नमस्ते सदा वत्सले मातृभूमे

| | Posted On 12/17/08 at 2:14 PM









नमस्ते सदा वत्सले मातृभूमे
त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोहम् ।
महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे
पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते ।।१।।

प्रभो शक्तिमन् हिन्दुराष्ट्राङ्गभूता
इमे सादरं त्वां नमामो वयम्
त्वदीयाय कार्याय बध्दा कटीयं
शुभामाशिषं देहि तत्पूर्तये ।
अजय्यां च विश्वस्य देहीश शक्तिं
सुशीलं जगद्येन नम्रं भवेत्
श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्ण मार्गं
स्वयं स्वीकृतं नः सुगं कारयेत् ।।२।।

समुत्कर्षनिःश्रेयस्यैकमुग्रं
परं साधनं नाम वीरव्रतम्
तदन्तः स्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा
हृदन्तः प्रजागर्तु तीव्रानिशम् ।
विजेत्री च नः संहता कार्यशक्तिर्
विधायास्य धर्मस्य संरक्षणम् ।
परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं
समर्था भवत्वाशिषा ते भृशम् ।।३।।

।। भारत माता की जय ।।

-------

हे वत्सल मातृभूमे, मी तुला सदैव नमस्कार करतो. हे हिन्दुभूमे, तू माझे सुखाने पालनपोषण केलेले आहेस. हे महामंगलमयी पुण्यभूमे, तुझ्यासाठी माझा हा देह समर्पण होवो. मी तुला पुनःपुन्हा वंदन करतो.

हे सर्व शक्तिमान परमेश्वरा, हिंदुराष्ट्राचे आम्ही पुत्र तुला सादर प्रणाम करतो. तुझ्याच कार्यासाठी आम्ही कटिबध्द झालो आहोत. त्या कार्याच्या पूर्ततेसाठी आम्हाला तू शुभाशीर्वाद दे. हे प्रभू, आम्हाला अशी शक्ती दे की, जिला आव्हान देण्याचे धैर्य जगातील अन्य कुणा शक्तीला व्हावयाचे नाही. असे शुध्द चारित्र्य दे की, ज्या चारित्र्यामुळे संपूर्ण विश्व नतमस्तक होईल आणि असे ज्ञान दे की, ज्यामुळे आम्ही स्वतः होऊन पत्करलेला हा काट्याकुट्यांनी भरलेला मार्ग सुगम होईल.

उच्च असे आध्यात्मिक सुख आणि महानतम अशी ऐहिक समृध्दी प्राप्त करण्याचे एकमेव श्रेष्ठतम असे साधन असलेली उग्र अशी वीरव्रताची भावना आमच्यात सदैव उत्स्फूर्त होत राहो. तीव्र आणि अखंड अशी ध्येयनिष्ठा आमच्या अंतःकरणात सदैव जागती राहो. तुझ्या कृपेने आमची ही विजयशालिनी संघटीत कार्यशक्ती आमच्या धर्माचे संरक्षण करून या राष्ट्राला वैभवाच्या उच्चतम शिखरावर पोहोचविण्यास समर्थ होवो.

।। भारत माता की जय ।।

-- रा. स्व. संघाची प्रार्थना --

संभवामी युगे युगे?

| Labels: | Posted On 12/8/08 at 1:40 PM

सरत्या वर्षासोबतच हिशोब मांडले जातात गेल्या वर्षाने काय दिलं आणि काय घेतलं ह्याचे. यंदाच्या वर्षी घेतल्याची यादी फार मोठी आहे. आत्ता पर्यंत शांत शहर म्हणून ओळखल्या जाणारया बँगलोर मध्ये एका वेळी ९ बाँब स्फोट झाले, शेयर बाजाराने आणलेल्या मंदीने सगळ्यांचेच कंबरडे मोडले, बेकारीची तलवार बरयाच लोकांच्या डोक्यावर टांगली गेली, अतिरेक्यांचे असंख्य हल्ले पचवलेली मुंबई सुद्धा हादरली. इतकी, की बरयाच खुर्च्या डगमगल्या, बरीच सिंहासनं मोडीत निघाली. २६ जुलै नंतर मुंबईतले देवही ताम्हनातल्या पाण्याला जुमानेनासे झाल्याने ह्यावेळी लोकांनीच सूत्रं हाती घेतली. गेटवे वर जमलेली अभूतपूर्व गर्दीच सरकारला हलवायला कारणीभूत ठरली. जगण्याच्या केविलवाण्या संघर्षाला 'मुंबई चे स्पिरिट' म्हणून सलाम करण्याने आता लोकं शांत होणार नाहीत ह्याची कुठे तरी जाणीव झाली. हम करेंगे, मुंह तोड जवाब देंगे, आर पार की लढाई होगी इत्यादी हवेतली पोकळ विधानं आता लोकांना फसविनाशी झाल्याने खरंच हालचाली सुरू झाल्या. कधी नव्हे ते अमेरिकेने उघडपणे भारताची बाजू घेतली. आता तरी नेहमी प्रमाणे बुळबुळीत विधानं नं करता सरकार अतिरेक्यांचा बीमोड करेल अशी आशा निर्माण झाली.

