपले. लहानपणी केलेले तुझे अती लाडच नडलेत.
मुलगा - बाबा काय हवं ते म्हणा, दगड म्हणा, बैल म्हणा, डुक्कर म्हणा... लहानपणी माझे लाड झालेत हा आरोप मला अजीबात मान्य नाहिये. असो. चला मी आता अंघोळीला जातोय. २०० रुपये तयार ठेवा. तुमच्याकडे १० मिनीटं आहेत.
बाप - २०० रुपये? अरे पिक्चर बघायला जातोयस की पिक्चर काढतोयस?
मुलगा - अहो हे कमीच आहेत. त्यानंतर जेवणाचा पण प्लॅन होता. तुम्हाला परवडणार नाही म्हणून पोस्ट्पोन केला...

(बाप पेपर फेकून मारतो. मुलगा आत पळतो. बाप पेपर उचलतो आणि पुन्हा झोपतो. आतून आजोबा बाहेर येतात.)

आजोबा - हल्या SSSSS.... धिर्रर्रर्रर्रर्र धिर्रर्रर्रर्रर्र धिर्रर्रर्रर्रर्र
बाप - या या या पिताश्री या... झाली का संध्या.
आजोबा - हो आमची संध्या झाली. तुमची आज दुपारीच आचमनं झालेली दिसतायत...
बाप - नाही हो... का??
आजोबा - काही नाही. चिकूचा वास येतोय म्हणून सहज आपलं वाटलं.
बाप - छे छे काहिही... दुपारी काय??? बाबा...
आजोबा - काय?
बाप - बाबा...
आजोबा - अरे काय???
बाप - थोडे पैसे देता का?
आजोबा - अरे काय हे? ५० वर्षाचा म्हातारा घोडा झालास आणि बापाकडे पैसे मागतोस. आजूबाजूला बघ जरा. अरे तुझ्या वयाची मुलं आता काही वर्षात रिटायर होतील. आणि तू कोडग्यासारखा बापाकडे पैसे मागतोयस??? तू आणि तुझा तो नालायक कार्टा. अरे तुमच्या डोक्यात काही प्रकाश पडणार आहे की नाही. तुम्ही दोघे... तुम्ही दोघे चांगले धडधाकट असून माझ्या पेंशन वर जगता. काही म्हणजे काहीच लाज नाही वाटत तुम्हाला ह्या म्हातार्‍याच्या जिवावर जगायला?
बाप - बाबा... अहो तुम्ही म्हातारे आहात ह्यात लाज वाटण्यासारखं काय आहे? होतं असं कधी कधी.
आजोबा - नालायका सारखी उत्तरं देऊ नकोस. अरे तुला नोकरी लागावी म्हणून मी कमी प्रयत्न केले का? माझ्या ऑफीसात सुद्धा शब्द टाकला होता. पण तू इंटरव्ह्यूला ही गेला नाहीस.
बाप - अहो कितीवेळा सांगितलं तुम्हाला त्या दिवशी मी घरून निघालो होतो. पण चर्चगेटला पोचल्यावर आठवलं की आज वानखेडेवर भारत - वेस्ट इंडीज ची मॅच आहे. आता मॅचपेक्षा का नोकरी महत्वाची आहे?
आजोबा - त्या एक वेळचं सोड. नंतर पण कमी प्रयत्न केले का मी? पण तू ढिम्म हलशील तर ना. शेवटी आमचा साहेब कंटाळून मला म्हणाला 'जोशी, ह्यापुढे मुलाला नोकरी लावा म्हणून अजून एकदा जरी मला सांगितलंत तर तुम्हालाच नोकरी वरून काढीन'.
बाप - बाबा मला नोकरी सारखी शुल्लक कामं करून आयुष्य फुकट घालवायचं नाहिये. माझं अवतार कार्य फार मोठं आहे.
आजोबा - अरे अवतार संपायची वेळ आली तुझी. कधी कार्याला लागणार आहेस?
बाप - बाबा, तुम्हाला आठवतं?
आजोबा - काय?
बाप - तुम्ही म्हणायचात की लहानपणी मी खूप हुशार होतो?
आजोबा - खूप हुशार वगैरे नव्हतास... पण आत्ताच्या इतका मठ्ठही नव्हतास.
बाप - मग लहानपणी बर्‍यापैकी हुशार असलेला मुलगा मोठेपणी असा कसा झाला ह्याचा विचार कधी केलाय तुम्ही???

(आजोबा गोंधळतो)

बाप - मुलातले सुप्त गुण हेरून त्यांना वाव देणं हे आई-बापाचं कर्तव्य नाहिये का? शिवाजी महराजांनी पण सांगितलंय 'लहान मुल म्हणजे फिरत्या चाकावर ठेवलेला मऊ मातीचा गोळा. त्याला आकार देणं हे आई-बापाचं काम आहे ना...

(आजोबा अजूनच गोंधळतो)

बाप - मग तुमच्या ह्या मातीच्या गोळ्याचं छान सुबक मडकं नं होता त्याचा असा दगड झाला हा माझा दोष आहे का?
आजोबा - व्वा
बाप - व्वा काय?
आजोबा - तू निदान मी दगड आहे हे स्वतः कबूल तरी कलंस.
बाप - बाबा तुम्ही मला वेळीच जर घरातल्या एका कोपर्‍यात नेऊन विचारलं असतं की 'बाबारे तुझा प्रॉब्लेम काय आहे, तू असा भैसाटल्या सारखा का वागतोस' तर मी आज नक्कीच वेगळा असतो.
आजोबा - अरे तुला कोपर्‍यात घेऊन घेऊन घरातले सगळे कोपरे संपले. हॉलच्या मध्यभागी घेऊन चाबकाने फोडायला हवा होता तुला म्हणजे आज ही परिस्थीतीच नसती उद्भवली.