पण परिस्थिती इतकी हाताबाहेर जाईपर्यंत आपणही सगळेच झोपलेलो होतो ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. मी, माझं घर, माझं कुटुंब, माझी नोकरी ह्या चाकोरीत राहणारी भारतातली बहुसंख्य जनताच ह्या सगळ्याला एका परीने जबाबदार आहे. 'आम्ही आमचे प्रतिनिधी निवडून दिलेत, त्यांनी कामं करावी की' असं म्हणून आता जबाबदारीतून सुटता येणार नाही. घरी साधं रंगकाम काढल्यावर सतरा चौकश्या करून रंगारयाचा जीव खाणारे आपण देशाच्या बाबतीत इतके निरुत्साही कसे हे कोडं खरंच न सुटणारं आहे. सगळ्यांनीच निवडणुकीला उभं राहायची गरज नाहीये. पण आपण आपल्या परीने तरी ह्या झोपेचं सोंग घेतलेल्यांना हलवायचे प्रयत्न करूच शकतो. खड्यांतल्या रस्त्यावरून सरकारला शिव्या घालत प्रवास करतो, पण कॉर्पोरेटरला साधा एक फोन करून झापायचे कष्ट घेत नाही. 'माहितीचा हक्क' कायद्याने मिळूनही आपण तो वापरत नाही. 'बांबूच्या काठ्या घेतलेले आणि पोट सुटलेले पोलीस आमचं संरक्षण करण्यास असमर्थ आहेत' अशी जनहीतयाचीका दाखल करण्याची बुद्धी एकाही वकिलास होत नाही. मुंबई बुडल्यावर 'ते जे गटार आहे त्याचं नाव मिठी नदी आहे' हा साक्षात्कार लोकांना होतो ह्या पेक्षा मोठं दुर्दैव काय?

नवीन वर्षात गरज आहे ती आपण सगळ्यांनी जागं व्हायची. चिखल साफ करायला आत्ताच चिखलात उतरून पाय खराब नाही केले तर काही वर्षांनी ह्या चिखलातच राहायची पाळी येईल. शिवाजी शेजारच्या घरात जन्माला यावा ह्या मानसिकतेतून बाहेर पडायला हवं. आता आपणच आपल्या देशाला वाचवलं पाहिजे. निरुत्साही राजकारणी आणि कामचुकार सरकारी बाबूंच्या विरुद्ध आत्ताच आवाज उठवला पाहिजे. आपण आपल्या पुढच्या पिढ्यांना राहायला हा असा देश देणार आहोत का ह्याचा विचार प्रत्येकानेच करायला हवा. 'भारतात काय ठेवलंय? ' असं म्हणून परदेशी निघून गेल्याने हे प्रश्न सुटत नाहीत. म्हातारया आई-वडिलांना आपण प्राणापलीकडे जपतो तर जराजीर्ण झालेल्या देशासाठी साधी भूतदया म्हणूनही काही न करण्या इतके कृतघ्न आपण नक्कीच नाही.

मी कुठे बदल घडवू शकतो हा विचार करून तो अमलात आणायला हवा. जरा डोळे उघडे ठेवले तर अशा बरयाच जागा सापडतील. महिन्यातला एक तास तरी आपण सगळेच जण आपल्या देशासाठी नक्कीच देऊ शकतो. मला काही झालं नाही म्हणून अलिप्त राहणं आणि कुणी तरी येऊन वाचवेल ही अपेक्षा करणं आता सोडलं पाहिजे. अजून किती वर्ष आपण 'संभवामी युगे युगे' ह्या भाबड्या आशेवर जगणार?