(चंद्या अंघोळ करून बाहेर येतो)

आजोबा - या महाराज
मुलगा - तथास्तू
आजोबा - कानफाट फोडीन... तथास्तू म्हणे... कुठे चाललायस नटून थटून???
मुलगा - पिक्चर बघायला जातोय
आजोबा - व्वा... टिकीट कोण काढतंय तुझं?
मुलगा - बाबा...
बाप - बाबा???
मुलगा - हो... बाबा... पैसे
बाप - आजोबांकडे माग
मुलगा - आजोबा... पैसे
आजोबा - तुझं वय काय रे???
मुलगा - २५
आजोबा - नालायका... २५ वर्षाचा घोडा होऊनही कमवत नसल्याबद्दल लाज नाही वाटत का?
मुलगा - बाबा... आजोबा बघा काय म्हणतायत...

फोन वाजतो...

मुलगा - कोणॅ????
मुलगी - हॅलो...
मुलगा - कोण हवंय आपल्याला?
मुलगी - जोशी आहेत का?
मुलगा - आमच्या इथे घरात ३ आणि भिंतीवर २ असे ५ जोशी रहातात. त्यातलं नेमकं कोण हवंय आपल्याला?
मुलगी - कुणीही चालेल. सर मी अमुक अमुक बँकेतून बोलतेय. तुम्ही आमचे एकदम स्पेशल कस्टमर असल्याने तुमच्यासाठी एक मस्त स्किम आहे...
मुलगा - हो का?
मुलगी - हो ना... तुम्ही कमीत कमी ५ लाख रुपये किमान २ वर्षांसाठी ठेवले तर तुम्हाला त्यावर २५% इंटरेस्ट मिळेल. प्लस लाईफ इंशुरंस, ऍक्सीडंट कव्हर आणि पेस्ट कंट्रोल एकदम फ्री...
मुलगा - काय सांगता काय???
मुलगी - हो ना... मग कधी पाठवू आमच्या माणसाला...
मुलगा - एक सांगू का? माझ्याकडे तुमच्यासाठी ह्याहून भारी स्किम आहे...तुम्ही ५ लाख रुपये १ वर्षासाठी मला दिलेत तर वर्षाला ४०% व्याज मिळेल... बोला कधी येऊ पैसे न्यायला...
मुलगी - सर... तुमचा आवाज कट होतोय. नेटवर्क नाहिये बहुतेक...
मुलगा - अहो तुम्ही लँडलाईन वर कॉल केलाय... नेटवर्क कसं नसेल... कधी येऊ पैसे घ्यायला???
(फोन आपटल्याचा आवाज येतो)

आजोबा - काय रे का उगाच त्या बिचारीला छळत होतास.
मुलगा - हॅ हॅ हॅ हॅ
आजोबा - आणि ४०% इंटरेस्ट देईन म्हणे. कुठून देणार होतास?
मुलगा - अहो मी तिला इंटरेस्ट देईन असं म्हणालो. मुद्दल थोडीच परत देणार...
आजोबा - धन्य आहेस...
मुलगा - परवा असाच लोन हवंय का म्हणून फोन आला होता...
आजोबा - मग?
मुलगा - आजोबा... मला नाही वाटत आपल्याला कुणी कशासाठीही लोन देईल
आजोबा - का रे?
मुलगा - का रे काय? अहो तुमचं पेंशन किती कमी आहे... कोण लोन देईल
आजोबा - अरे मग स्वतः नोकरी कर नी घे की हवं तेव्हढं लोन... लाज नाही वाटत म्हातार्‍याच्या जिवावर जगताना?
मुलगा - अहो त्यात लाज वाटण्यासारखं काय आहे? आता ह्या वयात तुम्ही पैशाचं काय करणार आहात?
आजोबा - धन्य आहेस...
मुलगा - आजोबा... मला माझं आयुष्य नोकरी सारखी शुल्लक कामं करण्यात वाया घालवायचं नाहिये.
आजोबा - अरे मी गेल्यावर तुमचं काय होणार ह्याचा विचार केलाय का तुम्ही?
बाप - असं कसं बोलवतं बाबा तुम्हाला??? तुमच्या शिवाय आमचं आहेच कोण ह्या जगात???
आजोबा - अरे पण मी तुम्हाला आयुष्यभर पुरणार आहे का? कधी ना कधी मी पण भिंतीवर लटकणारच आहे? तेंव्हा काय कराल?
मुलगा - चला, तुमच्या ह्या फालतू गप्पांमधे माला लेट झाला. मी निघतो. आजोबा... मी येई पर्यंत थांबा, इतक्यात लटकायची घाई करू नका.
आजोबा - तात्या, हाण त्याच्या एक मुस्कटात.
बाप - चिडू नका हो बाबा. तुम्हालाच त्रास होईल. हा कधी सुधारणार आहे असं वाटतं का तुम्हाला?
आजोबा - अरे तुझं एकंदरीत कर्तुत्व पाहिल्यावर मला वाटलं होतं की तू जोश्यांचा घरातला निच्चतम बिंदू आहेस. पण तुझा मुलगा तुझ्याहून कोडगा निघाला.
मुलगा - मी केवळ बाबांचा वारसा पुढे चालवतोय.
बाप - बाबा, हाणा त्याच्या एक मुस्कटात.
आजोबा - जाऊ दे रे, लहान आहे तो. वर तुझाच मुलगा.
बाप - अहो तुम्ही काही तरी समजवा ना त्याला.
मुलगा - मी गेलो...

क्रमशः